विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Saturday, 27 April 2024

28.गुणवत्तेचा ध्यास घेतलेले ध्येयवेढे शिक्षक नागनाथ घाटोळे

 ग्रामीण भागात वाडीवस्तीवरील बालकांना शाळेची गोडी लागावी आणि कोणतंही मुल शाळाबाह्य राहू नये यासाठी तत्कालीन सरकारनं वस्ती तिथं शाळा ही संकल्पना अंमलात आणली . आणि राज्यातील वस्त्या वस्त्यांवर अनेक सुशिक्षित तरुण यासाठी स्वयंसेवक म्हणून पुढं सरसावले. करकंब ता. पंढरपूर येथील लोकरेवस्तीवरील नागनाथ घाटुळे या ध्येयवेढ्या तरुणांनं ही अशीच एका झाडाखाली २००५ साली एक वस्तीशाळा सुरू केली. आसपासच्या वस्त्यांवरून मुलं जमवली.बघता बघता शाळेचा पट वाढला. झाडाखालून छपरामध्ये आणि छपरातून इमारतीत शाळेचा चढता आलेख सुरू झाला. आता एका प्रशस्त इमारतीत शाळेचं रूपांतर झालं. गुरुजींच्या आणि पालकांच्या मदतीनं इथं एक देखणी इमारत उभी राहिली. शाळा लांब म्हणून शाळा सोडणाऱ्या मुला मुलींना गुरुजी शाळेत आणलं . गावातून ही काही मुलं या शाळेत शिकायला येऊ लागली.पुढं वस्ती शाळेचं रूपांतर नियमित शाळेत झालं. 

          गुरुजींनी विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांना शाळेविषयी गोडी लागावी यासाठी शब्दाच्या बागेत ,शब्दाची फुले ,शब्दाचा डोंगर चढती मुले, दिनांक तो पाढा, जाणून घेऊ गणिताची भाषा ,अंक भाषा, बोटांची भाषा, कृतींची भाषा ,वस्तूची भाषा ,चित्र भाषा, ध्वनीची भाषा, शब्द तयार करू, वाचू आणि लिहू, बेरजेचा डोंगर यासारखे वाचन पूरक उपक्रम राबविले. शिवाय मातकाम, हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी , विद्यार्थी बचत बँक, उपस्थिती ध्वज, डान्सिंग कृतीयुक्त पाढे ,डॉ.अब्दुल कलाम वाचन कट्टा ,ज्ञानरचनावाद शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण, बागबगीचा यासारख्या उपक्रमामुळं विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आणि गुणवत्तेत वाढ झाली.

        विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते सोबतच गुरुजींना लेखनाची ही आवड आहे. आज पर्यंत विविध विषयांवर जीवन शिक्षण, शिक्षण यात्री , जीवन गौरव,धडपड टिचर्स, यासारख्या विविध मासिकांसाठी त्यांनी लेखन केले आहे. सहकारी शिक्षक विनोद सावंत आणि घाटुळे गुरुजी यांचे बहुवर्ग अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांचे गटकार्य हे उपक्रम पाहण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त चौकलींगम साहेब, तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे साहेब अशा अनेक मान्यवरांनी शाळा भेटी दिल्या असून त्यांचे उपक्रम पाहून शाळेचं आणि शिक्षकांचही कौतुक केलं .

     महाराष्ट्रातील वाचन चळवळ या मुखपृष्ठावर लोकरे वस्ती शाळेचे विद्यार्थी चमकले. कबुलबुल स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्या मधील शेकोटी उपक्रमांमध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक व संचलन स्पर्धेत द्वितीय क्रमांक त्यांच्या विद्यार्थ्यांनी मिळवला.

   सर फाउंडेशन महाराष्ट्र यांच्यामार्फत घेत असलेल्या नवोपक्रम स्पर्धेत सलग तीन वर्ष त्यांना यश मिळाले आहे. तालुका आदर्श पुरस्कार, स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार, व राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार, शिक्षक रत्न पुरस्कार, साई समर्थ फाउंडेशन कोल्हापूर यासारख्या विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

Wednesday, 17 April 2024

27.विद्यार्थी हेच दैवत आणि काम हीच पूजा मानणाऱ्या शगुप्ता शेख

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदननगर लांबोटी येथील शाळेत इ. १लीचा वर्ग स्वखर्चानं डिजिटल करत साहित्य निर्मितीतून विद्यार्थ्यांना लेखन वाचनाची आवड निर्माण करणाऱ्या आणि शासनामार्फत सुरू असलेल्या निपुण भारत अभियानांतर्गत निपुणोत्सव शैक्षणिक साहित्य निर्मितीत तालुक्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या शगुप्ता लाल साहेब शेख.

       विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं विविध उपक्रम राबवणं आणि त्यांच्यामध्ये गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणणं यासाठीच सर्व शिक्षक धडपडत असतात आणि हेच त्यांचं ध्येय असतं. शेख मॅडम यांनी आजपर्यंत अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भिमनगर, प्राथमिक शाळा मोहळ नंबर चार

या ठिकाणी उल्लेखनीय काम केले आहे . मोहोळ शहरांतील खाजगी शाळा आणि इंग्रजी शाळा यांच्याशी स्पर्धा करत त्यांनी काळाची गरज ओळखून सर्वप्रथम पहिलीपासून सेमी इंग्रजीचा वर्ग सुरू केला. आणि शाळेचा पट वाढण्यास सुरुवात झाली.नुसता पट वाढवून चालणार नाही तर विद्यार्थी शाळेत यावेत रमावेत आणि टिकावेत यासाठी विविध उपक्रम घेत हसत खेळत आनंददायी पद्धतीनं आपलं अध्यापनाचे कार्य सुरू ठेवलं.

      "माझे विद्यार्थी सुदृढ विद्यार्थी " हा उपक्रम वर्गात व शाळेत राबवला. डायट वेळापूर कडून या उपक्रमाला जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला . "जागतिक एड्स " दिनानिमित्त जागृती पर पथनाट्याद्वारे जनजागृती केली .प्लास्टिक मुक्ती अभियानात पर्यावरण वाचवू प्लास्टिक टाळू यावर पथनाट्या द्वारे जनजागृती केली. 'उपक्रमाचे 365 दिवस' या पुस्तकांमध्ये या पर्यावरणपूरक उपक्रमाची दखल घेण्यात आली .तसेच मतदान जनजागृती रॅलीमध्ये सक्रिय सहभाग घेतला . 

     माझी वसुंधरा अभियानात सक्रिय सहभाग घेतला. व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय निवड झाली आहे.दरवर्षी 26 जानेवारीला तहसील कार्यालय मोहोळ तर्फे घेण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थी सलग पाच वर्ष पहिल्या तीन मधील बक्षिसांचे मानकरी ठरले आहेत .विद्यार्थी हेच " माझे दैवत आणि काम हिच पूजा " या तत्त्वावर काम करत शिक्षकी पेशावर सदैव अभिमान बाळगत असल्याचे ते सांगतात .

     कोरोना काळात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या पारावरची शाळा , झाडाखालील शाळा , ऑनलाईन शाळा भरवत त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही .तसेच कोरोनाविषयक जनजागृती व्हावी म्हणून " माझे कुटुंब माझी जबाबदारी " या विषयावर शॉर्ट फिल्म निर्मिती केली .'कृतीतून आनंद पद्धतीने शिक्षण' या उपक्रमाला सर फाउंडेशनचा राष्ट्रीय इनोवेशन अवॉर्ड मिळाला आहे .

          आयसीटीसी इंट्रोडक्शन टू कॉम्पिटिशनल थिंकिंग या उपक्रमांतर्गत त्यांनी आपले प्रकल्प उत्कृष्टरित्या सादर केले बद्दल शाळेला स्मार्ट टीव्ही बक्षीस मिळाला आहे.स्वतःचे यूट्यूब चैनल वरती शैक्षणिक व्हिडिओ, उपक्रमांचे व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी प्रसारित करत असतात. विविध वर्तमानपत्रात प्रासंगिक सामाजिक व शैक्षणिक लेख लिहिण्याची त्यांना आवड आहे . बी एड . एम ए एज्युकेशन पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे.

त्यांच्या या शैक्षणिक कार्याबद्दल आजपर्यंत त्यांना

मोहोळ तालुका पंचायत समितीतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार

सर फाउंडेशन राष्ट्रीय इनोवेशन अवॉर्ड .

जिल्हा परिषद अल्पसंख्यांक अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र यांच्यातर्फे अल्पसंख्यांक गुणवंत कर्मचारी पुरस्कार 

मोहोळ नगरपरिषद मोहोळ 'माझी वसुंधरा 'अभियान व्हिडिओ ग्राफी अवॉर्ड

महाराष्ट्र सिने कला गौरव तर्फे उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

Wednesday, 3 April 2024

26.दिव्यांग विद्यार्थ्याला सुपरस्टार सिंगर बनवणारे शरणप्पा फुलारी गुरुजी

 दिव्यांग विद्यार्थ्याला सुपरस्टार सिंगर बनवणारे शरणप्पा फुलारी गुरुजी


        विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी दर वर्षी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वतीने विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा घेतल्या जातात. कन्नड भाषेत वक्तृत्व,कथाकथन,बालनाट्य ,

समूहगीत गायन, लोकनृत्य आदी स्पर्धेत दर वर्षी शरणाप्पा फुलारी गुरुजी यांच्या मार्गदर्शना खाली केंद्र, बीट,तालुका आणि जिल्हा स्तरावर त्यांचे विद्यार्थी यश संपादन करतात . एवढचं नाही तर विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत खो खो ,कबड्डी,धावणे, रीले इत्यादी मध्ये जिल्हा स्तरावर त्यांच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. याशिवाय कर्मचारी क्रीडा स्पर्धेत खो,खो,क्रिकेट,व्हॉलीबॉल यासारख्या स्पर्धेत ही जिल्हास्तरीय अजिंक्य पद त्यांनी पटकावले असून यात फुलारी गुरुजी यांचा मोठा वाटा आहे. सध्या ते जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा नागणसूर ता. अक्कलकोट येथे कार्यरत आहेत

         सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड साहेब यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी गुणवत्ता शोध (टॅलेंट हंट स्पर्धा ) सुरू झाल्या.या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेला एक दिव्यांग विद्यार्थी चमकला.कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती वसलेल्या तोळणूर सारख्या एका छोट्याशा गावातून डोळ्यानं जन्मजात अंध असलेला दिव्यांग विद्यार्थी रेवणसिद्ध फुलारी .. हाताला मिळालेलं प्लास्टिक, घागर,बकेट,टोपली वाजवत संगीत वाद्य प्रकारात आपली कला दाखवत गेला. तबला वादन,हार्मोनियम वादन,कशियो, ड्रम,वाजवत संगीत क्षेत्रात त्यानं पाऊल ठेवत गायनाची प्रॅक्टिस सुरू केली . प्रत्येक वर्षी विविध स्पर्धेत गुरुजींच्या सहकार्यान तो यश मिळवत गेला. कर्नाटक राज्यातील नंबर वन सिंगिंग रियालिटी शो असलेल्या झी कन्नड वाहिनीवरील सारेगमप लिट्ल चॅम्प्स सीजन 19 च्या शो मध्ये सहभाग घेवून मेगा ऑडिशन मध्ये यश संपादन करून सहा महिने चाललेल्या या स्पर्धेत फायनल पर्यंत मजल मारून थर्ड रनर अप झालेला महाराष्ट्र राज्यातील पहिला दिव्यांग विद्यार्थी ठरला. असून त्याला संपूर्ण मार्गदर्शन शरणप्पा गुरुजी यांनी केलं आहे . 

      प्राथमिक शाळेत मुलं शिकत असताना त्यांच्यामध्ये असलेले वेगवेगळे गुण हेरून त्यांच्या गुणांना चालना देणं हे खरंतर शिक्षकांचं काम असतं. ते काम अगदी प्रामाणिकपणे फुलारी गुरुजींनी केलेलं इथं दिसून येतं.

 

यासोबतच आजपर्यंत त्यांनी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये खूप उत्कृष्टपणे काम केलेलं आहे. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुली शाळा नागणसुर,तोळणुर,जकापुर, बबलाद आणि नागणसुर कन्नड मुली शाळा लोकसहभागातून शाळा समृद्ध करून डिजिटल स्मार्ट शाळा, ई लर्निंग टॅब शाळा सुरू करणारे जिल्ह्यातील एकमेव कन्नड शिक्षक. शिष्यवृत्तीसाठी त्यांचा खूप मोठं योगदान आहे.आतापर्यंत त्यांच्या 55 विद्यार्थ्यांची पूर्वमाध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती गुणवत्ता धारक विद्यार्थी म्हणून निवड झाली आहे . तर एका विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.

शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आला आहे त्यामध्ये

तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुरस्कार

राज्यस्तरीय नवोपक्रमशिल शिक्षक पुरस्कार

राष्ट्रीय नवोपक्रमशिल शिक्षक पुरस्कार

 सर फाउंडेशन राष्ट्रीय नवोपक्रम शिल शिक्षक पुरस्कार

7 स्किल राष्ट्रीय पुरस्कार गुजरात

आतापर्यंत 24 वर्षाच्या शैक्षणिक कार्यात महत्वाचे जिल्हा,राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील 65 पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.