विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Thursday, 26 September 2024

आनंददायी अध्यापनासाठी संगीत विषयाचा ध्यास घेतलेले अण्णा सुरवसे गुरुजी

 आनंददायी अध्यापनासाठी संगीत विषयाचा ध्यास घेतलेले 'आण्णा सुरवसे' 

    प्राथमिक शिक्षणामध्ये भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र या विषयांसोबतच संगीत विषयालाही तितकच महत्त्व आहे. शाळाबाह्य, गळती झालेले विद्यार्थी, अभ्यास निरस वाटणारे विद्यार्थी यांच्यासाठी आनंददायी पद्धतीनं शिक्षण दिलं जातं. यासाठी शिक्षकांमध्ये संगीत विषयाची आवड असणं, संगीत विषयाचं ज्ञान असणं खूप गरजेचं असतं. प्राथमिक शिक्षकांपैकी संगीत विषयात उच्च शिक्षण घेऊन ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असणारे अण्णा सुरवसे हे पदवीधर प्राथमिक शिक्षक अथक परिश्रम घेत आहेत.

       संगीत विषयात 'संगीत अलंकार' 'एम. ए. संगीत' या उच्च पदव्या घेतलेले आण्णा सुरवसे यांनी

 संगीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी इ. १ ली ते ७ वी मराठी विषयाच्या सर्व कविता स्वतः संगीतबद्ध करून त्यांनी युटुबवर अपलोड केल्या असून राज्यातील हजारो विद्यार्थी कविता पाठांतरासाठी त्यांच्या यूट्यूब चैनल चा उपयोग करतात.

  दैनंदिन परीपाठामध्ये हार्मोनियमच्या साथीसह परिपाठ घेतात. मराठी, इंग्रजी व हिंदी या विषयाच्या कविता संगीत वाद्यासह शिकवणं हा त्यांचा छंदच. यामुळं शाळेचा पट वाढला. विद्यार्थी शाळेत टिकू लागले. आणि आपोआपच ते आनंददायी पद्धतीनं शिकू सुद्धा लागले. 

      भोयरे येथील शाळेत सुद्धा त्यांनी १० वर्षे सेवा केली. लोकवर्गणीतून शाळेला संगणक, वृक्षारोपण, साक्षरता अभियान, ग्रामस्वच्छता अभियान इ. उपक्रम राबवले. इंग्रजी विषयासाठी सलग ५ वर्षे जिल्हा स्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहिलं. आपल्या कडील संगीत विषयातील ज्ञानाचा उपयोग करुन इ. १ ली ते ४ थी इंग्रजी विषयाच्या कविता जिल्ह्य़ातील सर्व शिक्षकांना सुंदर चालीसह ऐकवल्या व त्या शिकवल्या.

           प्राथमिक शिक्षकाची नोकरी करत असताना शास्त्रीय संगीत शिक्षण सुरु केलं. यामध्ये सांप्रदायिक मृदंग, गायन, तबलावादन चे शिक्षण घेत गायन अलंकार, तबला विशारद, एम. ए. संगीत इ. पदव्या मिळवल्या.

        संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत कलापथकाची निर्मिती करून तालुक्यातील ५० ते ६० गावामध्ये कलापथकाचे प्रयोग केले. कलापथकात गायन, हार्मोनियम वादन इ. साथ केली. शंभर टक्के गावं हागणदारी मुक्त झाली.

              जिल्ह्य़ातील सर्व शिक्षकांना शालेय गीतमंच प्रशिक्षण देण्याचं काम सुरू आहे. तत्कालीन सी. ई. ओ. मा. दिलीप स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतून गीतमंचातील गीतांचं प्रशिक्षण झालं. आणि तद्नंतर जिल्ह्यातील अनेक संगीत शिक्षकांना सोबत घेत तीस गीतांचे स्टुडिओ रेकॉर्डिंग केलं. राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यासाठी ते उपयोगी ठरलं.

      गीतमंचातील १०५ गीतांचं नोटेशन स्वतः तयार केलं व ते स्वरांजली गीतमंच नोटेशन' या पुस्तक रुपानं विद्यार्थ्यांपर्यंत व संगीतप्रेमींपर्यंत पोहोचवलं. 

    त्यांनी स्वरताल संगीतालयाची स्थापना केली. अनेक विद्यार्थ्यांना संगीताचे धडे दिले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल मुंबई यांचं परीक्षा केंद्र सुरु केलं. या केंद्रातून दरवर्षी शेकडो विद्यार्थी गायन, हार्मोनियम, तबला, मृदंग, बासरी व सतार यासारख्या परीक्षेला बसत आहेत. दरवर्षी अनेक विद्यार्थी विशारद पदवी घेऊन बाहेर पडत आहेत. संगीत शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना आपली कला लोकांसमोर सादर करता यावी उद्देशानं दरवर्षी दिपावलीला, 'दिपावली संध्या' तर आषाढी एकादशीच्या दिवशी 'अभंगवाणी' इ. कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये संगीत विद्यालयात शिकणारे अनेक विद्यार्थी आपली कला सादर करतात.

          त्यांनी सलग १० वर्षे वेगवेगळ्या शाळेतील मुलं जिल्हा स्तरावर विविध स्पर्धेसाठी नेली आहेत. व पाच वेळा जिल्हा स्तरावर प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. 

          अशा प्रकारे संगीत विषयात आवड असणारे आण्णा सुरवसे यांना आपल्या शैक्षणिक कारकीर्दित अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment