विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Wednesday, 27 March 2024

25.जाईल तिथं खेळाडू घडवणारे भारती गुरुजी

 उजनी धरण पट्ट्यातील करमाळा तालुक्यापासून 35 किलोमीटर अंतरावरची छोटीशी नरसोबाची वाडी. सर्वत्र बागायत, ऊसाची शेती रस्त्याची उणीव. शिक्षणाची मात्र सर्वांनाच गोडी.कमीच पटसंख्या असणारी पण क्रीडा स्पर्धेसाठी जिद्दीला पेटलेली इथली शाळा ,विद्यार्थी, पालक आणि शिक्षक महदेव भारती गुरुजी .ध्येय समोर ठेऊन कार्य करण्याची पहिल्यापासूनच आवड. संधी असणाऱ्या क्षेत्रात आणि संधी मिळालेल्या ठिकाणी काम करण्याची मजा वेगळीच असते असं त्यांना वाटतं.

     सुरवातीला जेमतेम वीस पट असणाऱ्या शाळेतील गुरुजींनी पालक संपर्क वाढवत गाव आणि शाळा एकत्र आणली. गावामध्ये शाळेविषयी गोडी निर्माण केली. खूप मोठ्या प्रमाणात लोकसहभाग गोळा केला. शाळा आयएसओ मानांकन दर्जाची झाली. हळूहळू पालकांचा शिक्षकांवर आणि शाळेवर विश्वास बसला. सोबतीला पाटील गुरुजी होतेच. खूप मोलाची साथ त्यांनी दिली. वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम, स्पर्धात्मक तयारी,शिक्षणाला खेळाची नाविन्यपूर्ण जोड,विद्यार्थी सर्वांगीण विकास पूरक कार्यक्रम राबवित शाळेने ५२ पटापर्यंत मजल मारली.

         आपला ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागं राहू नये ही ओढ कायम मनात ठेवत जिल्हा परिषदेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या खेळांच्या स्पर्धेत शाळेनं भाग घेतला.अपुरं मैदान,मैदानावर आवश्यक असणाऱ्या सोयींची कमतरता .पट संख्या कमी मुलींचा पट तर अवघा १३ अशाही परिस्थितीत शिक्षक अन मुलांच्या जिद्द व चिकाटीनं खो खो क्रीडा प्रकारात शाळेच्या संघांन जिल्हा उपविजयी अन सलग दोन वेळा जिल्हास्तरीय विजेतेपद पटकावित छोट्या शाळेचं नाव जिल्ह्यात चमकवलं . छोटसं मैदान एक पोल गेटच्या बाहेर, माफक जागा पण विद्यार्थ्यांनी दाखवलेलं खेळातलं कसब. दिवस रात्र सराव घेण्याची शिक्षकांची धडपड.. जेष्ठ कवी गुरु ठाकूर एके ठिकाणी म्हणतात, 'असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर' अगदी तसच आलेल्या प्रत्येक अडचणीवर मात करायची सवय गुरुजींनाही लागलेली . शाळेला भरपूर पटसंख्या आणि भल्या मोठ्या मैदानाची गरज नसते तर तिथे असते अशा जिद्द आणि चिकाटी धारण केलेल्या महादेव भारती सारख्या शिक्षकाची.

       आपली खेळातली आवड जोपासत श्री भारती गुरुजी यांनी गुरू स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांच्या खेळांच्या कौशल्यास चालना दिली.धावणे,भालाफेक,गोळाफेक, लांब उडी,खो खो,कबड्डी या खेळांचं मोफत मार्गदर्शन सुरू केलं.मुलांमध्ये शून्यातून विश्व निर्माण करण्याची धडपड जोमानं सुरू झाली.यातूनच नुकत्याच १४ वर्षे वयोगटातून डेरवण,सिंधुदुर्ग येथे झालेल्या सब ज्युनिअर खेळात साक्षी आरकिले हिनं राज्यात तिसरा क्रमांक ,तर १२ वर्षे वयोगटातून सोलापूर येथे झालेल्या स्पर्धेत अंतरा आरकिले व जान्हवी पाबळे हिने प्रथम व तृतीय क्रमांक पटकावला. १० वर्षे वयोगटातून सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेत चैतन्य मोरे याने प्रथम क्रमांक पटकावला.

        यासोबतच बदली होऊन नव्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. मंगवडेवस्ती शाळेतील मुलांनी सुद्धा कबड्डी स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला.जाईल तिथं खेळात मुलं घडवनं गे गुरुजींचं कामचं   

           तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

सर फौंडेशनचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषेदेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

विविध पतसंस्थानी तालुकास्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे .

Friday, 22 March 2024

24.इंग्रजीच्या प्रभुत्व संपादनाचा अध्यापनात वापर करणारी विद्यार्थी प्रिय शिक्षिका माधुरी भोसले

 

      

केवळ घेतलेल्या शिक्षणावरच आणि मिळालेल्या नोकरीवरच समाधान न मानता चूल ,मूल ,सासर आणि माहेर यासोबतच सर्व नातेसंबंध जपत शाळेतील विद्यार्थ्यांकडं दुर्लक्ष न होऊ देता आपलं पीएचडी पर्यंतचं शिक्षण पूर्ण करणं हे नक्कीच महिलांसाठी तरी सोपं नाही.

         इंग्रजी सारख्या विषयात डॉक्टरेट व सिनियर कॉलेजला लेक्चरर होण्या साठी लागणारी सेट परीक्षा क्वालिफाय असणाऱ्या उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील श्रीमती माधुरी भोसले या विज्ञान विषय शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

               भोसले मॅडम या उत्तम कवयित्री, लेखिका, अनुवादक व सूत्रसंचालक म्हणूनही सुपरिचित आहेत. कला, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांना आवड आहे, नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात नियोजन समिती मधील त्यांचं सक्रिय योगदान सर्वपरिचित आहे.  

        ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शिक्षक म्हणून सामाजिक बांधिलकी जपत सातत्यानं त्या नवनवीन उपक्रम राबवित असतात. नवोदय ,शिष्यवृत्ती यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांचे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक व नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरले आहेत. 

          व्हर्चुअल फील्ड ट्रिप, ई लर्निंग चा अध्यापनात वापर, शैक्षणिक साहित्य निर्मिती, वृक्षारोपण, स्नेहसंमेलने, शालेय क्रीडा स्पर्धा यासारखे उपक्रम शालेय स्तरावर राबवून विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास त्या साधत असतात. 

    त्यांनी शाळेला बालाजी अमाईन्स, प्रीसिजन यासारख्या कंपन्यांच्या सी एस आर फंडातून, अथवा लोकसहभागातून निधी उपलब्ध करून शाळेला भौतिक सुविधा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. मार्डी शाळेत त्यांनी जवळपास चार ते पाच लाखाचा निधी लोकसहभागातून प्राप्त करून गावकऱ्यांच्या व शिक्षकांच्या मदतीनं शालेय परिसरात बदल घडवून आणला आहे. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेसाठी त्यांनी मान्यवर परीक्षकांसोबत परीक्षणाचं काम केलं आहे. मासिक पाळी सारख्या विषयावरही त्या किशोरवयीन मुलींना प्रबोधन करतात. विद्यार्थी संगणक साक्षर व्हावेतयासाठी त्या प्रयत्नशील असतात. कोविड-19 च्या काळात सोलापूर जिल्हा परिषद ने सुरु केलेल्या युट्युब चॅनल साठी व्हिडिओ निर्मितीमध्ये त्यांचं मोठं योगदान होतं. त्यासाठी त्यांना जिल्हा परिषदनं कोविडवाॅरीयर म्हणून सन्मानित केलं होतं.      

            विद्यार्थ्यांमध्ये सॉफ्ट स्किल्स वाढवण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. क्रिएटिव्ह थिंकिंग साठी त्यांनी विद्यार्थ्यांकरता काव्यलेखन शिबीर आयोजित केलं .यामधूनच विद्यार्थ्यांमध्ये काव्य लेखनाची आवड निर्माण झाली. लेट्स स्पीक इंग्लिश उपक्रमामुळं विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेबद्दलची भीती दूर होऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांचे अनेक विद्यार्थी देशातील नामांकित संस्थांमध्ये व परदेशातही उच्च शिक्षण घेऊन उच्चविद्याविभूषित झाले आहेत. जेव्हा हे विद्यार्थी 

 मॅडम यु आर द बेस्ट टीचर असं त्यांच्या तोंडून जेव्हा ऐकायला मिळतं. तो क्षण त्यांच्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण असतो. कुठल्याही पुरस्कारापेक्षा श्रेष्ठ पुरस्कार मिळाला असं त्यावेळी त्यांना वाटतं.    

     विद्यार्थ्यांना अध्ययनाला प्रवृत्त करत करत राज्यस्तरावर, जिल्हा स्तरावर त्यां रिसोर्स पर्सन म्हणून उत्तम कामगिरी करतात. जिल्हास्तरावर शिष्यवृत्ती मार्गदर्शक म्हणून ही त्यांचं योगदान आहे. 

इंग्लिश लँग्वेज इन्हान्समेंट प्रोग्रॅम साठी महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट आणि ब्रिटिश कौन्सिल कडून राबवल्या गेलेल्या तेजस प्रोजेक्ट साठी सतत तीन वर्ष कोऑर्डीनेटर म्हणून काम केलं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनाही प्रशिक्षण देऊन इंग्रजी भाषेबद्दल असणारी भीती दूर करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला.      

        या प्रोजेक्टच्या एंड अप प्रोग्रॅम करिता तत्कालीन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मॅडम यांच्यासमोर प्रेझेंटेशन साठी महाराष्ट्रातून निवडलेल्या पाच कोऑर्डिनेटर मध्ये त्यांचाही समावेश होता. रिजनल अकॅडमी औरंगाबाद(RAA) यांनी राबवलेल्या स्पोकन इंग्लिश प्रोग्रॅम करिता ट्रेनर म्हणूनही त्यांनी जवळपास शंभरहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या इंग्रजी विषयातील योगदानाबद्दल त्या राज्यस्तरावर द बेस्ट इंग्लिश टीचर म्हणून परिचित आहेत. इंग्लिश लँग्वेज ऑनलाइन वेबिनारसाठीही त्यांनी होस्ट म्हणून उत्कृष्ट अँकरिंग केलं आहे .

 त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये इंग्रजी विषयातील अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. नॅशनल व इंटरनॅशनल कॉन्फरन्सस मध्येही पेपर प्रेझेंटेशन साठी त्यांची निवड झाली आहे. त्यांचे कल्चर व आयडेंटिटी हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

 विविध वर्तमानपत्रातून त्यांच्या कथा, कविता तसेच मोटिवेशनल लेख विशेष करून युवा वर्गासाठी प्रकाशित होत असतात.

          इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनाही व्याख्यानातून त्या इंग्रजी विषयाबाबत मार्गदर्शन करतात. त्या महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जुळे सोलापूरच्या कार्यकारणी सदस्य ही आहेत

 ज्या ज्या ठिकाणी मॅडमची सेवा झाली त्या त्या गावातील त्यांचा विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्याशी जोडला जातो. एक विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. 

         राज्यातील उच्चविद्याविभूषित शिक्षकांना प्रशासनात सहभागी करून घ्यावं असं त्यांना वाटलं . त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विविध राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. यामध्ये


डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचा राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार

 अपूर्वा अभिमीत ज्ञानपीठ राज्यस्तरीय पुरस्कार

सोलापूर जिल्हा परिषदेचा शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुरस्कार

सर फाउंडेशन चा जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कार

छत्रपती परिवार मरवडेंचा कृतीनिष्ठ शिक्षक पुरस्कार

पंचायत समिती उत्तर सोलापूरचा आदर्श शिक्षक पुरस्कार. अशा विविध पुरस्कारांचा समावेश आहे.

Wednesday, 13 March 2024

23.गावाला शाळेचा अभिमान आणि शाळेला गावाचा आधार असं म्हणत ललिता मोरे मॅडम यांची शाळा राज्यात तिसरी

 गावाला शाळेचा अभिमान आणि शाळेला गावाचा आधार असं म्हणत ललिता मोरे मॅडम यांची शाळा राज्यात तिसरी

        प्रति महाबळेश्वर म्हणून ज्या गावाचा उल्लेख केला जातो असे निसर्गाच्या कुशीत वसलेले , अध्यात्माच्या वाटेवरील कृषी पर्यटन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर तालुक्यात असणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचणी. सातारा जिल्ह्यातून विस्थापित होऊन पुनर्वसन झालेल्या चिंचणी या छोट्याशा गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आज राज्याच्या नकाशावर मोठया दिमाखानं झळकत आहे. ही शाळा पाहण्यासाठी राज्यभरातून लोक इथं येतात. तेव्हा त्याच्या तोंडी रविंद्रनाथ टागोर यांच्या "शांतीनिकेतन" शाळेची आठवण झाल्याचे सहज उद्गार बाहेर पडतात. गावच्या विकासाबरोबरच शाळेचा विकासही व्हावा या ध्येयानं झपाटून गावकर्‍यांच्या मदतीनं शाळेमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ललिता सौदागर मोरे.

            शाळेची पटसंख्या वाढवणं आणि ती टिकवून ठेवणं हे पहिलं काम त्यांनी हाती घेतलं. आसपास पसरलेलं खाजगी शाळांचं जाळं पालकांचा इंग्रजी शाळेकडं असणारा ओढा ही मोठी संकट पार करत त्यांनी आपल्या सहकारी शिक्षकांच्या मदतीनं काम सुरू केलं. यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन केलं . शाळा प्रवेशोत्सव, आषाढी वारी उपक्रम, विविध सण थोर व्यक्तींची जयंती, विविध स्पर्धा स्नेहसंमेलन इत्यादी कार्यक्रमाचं आयोजन करून पालकांना शाळेत आणलं. विद्यार्थ्यांसोबतच पालकांना आपल्याच मराठी शाळेची गोडी लावली. व्यवहार ज्ञान वाढवण्यासाठी बाजार डे, बँक भेट, परिसर भेट हे उपक्रम दरवर्षी सुरु केले. तसेच विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी म्हणून गेल्या चार वर्षापासून विद्यार्थी' बचत बँक' हा उपक्रम हाती घेतला. बचत बँकेचं कामकाज शाळेतील विद्यार्थ्याकडेच दिलं जातं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी व त्यांच्यावर संस्कार व्हावे यासाठी दर 'वर्षी स्मार्ट गर्ल व स्मार्ट बॉय' निवडून त्याला योग्य ते बक्षीस दिलं जातं. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी घेतली जाते. शाळा जरी द्विशिक्षकी असली तरी सर्व भौतिक सुविधांनी परिपूर्ण आहे. शाळेतील शिक्षकांनी शैक्षणिक उठावातून दोन संगणकसंच, दोन एलईडी संच, प्रोजेक्टर मिळवले आहेत. लोकसहभागातून जवळपास पाच लाखांचं काम शाळेमध्ये केलं आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी टॅब उपलब्ध असून पहिलीची मुले सुद्धा टॅबवर अभ्यास करतात. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आव्हाळे मॅडम यांनी सुद्धा या गोष्टीची दखल घेतली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा कौशल्याधिष्ठित अभ्यास पूरक असणाऱ्या विविध प्रकारच्या लघु उद्योगांना भेटी देण्याचं आयोजन केलं जातं. 

      शाळेला भेट देणाऱ्या मोठमोठ्या पाहुण्यांना सुद्धा अगदी पहिलीतील मुलं सुद्धा बिनधास्तपणे संवाद साधतात. राष्ट्रीय सणांच्या दिवशी शाळेतील सर्वच मुले धीटपणे भाषण करतात. शाळेतील विद्यार्थी चित्रकला, कथाकथन, व वक्तृत्व स्पर्धेत चमकत आहेत. विद्यार्थ्यांचा वाढदिवस शाळेतच साजरा केला जातो. व याप्रसंगी शाळेला लागणारं साहित्य विद्यार्थ्यांच्या पालकाकडून विद्यार्थ्यांना वाटप केलं जातं. अशा प्रकारे लोकसहभागातून शैक्षणिक उठावातून शाळेमध्ये , भौतिक सुविधात वाढ करून एखाद्या खाजगी शाळेप्रमाणं ही जिल्हा परिषदेची शाळा उभी केली. कोरोना काळा सुद्धा "पारावरची शाळा" या उपक्रमाद्वारे मॅडम सह इतर शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना अध्यापन केलं. गावकऱ्यांच्या सहकार्यानं शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीनं शाळेसमोर लाल मातीचं मैदान तयार करणं, पेवर ब्लॉक टाकणं, डिजिटल वर्ग खोल्या तयार करणं, ही सर्व कामं शाळेतील शिक्षक श्री जालिंदर गोरख गायकवाड गुरुजी व गावातील शिक्षण प्रेमी श्री. मोहन दादा अनपट,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सावंत व त्यांचे सर्व सहकारी ग्रामस्थांनी मोलाची मदत केली.

      शाळेमध्ये आकर्षक रंगरंगोटी केली. शाळेनं दोन वर्षापूर्वी घेतलेल्या स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियानात द्विशिक्षकी गटात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. असून राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार व तत्कालीन पालकमंत्री मा. दत्तात्रय भरणेमामा यांच्या हस्ते शाळेचा मंत्रालयात सत्कार झाला. 

         तसेच वर्षी राज्यस्तरावर आयोजित करण्यात आलेल्या *"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" स्पर्धेत पुणे विभागात तृतीय क्रमांक प्राप्त झालेला असून अकरा लाखाचे बक्षीस प्राप्त झाले आहे*. 'गाव करी ते राव काय करी' या उक्तीप्रमाणं शिक्षक व गावकरी यांनी एकत्र येऊन काम केलं तर शाळेची व गावाची प्रगती कशी होऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचणी . जसा मुख्याध्यापक तशी शाळा हे श्रीमती लता मोरे मॅडम यांनी सर्व गावकरी आणि शिक्षकांच्या मदतीनं सिद्ध करून दाखवलं.

Wednesday, 6 March 2024

22. दोनशेहून अधिक व्यक्तिमत्त्वांचा ऑटोग्राफ घेणारा छंदवेडा शिक्षक रवींद्र देबडवार

 दोनशेहून अधिक व्यक्तिमत्त्वांचा ऑटोग्राफ घेणारा छंदवेडा शिक्षक रवींद्र देबडवार


       'हा छंद जीवाला लावी पिसे' प्रसिद्ध गीतकार वंदना विटणकर यांचं हे सुंदर गीत! ऐकलं की वाटतं, खरंच माणसाला छंद वेड लावतो. आपलं वय विसरायला लावतो आणि अशा विविध छंदातच माणसाला आनंदी जगण्याचा मार्ग गवसतो. काव्य लेखन, काव्यवाचन, योगाभ्यास, कला आणि नाट्याभिनय यासोबतच नामवंत व्यक्तिमत्त्वाचा ऑटोग्राफ घेणं हा छंद जडलाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटफळ येथील रवींद्र देबडवार गुरुजी यांना!

          हेमा मालिनी,जॅकी श्रॉफ, मोहन जोशी, जब्बार पटेल, वर्षा उसगावकर, जयश्री गडकर, मच्छिंद्र कांबळी, विक्रम गोखले, द.मा मिरासदार, गणपतराव देशमुख, प्रशांत दामले, मकरंद अनासपुरे, गजेंद्र अहिरे, चंद्रकांत कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, आसावरी देशपांडे, सुशांत शेलार, मयूर वैद्य, अशोक शिंदे, अशोक सराफ, राहुल देशपांडे, अशी भली मोठी यादी दोनशेच्या पार जाते. यामध्ये मराठी व हिंदी,चित्रपट कलावंत,गायक,वादक,

किर्तनकार,नाटक कलावंत,लेखक कवी,राजकीय,सामाजिक व्यक्तीमत्वांचा समावेश आहे.अशी प्रत्येक व्यक्तिमत्वं जाणून घ्यावीत, यातून प्रत्येकाकडूनच काहीतरी शिकत जावं हा संदेश ते आपल्या विद्यार्थ्यांना देत असतात. याशिवाय जाणता राजा या महानाट्यात,संत नामदेव या मालिकेत तसेच अनेक पथनाट्यांमधून त्यांनी आपली कला जोपासली आहे.

             ते उत्तम योग शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच योग आणि प्राणायाम यांचं महत्त्व कळावं यासाठी दर शनिवारी योगाचा तास घेतात. व्यायाम,ध्यानधारणा,प्राणायाम,बैठे,खडे,दंड स्थितीतील योगप्रकार,झुम्बा, अँरोबिक्स,हास्य योग,टाळीयोग, सूर्यनमस्कार असे पन्नास पेक्षा जास्त योगासने त्यांचे विद्यार्थी करतात.अशा विविध कौशल्यपूर्ण व मनोरंजक पद्धतीमुळं मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास साधण्याचा ते प्रयत्न करतात.

           याशिवाय लेखक आपल्या भेटीला,शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरे,शैक्षणिक साहित्य निर्मिती,ओरीगामी कला,स्पर्धा परीक्षा,ऐतिहासिक कथाकथन,कथावाचन,कविता वाचन,संस्कृत पठन - वाचन,पत्रलेखन,विरांना सलाम अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना वाचते,बोलते,लिहिते करत कृतीशील बनवत आहेत.उत्कृष्ट सुत्रसंचलन,फलकलेखन,चित्रकला ,हिरव्या पालेभाज्या खाणे,प्लास्टीक डबामुक्ती,पैसे बचत,हरवले-सापडले,माझा वाढदिवस,तथास्तु,अशा छोट्या छोट्या उपक्रमांतुन जीवन कौशल्य ,संस्कार,नितीमुल्ये देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. इंग्रजी माध्यमाकडचा विद्यार्थ्यांचा ओढा कमी होऊन जि.प.शाळेत मुले दाखल झाली पाहिजेत यासाठी ते सतत प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.यासाठी शाळेतील सर्व शिक्षक सहकार्यांची मदत मिळत आसल्याचेही ते सांगतात.

        

त्यांच्या या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना

कोळेगावचा आदर्श शिक्षक पुरस्कार,दिपकआबा साळुंखे शिक्षक सहकारी पतसंस्थेचा उपक्रमशिल शिक्षक पुरस्कार,शिक्षक ध्येयचा कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार इ. पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

Sunday, 3 March 2024

21.शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यामध्ये सामाजिक जाणीवा निर्माण करणारे अनगरचे पी.बी. शिंदे सर.

  



विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी बौद्धिक, शारीरिक, मानसिक विकासाची जशी गरज असते तशाच सामाजिक जाणीव त्याच्यामध्ये विकसित व्हायला हव्यात यासाठी स्काऊट गाईड, कब बुलबुल, यासारखे शाळा शाळांमध्ये उपक्रम आयोजित केले जातात. श्री शिंदे सरांनी

कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अनगर येथे राष्ट्रीय सेवा योजना मध्ये खूप मोठे काम केले आहे. गेले पंचवीस वर्षे उच्च माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर श्रमाचे संस्कार करण्याचे काम अखंडपणे सुरू ठेवले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना जागृत करुन त्या भावनेतून विद्यार्थी मनोभावे सामाजिक कार्य करताना दिसून येतात. 

       या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, पाणी आडवा पाणी जिरवा, स्वच्छ भारत अभियान, मुली वाचवा अभियान, प्लास्टिक मुक्त गाव योजना, व्यसनमुक्ती चळवळ, हागणदारीमुक्त गाव योजना, मतदार जागृती अभियान, एक पद एक वृक्ष इत्यादी सामाजिक जनजागृतीचे कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत आयोजित केले जातात.

         विद्यार्थी मनोभावे यामध्ये सहभागी होतात. विद्यार्थ्याच्या मनावर श्रमाचे संस्कार व्हावेत यासाठी दरवर्षी एक गाव दत्तक घेऊन तेथे सात दिवसाचे श्रमसंस्कार शिबीर आयोजित केले जाते. या काळात गावामध्ये वरील सर्व सामाजिक उपक्रम राबविले जातात. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत. नुकताच सुनील लोंढे नावाच्या विद्यार्थ्यांला पुणे विभाग स्तरावरील उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून पुरस्कार मिळाला आहे हेच राष्ट्रीय सेवा योजनेचे यश म्हणावे लागेल.

        आजपर्यंत शालेय परिसरात दोन हजार पेक्षा जास्त झाडाचे रोपण करून संपूर्ण झाडे जगवली. त्यामुळे शाळेला "हरित शाळा" पुरस्कार मिळाला. दत्तक गावामध्ये संपूर्ण वृक्षारोपण करून तेथील लोकांमध्ये झाडाबद्दल प्रेम निर्माण केले. अंजनगाव (खे.) ता. माढा या ठिकाणी शिबीर कालावधीत चाळीस लाख लिटर क्षमतेचा वनराई बंधारा बांधून गावाची उन्हाळ्यातील पाण्याची समस्या दूर केली. गेल्या वर्षी कुंभेज ता. माढा या ठिकाणी शिबीर काळात "चला जाणून घेऊया नदीला" या मोहिमेअंतर्गत नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले व सीना नदीपात्र स्वच्छ करण्यात आले. कोरोना काळात मास्क, सानीटायझर वाटप, संपूर्ण लसीकरण मोहीम राबविण्यात आली. कालच्या दिवाळी सुट्टीला जाण्याअगोदर तीन हजार विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथपत्र भरून दिली. नुकत्याच संपलेल्या नव मतदार नोंदणी अभियानामध्ये उच्च माध्यमिक स्तरावर अठरा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नवमतदार म्हणून नोंद केली. केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल मोहोळचे तहसीलदार मा. श्री. सचिन मुळीक यांनी सन्मानपत्र देऊन गौरव केला. मुख्यमंत्री-माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान संपूर्ण राज्यांमध्ये सुरू आहे. या अभियानात शाळा तालुक्यात पहिल्या क्रमांकाने यशस्वी झाली व तालुकास्तरावरचे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस जिंकले. या सर्व कामांमध्ये शाळेतील प्रत्येक मानवी घटकाचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे सहभाग असतो तेव्हाच हे शक्य होते. हे सर्व काम विद्यार्थी मनोभावे करतात व कामाचा आनंद लुटतात. मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. त्या ऊर्जेला योग्य वळण दिले म्हणजे विद्यार्थ्याच्या व्यक्तीत्त्वाचा विकास होण्यास मदत होते. हे सर्व शक्य झाले ते केवळ येथील मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. चंद्रकांत ढोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कामामुळेच. शासन स्तरावर केलेल्या कार्याची दखल घेऊन नुकताच शिंदे यांना शिक्षण संचालनालय, पुणे विभाग पुणे यांचे कडून "उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी" हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू इन्स्टिटय़ूट ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनीस्ट्रेशन या संस्थेने "दिनकर मास्तर सर्जनशील शिक्षक पुरस्कार" देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच संस्थेनेही "प्रज्ञावान वर्गशिक्षक" पुरस्कार देऊन गौरव केला. हे सर्व करत असताना विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आमूलाग्र बदल होत आहे,आणि हाच माझ्यासाठी सर्वोत्तम पुरस्कार मी मानतो.असे श्री. शिंदे म्हणतात.