विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Wednesday, 20 December 2023

12.विद्यार्थ्यांना करोडपती करणारे ध्येयवेडे शिक्षक हनुमंत राऊत..

 विद्यार्थ्यांना करोडपती करणारे ध्येयवेडे शिक्षक हनुमंत राऊत..


तीन वर्षात 139 विद्यार्थ्यांना सत्तर लाखापेक्षा जास्त शिष्यवृत्ती



राज्यातली पहिली गणित प्रयोगशाळा


               स्वावलंबन हेच आमचे ब्रीद असा मूलमंत्र देत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंकोली येथील शाळेत अहोरात्र मेहनत करणारा ध्येयवेडा शिक्षक म्हणजे हनुमंत पांडुरंग राऊत. वक्तृत्व,कर्तृत्व आणि नेतृत्वाचं अंग असणाऱ्या राऊत सरांनी इयत्ता आठवी अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी त्यांच्याकडून करून घेणं आणि त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं. हे वेड डोक्यात घेतलं. अहोरात्र मेहनत करून कित्येक विद्यार्थ्यांना यशाचं नवं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. गुणवत्तेचा ध्यास घेतलेले प्रज्ञावंत गणित शिक्षक राऊत यांनी मागील तीन वर्षात भारत सरकार कडून घेतलेल्या एन एम एम एस परीक्षा , सारथी शिष्यवृत्ती परीक्षा , उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या स्पर्धा परीक्षेतून 139 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीधारक करून सत्तर लाखांपेक्षा जास्त शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळवून दिली. यावर्षी ही रक्कम एक कोटीच्या आसपास जाईल असा त्यांना विश्वास आहे. राऊत हे हाडाचे गणित शिक्षक सर्वत्र परिचित. गणित दृश्यमान पद्धतीनं शिकवून गणिताची भीती घालवणं व गणिती संकल्पना स्पष्ट करणं यासाठी त्यांनी राज्यातली पहिली गणित प्रयोगशाळा अंकोली इथं उभारली. यामध्ये दर्जेदार गणित साहित्य व वर्गवार कृतीपत्रिका यांचा समावेश आहे. आजवर अनेक शाळांनी व शिक्षकांनी या गणित प्रयोग शाळेस भेट देऊन अशा प्रकारच्या प्रयोगशाळा आपापल्या शाळांमध्ये उभ्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर गणित कट्टा, गणित जत्रा, गणिती बाजार अशा अनेक संकल्पनातून विद्यार्थ्यांना गणित सोपं करण्याचा प्रयत्न केला आहे.

 तत्कालीन मा शिक्षण सचिव नंदकुमार साहेब यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या मूलभूत गणिती प्रशिक्षणासाठी त्यांनी राज्य गणित प्रशिक्षक म्हणून काम केले आहे . महाराष्ट्रातील साधारण पाच हजार शिक्षकांना त्यांनी गणित सोपं करण्यासाठी प्रशिक्षण दिलं. ग्रामीण भागातील त्यांचे अनेक विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेत गणित विषयात राज्यात प्रथम आले. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतून अधिकारी पदावर विराजमान झाले. श्री राऊत यांना आतापर्यंत सोलापूर मुख्याध्यापक संघाचा कृतीशी शिक्षक पुरस्कार, दयानंद डॉक्टर मार्डीकर शिक्षक सक्षमता पुरस्कार, रयत शिक्षण संस्थेचा उपक्रमशील शिक्षक पुरस्कार, यासारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबर राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत सलग तीन वेळा त्यांना पारितोषिक मिळाले आहे. शेकडो वक्तृत्व स्पर्धा, निबंध व काव्य वाचन स्पर्धांमध्ये त्यांना यश मिळाले आहे. अनेक मासिकातून त्यांचे गणित विषयाचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ अनिल पाटील, विभागीय चेअरमन संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा विभाग उंचीवर नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भविष्यातील शिक्षणाच्या संधी ओळखून आय आय टी - नीट फाउंडेशन अभ्यासक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचा त्यांचा मानस आहे.

11.कल्पकतेसह नवनवीन प्रयोग करणाऱ्या करुणा गुरव

 बदलती शिक्षण पद्धती, प्रत्येक पिढीनुसार वाढणारी विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, कल्पकता, शिक्षण पद्धतीत होणारा तंत्रज्ञानाचा वापर, सतर्क पालक, शिक्षक आणि समाज सुद्धा शिक्षणाची नवनवीन दारं शोधतो आहे. आज शिक्षकांनी शिकवायच्या अगोदरच विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिकवायचं तर आहेच पण त्याहीपेक्षा ते स्वतः कसे शिकतील याकडं शिक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षक कल्पक आणि अध्यापनात नवनवीन प्रयोग करणारा असायला हवा. असेच शिक्षणामध्ये नवनवीन प्रयोग करत नवोपक्रम स्पर्धेत दरवर्षी भाग घेऊन यश मिळवणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करजगी येथील करुणा गुरव मॅडम.

           एस सी ई आर टी मार्फत दरवर्षी नवोपक्रम स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धेत राज्यातील कल्पक शिक्षक भाग घेत असतात. श्रीमती गुरव यांनी सलग सात वर्षे जिल्हास्तरावर व दोन वर्षे राज्यस्तरावर क्रमांक मिळवला. त्यांनी आजपर्यंत केलेले सर्व उपक्रम  नवोपक्रम लेखन एक तंत्र या पुस्तकात मांडले आहेत. शिक्षकी पेशात सर्जनशीलता फार महत्वाची असते.ती त्यांच्याकडं आहे . शैक्षणिक लेख-कविता लेखन, सूत्रसंचलन,तंत्रज्ञान याची आवड असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये ती रुजवणं  त्यांना फार अवघड गेलं नाही. 

      येणाऱ्या प्रत्येक पिढीला संगणकाचं  ज्ञान असायलाच हवं. आणि इंजीनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची पहिली पसंती असते ती कॉम्प्युटर . विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेपासूनच या गोष्टीचं ज्ञान मिळावं यासाठी त्यांनी शाळेत स्क्रॅच कोडींग व्हिडिओ निर्मिती सुरू केली . इयत्ता पाचवी चे पन्नास टक्के विद्यार्थी अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करतात. शाळा कन्नड भागात असून लोकांची बोलीभाषा कन्नड आहे. त्यामुळं मराठीतून शिकवणं ही तर येथील शिक्षकांची खरी कसोटी असते.  ग्रामीण भागात स्क्रॅचकोडींगचं शिक्षण देणं ही खरंच कौतुकाची बाब आहे.

        मॅडमनी विद्यार्थ्यांसाठी यूट्यूब चैनल सुरू केलं. अभ्यासक्रमातले छोटे छोटे घटक विद्यार्थ्यांना त्या ऑनलाईन शिकवू लागल्या. आणि जवळजवळ सतराशे व्हिडिओ त्यांनी निर्माण केले. राज्यातील वीस हजार पेक्षा जास्त विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले. आपल्या विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांपर्यंत त्या पोहोचल्या.विद्यार्थी  स्वतः शिकू लागले .

इयत्ता पहिलीचा स्मार्ट क्लास या त्यांच्या नवोपक्रमास जिल्ह्यात प्रथम तर राज्यात सातवा क्रमांक मिळाला. इंग्रजी वाचन कौशल्य हा त्यांचा आवडीचा घटक. यूट्यूब च्या माध्यमातून त्यांनी राज्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला .

       स्वतःसोबत आपले सहकारीही तंत्रस्नेही व्हावेत यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत एक महिनाभर राज्यातील शिक्षकांसाठी व्हिडिओ निर्मितीचे कौशल्य या विषयावर त्यांनी कार्यशाळा घेतल्या. याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, कथाकथन, टॅलेंट हंट यासारख्या स्पर्धांमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असतो.

 आयसीटीसी प्रशिक्षणात यश मिळाल्यामुळं पाच लाखापर्यंतचे आठ संगणक संच व एक लॅपटॉप त्यांच्या शाळेला मिळाला . शिक्षणात त्यांनी आजही  खंड पडू दिला नाही. बीए दोन विषयात, एमए दोन विषयात, डी.एस.एम , जर्नालिझम,बी.एड,एम.ए.एज्युकेशन अशी शैक्षणिक उंची वाढवत विद्यार्थ्यांसोबत त्यांचंही शिकणं सुरूच आहे.








     .

Wednesday, 6 December 2023

10.किलबिल ग्रुप च्या माध्यमातून सबंध राज्यभर परिचित असणाऱ्या सुवर्णा बोरगावकर ..

 किलबिल ग्रुप च्या माध्यमातून सबंध राज्यभर परिचित असणाऱ्या सुवर्णा बोरगावकर .. 


                    विद्यार्थ्यांना सतत काहीतरी नवनवीन देत त्यांना अभ्यासामध्ये गुंतवून ठेवणं ही शिक्षकांची एक कला असते.दररोज विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी यासाठी शाळेत काहीतरी नवीन दाखवलं जाणार आहे, मला त्यामध्ये भाग घ्यायचा आहे, असं विद्यार्थ्यांना वाटायला हवं.

         अक्कलकोट तालुक्यातील कर्जाळ च्या शाळेत सुवर्णा बोरगावकर या अशाच नवनवीन उपक्रमांसाठी सबंध जिल्ह्याला परिचित आहेत. सतत विद्यार्थ्यांमध्ये बसणं, त्यांच्यासोबतच खेळणं हे त्यांचं दररोजचच. मुलांसोबत शिक्षकापेक्षा मैत्रीची भूमिका त्या चांगल्या पद्धतीनं पार पाडतात. गळाभेट सारखा उपक्रम घेत त्यांना आईच्या मायेची उब देतात. थँक्स टीचर उपक्रमासोबत विद्यार्थी शिक्षक सहसंबंध त्या जोपासतात. वाचनाची गोडी लागावी यासाठी मी आहे वाचन वीर, पाणी पिण्याची आठवण रहावी म्हणून वॉटर बेल, कलेची आवड असणाऱ्यांसाठी अभिनय दालन, यासह आजी आजोबांचा दिवस, आम्ही सारे खवैय्ये, साने गुरूजी कथामाला, कडक भाकरी- कडक मुलाखत, तारे जमी पर -असे कित्येक उपक्रम त्या दररोज राबवीत असतात . प्रत्येक मुलगा हा असामान्य आहे असं समजून त्यांच्या मधला गुण शोधून तो विकसित करणं हेच आपलं काम आहे असं समजत त्या विद्यार्थ्यांमध्ये रममान होतात,.

    लेखनाचा ही व्यासंग बोरगांवकर यांना आहे. विविध वर्तमान पत्र, मासिकं, जीवनशिक्षण, किशोर यांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यापैकी आणि घर बोलू लागलं, जगण्याचा साक्षात्कार, ह्यदयास ह्रदय जोडोनी या लेखांचं खूप कौतुक झालं होतं.

      तालुका ते राष्ट्रीय स्तरावर बोरगांवकर यांना आजपर्यंत ४४ आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ऑनलाईन शिक्षण,गौरी आरास या उपक्रमाची दखल शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेऊन दूरध्वनीवरून त्यांचं कौतुक केलं होतं. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता. .विद्यार्थ्यांच्या यशामध्ये आपलं स्वप्न शोधणारा शिक्षकच खरा आदर्श असतो. असंच विद्यार्थ्यांचं यश शोधत प्रत्येक घटक उपघटक कृतीतून घेत मुलांना अभ्यासाची गोडी लावणं हेच मुळात शिक्षकाचं खरं काम असतं. ते बोरगावकर मोठ्या इमानेइतबारे करतात.

       शाळेतील विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धा, राज्यस्तरीय पाढे पाठांतर, अंकनाद स्पर्धा, नृत्य व नाटक यासारख्या विविध स्पर्धेत सहभाग नोंदवून त्यांच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.वर्गसजावट,साहित्य मांडणी व सोशल मिडीयाचा सक्रिय वापर करून वर्गात घेतलेला अभ्यास " किलबिल ग्रुप " च्या माध्यमातून पालकांपर्यंत व समाजापर्यंत पोहचवून शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही तंत्रस्नेही बनवले आहे .

9. परिसस्पर्श लाभलेले जिल्हा परिषदेचे गुरुजी...विजयकुमार वसंतपुरे

 परिसस्पर्श लाभलेले  जिल्हा परिषदेचे  गुरुजी...विजयकुमार वसंतपुरे

                      उपक्रमशील शिक्षकांना त्यांच्या सेवाकालात अनेक सन्मान,पुरस्कार,वेतनवाढी आणि पारितोषिके मिळत असतात.परंतु भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांना आपला उपक्रम सादर करून, आपल्या मुलांना प्रेरणा मिळावी, यासाठी डॉ कलाम यांना ऑटोग्राफ ची विनंती करत असता, "यु आर डुइंग गुड वर्क" असे म्हणत शाळेच्या पोस्टरवर डॉ. कलाम यांनी दिलेला ऑटोग्राफ  हा विजय सरांच्या जीवनातील  आनंदाचा सर्वोच्च क्षण. त्याचबरोबर संगणक साक्षरता अभियान राबविल्याबद्दल परम संगणकाचे निर्माते थोर संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी तासभर वैयक्तिक दिलेलं ज्ञानामृत  हा जीवनातील अतिशय चैतन्यदायी अनुभव होता.अशा दोन व्यक्तींचा परीसस्पर्श लाभलेले अक्कलकोट तालुक्यातील 

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा,आंदेवाडी ( बु.) या शाळेतील उपक्रमशील शिक्षक विजय वसंतपुरे.

      कौठाळी शाळेतली गुरुजींची पहिली नेमणूक . या शाळेत तेव्हा स्पर्धा परीक्षेचा सुवर्णकाळ होता.तालुक्यात सर्वोत्कृष्ट निकाल दिल्याबद्दल त्यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. त्यांचं हस्ताक्षर सुंदर  व देवनागरी कॅलीग्राफी लेखनकला अवगत असल्यामुळं जिल्हा परिषदेची सर्व प्रमाणपत्रे व कार्यक्रमपत्रिका लिहून देण्याचं काम गुरुजींकडं असायचं. स्वतःचं प्रमाणपत्र स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिणारा शिक्षक म्हणून कौतुक केलं जायचं. हीच अक्षरकला विद्यार्थ्यांमध्येही त्यांनी रुजवली. त्यांच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची अक्षरं सारखीच असायची. 

   पुढं  गुरुजी सर फाउंडेशनशी  जोडले गेले . उपक्रमशील शिक्षकांच्या सानिध्यात आले.  आय आय एम अहमदाबाद येथे शाळेच्या १२ उपक्रमांची निवड झाली. डॉ कलाम साहेब यांच्या हस्ते त्यांना टीचर्स अँड ट्रान्सफॉर्मर्स हा पुरस्कार देवून गौरविण्यात आलं.या उपक्रमात आधार विद्यार्थी वित्तबँक, राणी लक्ष्मीबाई डिफेन्स क्लब, जीवनशाळा ,दैनिक तापमान नोंद,जी तारीख-तो पाढा,जीवनशाळा व सर्वत्र गौरविण्यात आलेला डॉ विजय भटकर संगणक साक्षरता अभियान यांचा समावेश होता.

         गुरुजींना बालभारती मध्ये आय सी टी विषय समितीत तीन वर्षे काम करण्याची संधी मिळाली. जेऊर शाळेत काम करताना अक्कलकोट तालुक्यातील पहिली आय एस ओ शाळेचा सन्मान मिळाला.पुढं प्रिसिजन कंपनीशी नातं जोडलं गेलं. पहिल्या टप्प्यातील ई लर्निंग कीट शाळेला मिळाला.राज्यस्तरीय शैक्षणिक वारीसाठी निवड झाली.सोलापूर विज्ञान केंद्र येथे व्हर्चूअल फिल्ड ट्रीप च्या माध्यमातून १० हजार  पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विज्ञान केंद्रातील उपक्रम वसंतपुरे यांनी दाखविले.

       कोविड काळात सव्वा लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना  दैनिक अभ्यासमालेची पी डी एफ पुरवली. आपल्याबरोबर जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवलं .चालू शैक्षणिक वर्षात डिजिटल डिस्ट्रीक्ट रिपोजीटरी या उपक्रमाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या क्रांतीकारकांची व क्रांतीस्थळांची माहिती संकलित करून केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवर प्रसारित करत एका वेगळ्या उपक्रमाची नोंद त्यांनी त्याही ठिकाणी ठेवली.

             विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत असताना त्यांना अनेक थोर व्यक्तीचा परीसस्पर्श झाला. मुलांसोबत त्यांचंही जीवन आनंददायी आणि सुवर्णमय झाल्याची भावना ते व्यक्त करतात.