विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Wednesday, 6 December 2023

10.किलबिल ग्रुप च्या माध्यमातून सबंध राज्यभर परिचित असणाऱ्या सुवर्णा बोरगावकर ..

 किलबिल ग्रुप च्या माध्यमातून सबंध राज्यभर परिचित असणाऱ्या सुवर्णा बोरगावकर .. 


                    विद्यार्थ्यांना सतत काहीतरी नवनवीन देत त्यांना अभ्यासामध्ये गुंतवून ठेवणं ही शिक्षकांची एक कला असते.दररोज विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी यासाठी शाळेत काहीतरी नवीन दाखवलं जाणार आहे, मला त्यामध्ये भाग घ्यायचा आहे, असं विद्यार्थ्यांना वाटायला हवं.

         अक्कलकोट तालुक्यातील कर्जाळ च्या शाळेत सुवर्णा बोरगावकर या अशाच नवनवीन उपक्रमांसाठी सबंध जिल्ह्याला परिचित आहेत. सतत विद्यार्थ्यांमध्ये बसणं, त्यांच्यासोबतच खेळणं हे त्यांचं दररोजचच. मुलांसोबत शिक्षकापेक्षा मैत्रीची भूमिका त्या चांगल्या पद्धतीनं पार पाडतात. गळाभेट सारखा उपक्रम घेत त्यांना आईच्या मायेची उब देतात. थँक्स टीचर उपक्रमासोबत विद्यार्थी शिक्षक सहसंबंध त्या जोपासतात. वाचनाची गोडी लागावी यासाठी मी आहे वाचन वीर, पाणी पिण्याची आठवण रहावी म्हणून वॉटर बेल, कलेची आवड असणाऱ्यांसाठी अभिनय दालन, यासह आजी आजोबांचा दिवस, आम्ही सारे खवैय्ये, साने गुरूजी कथामाला, कडक भाकरी- कडक मुलाखत, तारे जमी पर -असे कित्येक उपक्रम त्या दररोज राबवीत असतात . प्रत्येक मुलगा हा असामान्य आहे असं समजून त्यांच्या मधला गुण शोधून तो विकसित करणं हेच आपलं काम आहे असं समजत त्या विद्यार्थ्यांमध्ये रममान होतात,.

    लेखनाचा ही व्यासंग बोरगांवकर यांना आहे. विविध वर्तमान पत्र, मासिकं, जीवनशिक्षण, किशोर यांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यापैकी आणि घर बोलू लागलं, जगण्याचा साक्षात्कार, ह्यदयास ह्रदय जोडोनी या लेखांचं खूप कौतुक झालं होतं.

      तालुका ते राष्ट्रीय स्तरावर बोरगांवकर यांना आजपर्यंत ४४ आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ऑनलाईन शिक्षण,गौरी आरास या उपक्रमाची दखल शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेऊन दूरध्वनीवरून त्यांचं कौतुक केलं होतं. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता. .विद्यार्थ्यांच्या यशामध्ये आपलं स्वप्न शोधणारा शिक्षकच खरा आदर्श असतो. असंच विद्यार्थ्यांचं यश शोधत प्रत्येक घटक उपघटक कृतीतून घेत मुलांना अभ्यासाची गोडी लावणं हेच मुळात शिक्षकाचं खरं काम असतं. ते बोरगावकर मोठ्या इमानेइतबारे करतात.

       शाळेतील विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धा, राज्यस्तरीय पाढे पाठांतर, अंकनाद स्पर्धा, नृत्य व नाटक यासारख्या विविध स्पर्धेत सहभाग नोंदवून त्यांच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.वर्गसजावट,साहित्य मांडणी व सोशल मिडीयाचा सक्रिय वापर करून वर्गात घेतलेला अभ्यास " किलबिल ग्रुप " च्या माध्यमातून पालकांपर्यंत व समाजापर्यंत पोहचवून शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही तंत्रस्नेही बनवले आहे .

No comments:

Post a Comment