विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Monday, 21 August 2023

1.शिष्यवृत्तीचा पापरी पॅटर्न

         


दत्तात्रय बहिरू डोके

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पापरी तालुका मोहोळ


     दहावी परिक्षेत चांगले गुण मिळाले.मेडिकल, इंजिनिअरिंग या क्षेत्राकडं जावं असा सल्ला अनेकांनी दिला; पण आपल्या गुरुजींच्या सल्ल्या- नुसार श्री. दत्तात्रेय बहिरू डोके यांनी डी. एड ला प्रवेश घेतला. डीएड पूर्ण करून माळशिरस तालुक्यातील 'जांबुड' येथे ते रूजू झाले. तिथं त्यांनी आपला अध्यापनाचा ठसा उमटवत शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक उपक्रमात मोलाची कामगिरी केली.बदलीने मोहोळ तालुक्यातील पापरी येथे रुजू झाले. तेथे गावकरी व शिक्षक यांच्या मध्ये गैरसमजुतीतून मोठी तक्रार होऊन पटसंख्या बरीच कमी झालेली होती. तात्पुरता आदेश घेऊन पापरी या शाळेत ते रुजू झाले. नंतर त्यांच्या पाठोपाठ आणखी काही शिक्षक रुजू झाले, सर्वांनी मिळून शाळेचा कायापालट करण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्यांनी शाळेच्या वेळे व्यतिरिक्त चा वेळ देऊन ज्यादा तास घेण्यास सुरुवात केली.  

      शिष्यवृत्ती परीक्षेपूर्वी महिनाभर रात्र अभ्यासिका सुरू करून मार्गदर्शन केले.

शिष्यवृत्ती परीक्षेत सुरुवातीला एक-दोन वर्ष यश मिळाले नाही; पण 1999 ला एक 7वीचा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाला तेव्हापासून चालू वर्षापर्यंत खंड न पडता प्रत्येक वर्षी सरासरी 8 ते 10 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक होत गेले. चालू वर्षी तर 8 वी चे तब्बल 31 विद्यार्थी N.M.M.S.परीक्षेत तर 10 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आले .यासाठी डोके गुरुजींनी अवघड वाटणारा गणित विषय सोपा केला. स्वतःच्या काही अध्यापन पद्धती निर्माण केल्या . गणित या विषयाचे अखंडपणे सलग 25 वर्षे मार्गदर्शन करत शक्ती परीक्षेसाठी स्वतःला वाहून घेतले.यासाठी ते व त्यांचे सहकारी शाळा सुरू होण्यापूर्वी 1 तास आणि सुटल्यानंतर 1 तास असे मार्गदर्शन करतात. एवढेच नाही तर रविवार व इतर सुट्टी दिवशी ही मार्गदर्शन तासिका सुरू असतात. याला दीपावली सुट्टी सुद्धा अपवाद नाही. याचा परिणाम म्हणूनच वर्ग शाळेतले जवळ जवळ 150 पेक्षा अधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत. प्रत्येक वर्षी वर्गशिक्षक कोणीही असो डोके गुरुजी व त्यांचे सहकारी मार्गदर्शनाचं काम अखंडपणे करत असतात.

         मुलींची पट नोंदणी, उपस्थिती, सावित्रीबाई फुले दत्तक मुलींसाठी दत्तक निधी गोळा करणं यात भरीव काम केल्यानं त्यांना जि.प.सोलापूर ने सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आलं त्या नंतर अनेक वेळा संधी मिळूनही डोके गुरुजींनी इतर कोणता ही पुरस्कार घेतले नाही. उलट आपल्या सहकाऱ्यांना अधिक प्रेरणा मिळावी म्हणून त्यांना पुरस्काराची संधी दिली.

         त्यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षकांना गणित विषयाचं मार्गदर्शन केलं. जि.प.सोलापूर ,पंचायत समिती मोहोळ,पंढरपूर ,माढा येथे गणित शिष्यवृत्ती अध्यापन कसं करावं याबाबत मार्गदर्शन केलं. 

            आतापर्यंत जि. प. सोलापूर चे प्रदीपजी मोरे ,सुमनताई शिंदे , संजय राठोड यांनी डोके गुरुजींच्या वर्गास अचानक भेट दिली होती. त्यात त्यांना जे वेगळे पण जाणवलं त्याचा उल्लेख शिक्षक मार्गदर्शन कार्यशाळेत अनेकदा त्यांच्याकडून झाला. डोके सरांना हा एक बहुमानच वाटतो. आपल्या सेवाकाळात आजपर्यंत

डोके गुरुजींनी सहकार्याच्या मदतीनं अनेक उपक्रम राबविले त्यामध्ये प्रामुख्यानं

हरवले सापडले विभाग ,वर्षभर एकही दिवस गैरहजर नसणाऱ्या विद्यार्थ्यांचा 1 मे ला गौरव करणं,शाळेच्या सुट्टीच्या वेळेत रोज स्पीकरवर गीतं बालगीतं, ऐकवणं, वर्ग बचत बँक ,पाढे पाठांतर स्पर्धा ,गीत गायन स्पर्धा ,अंधश्रध्दा निर्मूलन कार्यक्रम,प्रश्नमंजुषा स्पर्धा ,स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन ,क्रीडा स्पर्धा मार्गदर्शन इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे.उत्कृष्ट कामाबद्दल डोके गुरुजींना दोन आगाऊ वेतनवाढी देऊन जिल्हा परिषदेने त्यांचा गौरव केला आहे.

       डोके गुरुजी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामामुळे पापरी शाळेस वेगवेगळे आतापर्यंत 10 पुरस्कार मिळाले आहेत .पापरी शाळा टीम वर्क मुळे सर्वच स्पर्धांमध्ये सतत आघाडीवर असते. यात स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धा, व्यक्तिमत्व विकास स्पर्धा,नवोदय प्रवेश परीक्षा , क्रीडा स्पर्धा इ. शालेय उपक्रमांचा समावेश आहे.

     यामुळेच परिसरातील आठ ते दहा गावातील मुले पापरी शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे पापरी शाळेचा पट सध्या तब्बल 750 होऊन सर्वाधिक पटाची जिल्ह्यातील ही एकमेव शाळा आहे, जागेअभावी प्रवेश बंद करण्याची वेळ आलेली आहे,याची दखल घेऊन जि. प. सोलापूर चे C.E.O. दिलीप स्वामी यांनी शाळेत आठवीच्या वर्गाला खास बाब म्हणून परवानगी दिलेली आहे.

     अध्यापनात नाविन्य म्हणून डोके सर व त्यांचे सहकारी ओव्हरहेड प्रोजेक्टर, L.E.D. चा वर्ग अध्यापनात उपयोग करताना दिसतात.डोके गुरुजींनी मुलांमधे गणित विषयाची आवड निर्माण केल्यानं बरेच विद्यार्थी सध्या मोठे पॅकेज घेऊन नामांकित कंपनी मधे इंजिनिअर आहेत. एक विद्यार्थी तर 1.25 कोटी पॅकेज घेऊन जपान मध्ये नोकरी करत आहे. यामुळेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेबांनी शाळेस सदिच्छा भेट दिली होती. या सर्व शाळेच्या यशात डोके गुरुजी सतत आपल्या शाळेच्या टीम वर्क ला महत्त्व देताना दिसतात....



2.विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या शिक्षिका..

 


         प्रिया राहुल सुरवसे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेला





     आज आपण एका अशा शिक्षिकेबद्दल वाचणार आहोत ज्यांना खरंतर शिक्षिका व्हायचच नव्हतं. पण लहानपणीच वडिलांचं छत्र हरवलं. त्यांची प्रिय मुलगी आईला परिस्थितिशी झगडताना पाहत होती निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं  तिनं कॉम्प्युटर इंजिनीयरला झालेल्या निवडीला डावलून आईचं शिक्षिका होण्याचं स्वप्न पूर्ण 

                    आज त्या केवळ शाळेतच नव्हे तर जिल्ह्यात व राज्यातही त्यांच्या विविध उपक्रमांमुळे नावारूपाला आल्या आहेत.जिल्हा परिषद शाळा बेलाटी येथे सध्या कार्यरत असलेल्या प्रिया राहुल सुरवसे त्यांच्या विविध शैक्षणिक उपक्रमामुळे सबंध राज्याला परिचित आहेत

    त्यांनी  अक्कलकोट तालुक्यातील दोड्याळ येथे नोकरीचा शुभारंभ केला तेथून त्यांची बदली झालेली कळताच गावकऱ्यांनी त्यांची बदली रद्द करण्यासाठी दाखवलेली एकजूट त्यांच्या कामाची पोचपावती देऊन जाते


उत्तर सोलापूर येथील तळे हिप्परगा येथे इंग्लिश भाषा विकासाकरिता व तंत्रज्ञान वाढीकरिता 'saturday is english day. तसेच किशोरवयीन मुलींमध्ये होणाऱ्या शारिरीक बदलाची व मानसिक बदल बद्दल जागरूक करण्याकरिता 'खास माझा तास तुझा 'हा नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविला. ज्यामुळे IL@FS कंपनीनं अभ्यासक्रम असलेला प्रोजेक्टर ,कॉम्प्यूटर लॅब त्यांच्या शाळेला दिली

              उत्तर सोलापूर मधील तरटगाव अतिशय खराब रस्ता आणि खडतर परिस्थिती परंतु आपल्या लाघवी स्वभावामुळे व हार न मानण्याच्या वृत्तीमुळे प्रिसीजन फौंडेशन, सर फौंडेशन व गावकरी यांच्या मदतीने 3 लाखाचा अविश्वसनिय लोकसहभाग गोळा करून शाळा डिजिटल बनवून शाळेचा पट वाढविला

ज्याची दखल राज्यस्तरावर घेतली गेली 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्फत विविध विभागात शाळेची यशोगाथा करिता निवड झाली


त्यांनी शिक्षण क्षेत्रात राबविलेल्या अनेक उपक्रमांच्या योगदानामुळे आत्ता पर्यंत त्यांना विविध संस्था व जिल्हा शिक्षण विभागाने अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.केवळ शिक्षण क्षेत्रातच न्हवे तर सामाजिक व साहित्य क्षेत्रातही उल्लेखनीय सहभाग नोंदवला .महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे याकरिता गावातील महिलांना रुखवतीचे सामान बनवण्याचे प्रशिक्षण आयोजित केले.केंद्रातील महिलांसाठी कार्यानुभव साहित्य बनवणे कार्यशाळा त्यांनी घेतल्या आहेत .प्रत्येक शाळेत त्या मुलींचे लेझीम पथक तयार करतात तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे विद्यार्थी लोकनृत्य स्पर्धा व टॅलेंट हंट स्पर्धा यात जिल्हास्तरावर निवडल्या गेल्या आहेत. जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत त्यांचे उपक्रम बक्षीस प्राप्त ठरले आहे

  लग्नानंतर पती ,दोन मुली ,सासू सासरे संसाराची कर्तव्य बजावत त्यांनी आपल्या शिक्षणातही वाढ केली , त्या BA(english)B.ed .MA (eduacation) पदवीधारक आहेत. आपली वाचनाची आवड जोपासत त्या विविध विषयांवर मार्मिक लेखनही करतात.   दैनिक सकाळ ,तरुण भारत, पुण्यनगरी, सारथी मासिक,काव्यप्रेमी दिवाळी अंकात त्यांचे लेख व कविता छापून आलेल्या आहेत.त्यांची स्वलिखित ५पुस्तके , प्रातिनिधीक 3 पुस्तके व एक मनस्विनी काव्यसंग्रह प्रकाशित आहे.  तसेच विविध शैक्षणिक ,कौटुंबिक,सामाजिक कार्यक्रमाचे सूत्रसंचलन त्या करतात

           कोरोना काळात 'शाळा बंद पण शिक्षण चालू ' यात त्यांनी पारावरची शाळा,स्वाध्याय पुस्तिका वाटप,ऑनलाइन तास उपक्रम हाती घेऊन शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही.जिल्हा परिषद सोलापूर मार्फत कोरोना काळात जिल्हास्तरीय व्हिडिओ निर्मित मध्ये सक्रिय सहभाग त्यांचा होता

         शाळा पूर्व तयारी उपक्रम सेल्फी पॉईंट यामुळे विक्रम दादा अडसूळ व ज्योतीताई बेलवले यांच्या मार्गदर्शनाखाली  राज्यस्तरीय 'शिकू आनंदे' या उपक्रमात त्यांनी आपला ठसा उमटवला.तसेच सध्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व बालभारती यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविला जात असलेला 'virtual classroom'  लाईव्ह शिकवणे यात त्या इयत्ता पहिली engilsh व इयत्ता दुसरी मराठी भाषेकरिता निवडल्या जाऊन महाराष्ट्र राज्यातील अनेक शाळांमधील मुलांशी संवाद साधून ज्ञानाची देवाण घेवाण सौ. सुरवसे करत आहेत