उजनी धरण पट्ट्यातील करमाळा तालुक्यापासून 35 किलोमीटर अंतरावरची छोटीशी नरसोबाची वाडी. सर्वत्र बागायत, ऊसाची शेती रस्त्याची उणीव. शिक्षणाची मात्र सर्वांनाच गोडी.कमीच पटसंख्या असणारी पण क्रीडा स्पर्धेसाठी जिद्दीला पेटलेली इथली शाळा ,विद्यार्थी, पालक आणि शिक्षक महदेव भारती गुरुजी .ध्येय समोर ठेऊन कार्य करण्याची पहिल्यापासूनच आवड. संधी असणाऱ्या क्षेत्रात आणि संधी मिळालेल्या ठिकाणी काम करण्याची मजा वेगळीच असते असं त्यांना वाटतं.
सुरवातीला जेमतेम वीस पट असणाऱ्या शाळेतील गुरुजींनी पालक संपर्क वाढवत गाव आणि शाळा एकत्र आणली. गावामध्ये शाळेविषयी गोडी निर्माण केली. खूप मोठ्या प्रमाणात लोकसहभाग गोळा केला. शाळा आयएसओ मानांकन दर्जाची झाली. हळूहळू पालकांचा शिक्षकांवर आणि शाळेवर विश्वास बसला. सोबतीला पाटील गुरुजी होतेच. खूप मोलाची साथ त्यांनी दिली. वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम, स्पर्धात्मक तयारी,शिक्षणाला खेळाची नाविन्यपूर्ण जोड,विद्यार्थी सर्वांगीण विकास पूरक कार्यक्रम राबवित शाळेने ५२ पटापर्यंत मजल मारली.
आपला ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागं राहू नये ही ओढ कायम मनात ठेवत जिल्हा परिषदेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या खेळांच्या स्पर्धेत शाळेनं भाग घेतला.अपुरं मैदान,मैदानावर आवश्यक असणाऱ्या सोयींची कमतरता .पट संख्या कमी मुलींचा पट तर अवघा १३ अशाही परिस्थितीत शिक्षक अन मुलांच्या जिद्द व चिकाटीनं खो खो क्रीडा प्रकारात शाळेच्या संघांन जिल्हा उपविजयी अन सलग दोन वेळा जिल्हास्तरीय विजेतेपद पटकावित छोट्या शाळेचं नाव जिल्ह्यात चमकवलं . छोटसं मैदान एक पोल गेटच्या बाहेर, माफक जागा पण विद्यार्थ्यांनी दाखवलेलं खेळातलं कसब. दिवस रात्र सराव घेण्याची शिक्षकांची धडपड.. जेष्ठ कवी गुरु ठाकूर एके ठिकाणी म्हणतात, 'असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर' अगदी तसच आलेल्या प्रत्येक अडचणीवर मात करायची सवय गुरुजींनाही लागलेली . शाळेला भरपूर पटसंख्या आणि भल्या मोठ्या मैदानाची गरज नसते तर तिथे असते अशा जिद्द आणि चिकाटी धारण केलेल्या महादेव भारती सारख्या शिक्षकाची.
आपली खेळातली आवड जोपासत श्री भारती गुरुजी यांनी गुरू स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांच्या खेळांच्या कौशल्यास चालना दिली.धावणे,भालाफेक,गोळाफेक, लांब उडी,खो खो,कबड्डी या खेळांचं मोफत मार्गदर्शन सुरू केलं.मुलांमध्ये शून्यातून विश्व निर्माण करण्याची धडपड जोमानं सुरू झाली.यातूनच नुकत्याच १४ वर्षे वयोगटातून डेरवण,सिंधुदुर्ग येथे झालेल्या सब ज्युनिअर खेळात साक्षी आरकिले हिनं राज्यात तिसरा क्रमांक ,तर १२ वर्षे वयोगटातून सोलापूर येथे झालेल्या स्पर्धेत अंतरा आरकिले व जान्हवी पाबळे हिने प्रथम व तृतीय क्रमांक पटकावला. १० वर्षे वयोगटातून सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेत चैतन्य मोरे याने प्रथम क्रमांक पटकावला.
यासोबतच बदली होऊन नव्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. मंगवडेवस्ती शाळेतील मुलांनी सुद्धा कबड्डी स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला.जाईल तिथं खेळात मुलं घडवनं गे गुरुजींचं कामचं
तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
सर फौंडेशनचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषेदेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
विविध पतसंस्थानी तालुकास्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे .