डिजिटल क्लासरूमच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांना आजही अभिमान आहे तो आपण घेतलेल्या आनंददायी शिक्षणाचा, शिक्षकांनी मारलेल्या छडीचा.... आजही त्यांना त्या आठवणी ताज्या वाटतात. शेणानं सारवलेल्या वर्गाची आणि गुरुजींकडून खाल्लेल्या माराची आठवण कित्येकदा ते आपल्या मुलांना सांगतात.
असा सुखद अनुभव देणारे एक अविस्मरणीय शिक्षक आजही कार्यरत आहेत. ते म्हणजे प्रेमानं, मायेनं, प्रत्यक्ष निरीक्षणातून, प्रयोगातून आणि परिसर भेटीतून शिक्षण सोपे करून सांगणारे अरण ( ता. माढा) येथील संत सावतामाळी विद्यालयाचे तानाजी इंगळे सर !
विज्ञानातील पाठ असो अथवा भूगोलातील घटक. प्रत्यक्ष शेतात जाऊन झाडं, झुडपं, फळं, फुलं, माती, खडक या सर्वांची माहिती देणं अथवा वर्गात तसा प्रसंग उभा करून अध्यापनात जिवंतपणा आणणं हा इंगळे सरांचा हातखंडा !
निसर्गाची आवड आणि त्यावर इतके प्रेम की, संत तुकोबाच्या "वृक्षवल्ली, आम्हा सोयरे वनचरे..."
हे स्वतः जगणारा अवलिया ही इंगळे सरांची पंचक्रोशीतील खरी ओळख!
रान - शिवारातील हजारो झाडं, वेली, पशुपक्षी कीटक यांचा जीवनप्रवास आणि जीवनशैली अगदी मुखोदगत ! प्राणी, पक्षांचे आजार, झाडां- फळांवर होणारे रोग, त्यांवरील उपचार याची माहिती ते विद्यार्थ्यांना तर सांगतात मात्र अनेक शेतकरी सल्ला विचारत असतात...
वृक्ष लागवडीची भाषणं देणं सोपं. पण प्रत्यक्ष कार्यवाही शिकावी ती इंगळे सरांकडून. मित्रांचा अथवा पंचक्रोशीतील सामाजिक नेतृत्वांचा वाढदिवस इंगळे सरांनी स्वतः खड्डा खणून त्यामध्ये रोपण केलेल्या झाडाशिवाय साजरा होत नाही. स्वतः पिशवी तयार केलेली रोपे देऊन कसे चालेल? तर संबंधित लोक या रोपांची देखभाल करतात का याचा सातत्याने पाठपुरावा ही सरांची कार्यशैली! "पुढच्या वर्षी मी वाढदिवस साजरा करायला येणार आहे अशी हक्काची प्रेमाची धमकीही ते देवून जातात.."
असे सुमारे पाचशेच्यावर वडाचे महावृक्ष आसपासच्या दहा गावांत दिमाखात उभे आहेत. वडाच्या झाडाला गुट्टया बांधून रोपे तयार करण्याची पद्धत त्यांनी विकसित केली. आणि ही रोपे महिलांनी एकमेकींना दान करावित असा उपक्रम त्यांनी सुरू केला. प्रतिनिधिक स्वरूपात वृक्षाचा वाढदिवस ,दरवर्षी पर्यावरणदिनादिवशी मोडनिंबचे सुभाष वेदपाठक यांच्या शेतातील वडाच्या झाडाभोवती जमलेली मित्रमंडळी आणि त्यांच्या गराड्यात वृक्षप्रेमी इंगळे सर हा सोहळा बघण्यासारखा असतो...
गेल्या दहा वर्षापासून परिसरातील सर्व शाळांमधून "फटाके मुक्त दिवाळी" , "प्रदूषण मुक्त भारत" द्वारे ते शाळांमध्ये जाऊन फटाक्यांचे दुष्परिणाम, कृत्रिम रंगातील विष, सिमोलंघणात हाकनाक बळी जाणारा आपटा आदी विषयी विद्यार्थ्यांशी हितगुज करतात.
भारावलेले विद्यार्थी देखील फटाके न फोडण्याची,नैसर्गिक रंग खेळण्याची, आपटा वृक्ष जतनाची प्रतिज्ञा करतात. त्यांच्या सर्व कौटुंबिक परिस्थितीचा अभ्यास करून त्यांना जे हवं ते देणं अथवा सामाजिक घटकांकडून त्यांची गरज भागवणं हे त्यांचं नेहमीच कार्य .
'शेतीचं चालतं बोलतं विद्यापीठ' म्हणून तानाजी इंगळे यांची सर्वत्र ओळख आहे. प्रत्यक्ष भेटीतून, गाव भेटीतून अथवा फोनवर विना मोबदला ते शेतकऱ्यांच्या पीक पाण्यावरील प्रश्नांच्या अडचणी सोडवतात. हा त्यांचा जणू छंदच !!
इंगळे सरांच्या अफलातून शिक्षण पद्धती आणि समाजकार्याची दखल घेत सोलापूरच्या प्रिसिजन कंपनीने त्यांच्या शाळेला , पासवर्ड सारखे भन्नाट किशोरवयीन मासिक देऊ केले आहे." प्रिसिजन " च्या वतीने सोलंकरवाडी गावामध्ये सुरू असलेल्या 'चुलमुक्त गाव' योजनेतील गोबर गॅस निर्माण मध्ये प्रकल्प समन्वयक आहेत.
व्हॉईस ऑफ व्हॉईसलेस अभियान, पर्यावरण संरक्षण, माजी विद्यार्थी संस्था अशा अनेक संस्थांमार्फत चाललेल्या समाजकार्यात त्यांचा खूप मोठा सहभाग असतो.