*उपक्रमशील शिक्षकांना प्रकाशात आणणारे नवनाथ शिंदे गुरुजी*...
-विरण कुलकर्णी,मोडनिंब
दैनिक सकाळ.
भावी पिढीला सुशिक्षित करण्याचा वसा घेतलेल्या शिक्षकांप्रती 'ते त्यांचे कामच' असा कोडगा सामाजिक दृष्टिकोन बळावत चालला आहे. शासन लादत असलेलं अशैक्षणिक कामाचं ओझं आणि पालकांमधून व्यक्त होत असलेल्या अपेक्षा अशा कात्रीत शिक्षक सापडला आहे. याही परिस्थितीत अनेक जण आपलं वेगळेपण जपत गुरुतत्त्वाचा आनंद लुटत आहेत. नानाविध उपक्रम राबवून आपल्या शाळेप्रती, विद्यार्थ्यांप्रती कमाल मर्यादेपर्यंत झटत आहेत. यातीलच काही उपक्रमशील शिक्षकांना प्रकाशित करणारे *नवनाथ शिंदे गुरुजी*
सकाळच्या उपक्रमशील शिक्षक या सदरात श्री शिंदे यांनी असे अनेक हिरे प्रकाशात आणले. स्कॉलरशिप, परसबाग, गुणवत्ता अभियान, कला, क्रीडा या सरकारी उपक्रमांखेरीज स्वनिर्मित उपक्रम, संगीत, पर्यावरण, सामाजिकभान, वाचनवेडे अशा शिक्षकांना समाजासमोर आणून सकारात्मक लेखनाचा सकाळचा वसा त्यांनी जपला.
दहावी मध्ये केंद्रात प्रथम येऊनही शिंदेंनी शिक्षणाची आवड म्हणून या क्षेत्राची वाट स्वीकारली. सोलापूर येथील नूतन प्रशाले मधून शिक्षण सेवेची झालेली सुरुवात विविध ठिकाणचा अनुभव घेत बैरागवाडी शाळेपर्यंत पोहोचली. राज्यातील काही नामांकित शाळांपैकी अरण येथील जिल्हा परिषदेची शाळा एक मॉडेल शाळा उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सलग पंधरा वर्षे या ठिकाणी विविध उपक्रम कार्यान्वित करून त्यांनी शाळेचे नाव राज्यात पोहोचविले.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी म्हणून माढा तालुका प्रज्ञाशोध परीक्षा सुरू होण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आजी-माजी विद्यार्थी कल्याणकारी विकास योजनेअंतर्गत विद्यार्थी कल्याण निधी योजनेची रक्कम आज लाखो रुपयांपर्यंत पोहीचली आहे. दरवर्षी मिळालेल्या व्याजातून स्वातंत्र्यदिनी विद्यार्थी पारितोषिक योजना सुरू केली. शिक्षणाची वारी पुणे आणि नागपूर येथील शैक्षणिक स्टॉल मधून हा *लोकसभागातून शाळा विकास उपक्रम* संपूर्ण राज्यभर पोहोचविला. त्यांचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात चमकत आहेत. शिंदे यांचा जिल्हा परिषदेने दोन वेळा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थी दाखल झाल्याबद्दल अधिवेशनामध्ये नागपूर येथे शिक्षण सचिव धीरज कुमार यांच्या हस्ते यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याचबरोबर सोलापूर मिड टाऊन रोटरी क्लब चा गुणवंत शिक्षक पुरस्कार, मुंबई येथील लोकसेवा अकादमी चा प्राइड ऑफ नेशन पुरस्कार, सर फाउंडेशन सोलापूर यांचा प्रयोगशील शिक्षक पुरस्कार, कविवर्य कुसुमाग्रज राज्यस्तरीय काव्य लेखन पुरस्कार या व अशा अनेक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. *स्मशानभूमीतील शाळेचे निसर्ग शाळेत रूपांतर*
तसे पाहिले तर अरण ची 'बरडावरची शाळा'! गावापासून लांब, उजाड, आणि ओसाड ठिकाणाची. लोकसहभागाच्या माध्यमातून येथे पहिली संगणक लॅब त्यांनी सुरू केली. स्वतः शिकून संगणक शिक्षण सुरू केलं. शाळेत विविध प्रकारची वृक्ष लागवड करून स्मशानभूमीतल्या शाळेचं रूपांतर निसर्ग शाळेत केलं. शालेय वस्तू भांडार परिसर साधन केंद्र, इंग्लिश लॅब, सेमी इंग्लिश शिक्षणाची व्यवस्था सुरू केली. इयत्ता सातवीतील एकाच वेळी 15 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड हा त्यांच्या शैक्षणिक कार्यातला संस्मरणीय क्षण. हुशार, चतुर, सामान्य असामान्य विद्यार्थ्यांमुळे सुचत गेलेले अनेक नवनवीन उपक्रम या शाळेत त्यांनी सुरू केले. केवळ 300 विद्यार्थी संख्या असणारी शाळा 680 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली.
-विरण कुलकर्णी,मोडनिंब
दैनिक सकाळ.