विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Thursday, 26 September 2024

आनंददायी अध्यापनासाठी संगीत विषयाचा ध्यास घेतलेले अण्णा सुरवसे गुरुजी

 आनंददायी अध्यापनासाठी संगीत विषयाचा ध्यास घेतलेले 'आण्णा सुरवसे' 

    प्राथमिक शिक्षणामध्ये भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र या विषयांसोबतच संगीत विषयालाही तितकच महत्त्व आहे. शाळाबाह्य, गळती झालेले विद्यार्थी, अभ्यास निरस वाटणारे विद्यार्थी यांच्यासाठी आनंददायी पद्धतीनं शिक्षण दिलं जातं. यासाठी शिक्षकांमध्ये संगीत विषयाची आवड असणं, संगीत विषयाचं ज्ञान असणं खूप गरजेचं असतं. प्राथमिक शिक्षकांपैकी संगीत विषयात उच्च शिक्षण घेऊन ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असणारे अण्णा सुरवसे हे पदवीधर प्राथमिक शिक्षक अथक परिश्रम घेत आहेत.

       संगीत विषयात 'संगीत अलंकार' 'एम. ए. संगीत' या उच्च पदव्या घेतलेले आण्णा सुरवसे यांनी

 संगीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी इ. १ ली ते ७ वी मराठी विषयाच्या सर्व कविता स्वतः संगीतबद्ध करून त्यांनी युटुबवर अपलोड केल्या असून राज्यातील हजारो विद्यार्थी कविता पाठांतरासाठी त्यांच्या यूट्यूब चैनल चा उपयोग करतात.

  दैनंदिन परीपाठामध्ये हार्मोनियमच्या साथीसह परिपाठ घेतात. मराठी, इंग्रजी व हिंदी या विषयाच्या कविता संगीत वाद्यासह शिकवणं हा त्यांचा छंदच. यामुळं शाळेचा पट वाढला. विद्यार्थी शाळेत टिकू लागले. आणि आपोआपच ते आनंददायी पद्धतीनं शिकू सुद्धा लागले. 

      भोयरे येथील शाळेत सुद्धा त्यांनी १० वर्षे सेवा केली. लोकवर्गणीतून शाळेला संगणक, वृक्षारोपण, साक्षरता अभियान, ग्रामस्वच्छता अभियान इ. उपक्रम राबवले. इंग्रजी विषयासाठी सलग ५ वर्षे जिल्हा स्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहिलं. आपल्या कडील संगीत विषयातील ज्ञानाचा उपयोग करुन इ. १ ली ते ४ थी इंग्रजी विषयाच्या कविता जिल्ह्य़ातील सर्व शिक्षकांना सुंदर चालीसह ऐकवल्या व त्या शिकवल्या.

           प्राथमिक शिक्षकाची नोकरी करत असताना शास्त्रीय संगीत शिक्षण सुरु केलं. यामध्ये सांप्रदायिक मृदंग, गायन, तबलावादन चे शिक्षण घेत गायन अलंकार, तबला विशारद, एम. ए. संगीत इ. पदव्या मिळवल्या.

        संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत कलापथकाची निर्मिती करून तालुक्यातील ५० ते ६० गावामध्ये कलापथकाचे प्रयोग केले. कलापथकात गायन, हार्मोनियम वादन इ. साथ केली. शंभर टक्के गावं हागणदारी मुक्त झाली.

              जिल्ह्य़ातील सर्व शिक्षकांना शालेय गीतमंच प्रशिक्षण देण्याचं काम सुरू आहे. तत्कालीन सी. ई. ओ. मा. दिलीप स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतून गीतमंचातील गीतांचं प्रशिक्षण झालं. आणि तद्नंतर जिल्ह्यातील अनेक संगीत शिक्षकांना सोबत घेत तीस गीतांचे स्टुडिओ रेकॉर्डिंग केलं. राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यासाठी ते उपयोगी ठरलं.

      गीतमंचातील १०५ गीतांचं नोटेशन स्वतः तयार केलं व ते स्वरांजली गीतमंच नोटेशन' या पुस्तक रुपानं विद्यार्थ्यांपर्यंत व संगीतप्रेमींपर्यंत पोहोचवलं. 

    त्यांनी स्वरताल संगीतालयाची स्थापना केली. अनेक विद्यार्थ्यांना संगीताचे धडे दिले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल मुंबई यांचं परीक्षा केंद्र सुरु केलं. या केंद्रातून दरवर्षी शेकडो विद्यार्थी गायन, हार्मोनियम, तबला, मृदंग, बासरी व सतार यासारख्या परीक्षेला बसत आहेत. दरवर्षी अनेक विद्यार्थी विशारद पदवी घेऊन बाहेर पडत आहेत. संगीत शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना आपली कला लोकांसमोर सादर करता यावी उद्देशानं दरवर्षी दिपावलीला, 'दिपावली संध्या' तर आषाढी एकादशीच्या दिवशी 'अभंगवाणी' इ. कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये संगीत विद्यालयात शिकणारे अनेक विद्यार्थी आपली कला सादर करतात.

          त्यांनी सलग १० वर्षे वेगवेगळ्या शाळेतील मुलं जिल्हा स्तरावर विविध स्पर्धेसाठी नेली आहेत. व पाच वेळा जिल्हा स्तरावर प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. 

          अशा प्रकारे संगीत विषयात आवड असणारे आण्णा सुरवसे यांना आपल्या शैक्षणिक कारकीर्दित अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांसह शाळा ही घडवणारे सुनील अडगळे गुरुजी

 शाळेच्या चार भिंती मधील शिक्षण विद्यार्थ्यांना पुरेसं नसतं. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत म्हणून तर शिक्षकांनी सतत भविष्याचा वेध घेणारं सोबतच स्वतःच्या पायावर उभं रहायला शिकवणारं शिक्षण द्यायला हवं. शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणं हे तर आपलं पहिलं कर्तव्य आहेच पण सद्यस्थिती पाहता विद्यार्थ्यांना सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देणाऱ्या शिक्षणाची ही तितकीच गरज आहे.अशाच प्रकारे विविध सामाजिक विषय घेत वक्तृत्वाच्या माध्यमातून

  झोकून देऊन कष्ट करणारेआणि सर्वच क्षेत्रात अष्टपैलू कामगिरी करणारे पंढरपूर तालुक्यातल्या जाधववाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील गुरुजी सुनिल अडगळे. 

    गुरुजींनी अगोदर याच तालुक्यातील 

रानमळा-भोसे सारख्या छोट्या वस्तीवरील शाळेमध्ये सेवेची सुरुवात केली. पालकांच्या विश्वासावरती, विद्यार्थ्यांच्या अत्युच्च गुणवत्तेमुळे लाखो रुपयांच्या लोकसहभागातून शाळेचा विकास केला. सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण गुणवत्ता विकास अभियानामध्ये जिल्ह्यात "उत्कृष्ट शाळा" या पुरस्कारानं शाळेचा गौरव ही झाला. या छोट्या शाळेत स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थी चमकले.

मुख्याध्यापक बळीराम माळी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा प्रचंड कायापालट झाला.हे सर्वांच्या लोकसहभाग सहकार्यामुळेच...!!

पांढरेवस्ती करकंब या शाळेत बदली झाल्यानंतर विद्यार्थी आणि शाळा घडवण्याचं एक व्यसनच गुरुजींना लागलं आणि शाळेला 'एकही दिवस सुट्टी न घेता' दिवाळी-उन्हाळी सुट्टीत देखील विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करुन अखंडपणे ३६५ दिवस शाळा सुरू ठेवण्याचा विक्रम केला. लाखो रुपयांच्या लोकसहभागातून शाळेचा कायापालट केला.याची दखल विविध वर्तमानपत्रे आणि ए बी पी माझा या टीव्ही चॅनेलनं घेतली.शाळा आणि गावाचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड नावलौकीक झाला.

पांढरेवस्ती शाळेतच एका वर्षी "स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थी चमकल्याशिवाय... पायात चप्पलच घालणार नाही..!" अशी प्रतिज्ञा केली.वर्षभर उन्हाळ्या-पावसाळ्यात अनवाणी पायानं फिरत गुरुजी काम करत राहिले.परंतु शेवटी जिद्दीला यश आलं.तीन विद्यार्थी स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीत चमकले,दोन विद्यार्थी नवोदयला आणि एक विद्यार्थी शासकीय विद्यानिकेतनला पात्र झाला. यावेळी मुख्याध्यापक मोहन रसाळ , आणि सुनिल बारेकर आणि पालकांचेही प्रचंड सहकार्य लाभलं.

भोसे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतही गुरुजींनी लोकसहभागातून मोठं काम केलं.

 आज जि.प.शाळा जाधववाडी सारख्या आदर्श शाळेमध्ये दोघेही पतीपत्नी शिक्षक म्हणून सेवा करतात.

वक्तृत्व स्पर्धा , व्याख्याने,कवी संमेलन, पथनाट्य, शिक्षकांना मार्गदर्शन, सामाजिक कार्यशाळा, असे सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मोलाच्या योगदानामुळं त्यांना शेकडो पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. 

महापुरात ज्यांचं दप्तर वाहून गेलं त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप, महामारीच्या काळात ज्यांची घर उध्वस्त झाली त्यांना आर्थिक सहाय्य, जीवनावश्यक वस्तूं, औषधे कपडे-पांघरुन यांचे वाटप केलं 

स्वच्छता, वृक्ष लागवड या सारखे सामाजिक कार्य ही त्यांनी केलं आहे.


चौकट: सलग तीनशे पासष्ट दिवस शाळा भरवली. विविध संस्थांचे असंख्य पुरस्कार गुरुजींनी मिळवले. शिष्यवृत्ती आणि लोकसहभाग खूप मोठ्या प्रमाणात जमा केला.राज्यभर वक्तृत्वाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचं महत्त्वाचं काम गुरुजींनी केलं.वेदनेतून सुखाकडे, मुक्त विचार,चला वक्तृत्व स्पर्धा जिंकूया या तीन पुस्तकांचे लेखन ही केले आहे.

Wednesday, 4 September 2024

42.विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच आपल्या शिक्षणाची उंची वाढवणारे चंद्रमौळीचे खंदारे गुरुजी

 

        प्राथमिक शिक्षकांच्या अंगावर अध्यापनासोबतच शेकडो अशैक्षणिक कामं, शासनाचे दररोज नवनवीन उपक्रम, सुरू असलेली विविध अभियानं, जिल्हा परिषदेच्या शाळेलगतच खाजगी आणि इंग्रजी माध्यमांच्या उभ्या असलेल्या गाड्या, अशा सगळ्या अडचणीवर मात करत विद्यार्थ्यांच्या प्रगती सोबतच स्वतःचा शैक्षणिक आलेख एम.ए.एम.एड. सेट नेट, पीएचडी, पर्यंत वाढवत सलग तीन वर्षे शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांच्या प्रवेश बंद चा हाउसफुल बोर्ड लावणारे शिक्षक सत्यवान खंदारे गुरुजी.मोहोळ तालुक्यातल्या चंद्रमौळीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत काम करतात.

       शर्यत पाढे पाठांतराची या स्पर्धेतून इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांचे 30 पर्यंत पाढे पाठ आहेत.

  सुंदर हस्ताक्षर, चित्र रेखाटण, बाल सभा वक्तृत्व स्पर्धां इत्यादींचे आयोजन केले जाते व त्यांचा गुण गौरव केला जातो शिस्त, संस्कार आणि विद्यार्थी घडवणारी शाळा असा पालकांचा दृढ विश्वास झाला आहे .यामुळे शाळेचा पट वाढत आहे.

         खंदारे गुरुजींची हसत खेळत परंतु शिस्तबध्द अध्यापनाची वेगळी पद्धत मुलांना गोडी लावते .कला, क्रीडा, संगीत व स्पर्धा परीक्षा या सर्वच क्षेत्रात शाळेचे विद्यार्थी चमकत राहावेत यासाठी खंदारे यांचे प्रयत्न सतत सुरू असतात. तसेच त्यांचा सर्व पालकांशी स्नेहाचा व आपुलकीचा संबंध असल्यामुळं विविध शालेय उपक्रमात पालकांचा सक्रिय सहभाग वाढत आहे .त्याबरोबरच शाळेची पटसंख्या ही वाढत आहे. शिक्षण विभागाकडून राबविली जाणारी विविध अभियानं, विविध उपक्रम अतिशय तळमळीनं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते . वृक्षारोपण सारख्या सामाजिक उपक्रमात सहभाग घेवून जनजागृती करतात. आणि मतदार जागृती रॅली,तंबाखुमुक्त शाळा व परिसर, नवभारत साक्षरता अभियान यासारख्या राष्ट्रीय उपक्रमात भाग घेवून प्रबोधन ही करतात. लोकवर्गणीतून आणि स्वखर्चातून शाळा रंगकाम ,वृक्षारोपण,यासारखी कामे त्यांनी केली आहेत.

           नोकरीच्या आरंभीच्या काळात सलग अकरा वर्ष पोखरापूर सारख्या ग्रामीण भागात इयत्ता 5वी ते 7वी साठी सेमी इंग्रजी चे वर्ग सुरू केल्यामुळे त्यावेळचे अनेक विद्यार्थी आज मेडिकल ,पॅरामेडिकल ,इंजिनिअरिंग क्षेत्रात स्वतःचे करिअर करत आहेत. शिक्षणविभागा मार्फत राबवल्या जाणाऱ्या कथाकथन ,वक्तृत्व,

बालनाट्य, लोकनृत्य व क्रीडा स्पर्धा यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळे केंद्र, तालुका व जिल्हास्तरावर त्यांच्या विद्यार्थ्यांना यश मिळवता आले .शिक्षक स्वतः अपडेट असेल तरच विद्यार्थी अपडेट राहू शकतात यामुळे विविध कोर्स ते स्वतः आवडीने शिकतात आणि नवीन ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात.. विद्यार्थ्याना खाजगी स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शना बरोबर विविध खुल्यास्वरुपाच्या चित्रकला, रंगभरण,वक्तृत्व स्पर्धामध्ये विद्यार्थ्याना भाग घेण्यास प्रेरित करतात . मोहोळ तहसील कार्यालय आयोजित खुल्या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये लेझीम नृत्याचा सलग दोन वर्ष प्रथम क्रमांक त्यांच्या विद्यार्थ्यांनी पटकावला आहे..

       शाळेत विद्यार्थ्यांचे लेझिम पथक, झांज पथक , संचलन पथक ही तयार आहे . शाळास्तरावर योगासने , आनंददायी बालगीते, कृतियुक्त गिते,एरोबिक्स - संगीत व्यायाम प्रकार आदींचे नियोजन त्यांच्याकडून केले जाते . स्वतः विविध विषयांवर व्हिडिओ निर्मिती करून मुलांसाठीचा अवघड घटक सोपा करतात.

       .त्यांना आजपर्यंत मिळालेले पुरस्कार

मोहोळ तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार 2023, ट्रॉफी शोरुम सोलापूर चा कलारंग पुरस्कार, गुणिजन शिक्षक गुरुगौरव राज्यस्तर पुरस्कार, अजंठा आर्ट अकॅडमी चा कलाशिक्षक पुरस्कार.