विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Wednesday, 28 August 2024

41.आनंददायी शिक्षणासाठी नवे प्रयोग करणाऱ्या कल्पना घाडगे

        

     व्हाट्सअप ,फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील शिक्षकांना 'आयडियाची कल्पना' या नावानं परिचित असणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना छोट्या मोठ्या उपक्रमातून आनंददायी आणि मनोरंजनात्मक पद्धतीनं शिक्षण देत त्यांच्यामध्ये अमुलाग्र बदल घडवणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अरण येथील एक उपक्रमशील विद्यार्थी प्रिय शिक्षिका कल्पना घाडगे.गेले तेवीस वर्षे माढा तालुक्यातील विविध प्राथमिक शाळांमधून शिक्षण क्षेत्रात त्या नवनवीन प्रयोग करीत आहेत.

       अरण ही आयएसओ मानांकन प्राप्त असून जिल्ह्यातील एक नावाजलेली शाळा आहे. ज्या शाळेला बरडावरची शाळा म्हटलं जायचं ती शाळा आज हरित शाळा म्हणून ओळखली जाते.इथल्या प्रत्येक गोष्टीवर, वस्तूवर, झाडावर त्या मनापासून प्रेम करतात. ओसाड माळरानावर असणाऱ्या शाळेचे रूपांतर हरित शाळेत करण्यात, शाळेचा पट वाढविण्यात, शाळेच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यात, शैक्षणिक उठावातून शाळेची भौतिक सुविधा पूर्ण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

     अरण मधील शिक्षण प्रेमी ग्रामस्थांनी सुमारे साडेतीन लाख रुपयांची कायम ठेव ठेवून आजी माजी विद्यार्थी कल्याणकारी विकास संस्था स्थापन केली. त्या संस्थेच्या सचिव म्हणून त्या काम पाहतात. शाळेच्या शतक महोत्सवानिमित्त शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या मदतीनं शाळेमधील सहकारी शिक्षकांच्या मदतीनं किलबिल बालोद्यान निर्माण केलं आहे.

     कोरोना काळात त्यांच्याकडं आलेल्या पहिलीच्या वर्गाची पहिलीची किलबिल खूपच गाजली. या काळात त्यांनी फक्त अरण मधीलच नाहीत तर इतर भागातील विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन मार्गदर्शन केलं यामुळं त्या सर्वदूर परिचित झाल्या. त्यांनी स्वतःचं यूट्यूब चैनल सुरू केलं. या चॅनलच्या माध्यमातूनही अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. ऑनलाईन टेस्ट लेक्चर, संडे ऍक्टिव्हिटी, गुगल मॅप मीटिंग, टेस्ट, अशा अनेक उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा छंद लावण्यात घडागे यशस्वी झाल्या.

       सह्याद्री महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक स्त्रियांना लघुउद्योगासाठी त्यांनी प्रवृत्त केलं आहे. मिशन ग्रीन अरण अंतर्गत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं वृक्षांची लागवड केली. 

       विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयी जाणीव जागृती होण्यासाठी जलदिन, वनदिन, चिमणी दिवस, वसुंधरा दिन, पर्यावरण दिन असे अनेक दिन साजरे करून त्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देऊन पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न त्या करतात.

  मुली व महिलांना रांगोळीचे प्रशिक्षण त्यांनी दिलं आहे. वृत्तपत्र लेखन त्यांनी केले आहे.

 पत्रलेखन, शैक्षणिक सहली, वनभोजन, परिसर भेट, व्यावसायिकांच्या मुलाखती, किशोरी मेळावा, कार्यानुभव अंतर्गत विविध वस्तू तयार करणं, पाढे पाठांतर स्पर्धा स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य, रजेच्या काळात पालकांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, आठवडी बाजार, विविध दिन साजरे करणं, लोकशाही पद्धतीनं वर्ग स्तर मंत्रिमंडळांचं प्रात्यक्षिक निवडणूक, वर्ग स्तरावर व शाळा स्तरावर विविध स्पर्धा असे अनेक मुलांच्या हाताला काम व मेंदूला चालना देणारे उपक्रम त्या राबवतात. त्यांच्याकडे असलेल्या वर्गाची प्रश्नपेढी त्या स्वतः तयार करतात. बरेचसे साहित्य हे स्वनिर्मित, विद्यार्थ्यांच्या मदतीनं व पालकांच्या सहकार्यानं तयार केलेलं असतं. त्यांचे आजपर्यंत अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाले आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका शांता वाघमोडे आणि शाळेतील इतर सर्व सहशिक्षक यांच्या मदतीनं शाळेत शिष्यवृत्तीचे जादा तास त्या घेतात.

 जिल्हा परिषद सोलापूरचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

      त्यांना प्रवासाची व वाचनाची आवड आहे. प्रवासानंतर पाहिलेल्या ठिकाणांचे प्रवास वर्णन त्या अतिशय चपखल आणि सुंदर शब्दात मांडतात. तसेच त्यांनी स्वतःचे वाचनालय तयार केले आहे.अनेक पुस्तकांचे वाचन त्यांनी केलेले आहे. वाचलेल्या पुस्तकावर त्यांचे 'वाचता वाचताआवडलेलं' हे सदर ते व्हाट्सअप च्या अनेक ग्रुप वर शेअर करतात. त्यांची विद्यार्थिनी आदिती चव्हाण हिचा आदीप्रभा काव्यसंग्रह ही प्रकाशित झाला आहे.

Saturday, 17 August 2024

40.जाईल तिथं उल्लेखनीय कामगिरी करणारे शरद रुपनवर गुरुजी

 शिक्षण आणि शाळेविषयीची असणारी आस्था, पालक आणि समाज यांना शाळेकडं खेचून आणण्याचा शब्दातला गोडवा, विद्यार्थ्यांसाठी सतत नवं काहीतरी करण्याची चाललेली धडपड, शाळा हेच आपलं घर समजणाऱ्या शिक्षकाला शाळेची वेळ सुद्धा अपुरी पडते.ज्या शाळेत बदली होते ती शाळा प्रत्येक अभियानात जिल्ह्यात पहिली असते असं छाती ठोकपणे सांगणारे माळशिरस तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या कारूंडे शाळेतील शिक्षक शरद रुपनवर गुरुजी.

        डोंगरदर्‍यातलं गाव ,सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात ,शिखर शिंगणापूरच्या पायथ्याशी वसलेल्या गावातली ही शाळा अगदी भकास होती. मा. दिलीप स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतून माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान संपूर्ण जिल्हाभर सुरू झालं. गावानं आणि शाळेनं अभियानात उतरायचं ठरवलं आणि जिल्ह्यामध्ये शाळा पहिली आली. गावाचा शाळेकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. स्वतंत्र मुख्याध्यापक कार्यालय, बहुउद्देशीय सभागृह, निसर्ग वर्ग ,रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, परसबाग ,चाइल्ड फ्रेंडली सेक्शन, प्रशस्त व्यासपीठ , सुसज्ज वर्ग खोल्या, विद्यार्थी गुणवत्ता शैक्षणिक साहित्यानं परिपूर्ण वर्ग खोल्या ,ग्रामस्थांच्या सहकार्यानं आतापर्यंत 13 लाख 67 हजार रुपये आणि चालू वर्षी शाळेसाठी जवळजवळ एक कोटी रुपयाची साडेतीन एकर जमीन गावानं शाळेला दिली. अशाप्रकारे संपूर्ण गाव शाळामय झालं वैशिष्ट्य म्हणजे चालू वर्षी शाळेत नववी चा वर्ग सुरु झाला. आणि पुढं नैसर्गिक पद्धतीनं दहावी ,अकरावी आणि बारावी असा शैक्षणिक विकास आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं भव्य दिव्य शैक्षणिक संकुल उभारण्याचा मानस आहे.असं ते सांगतात.

       या अगोदर गुरुजींनी परभणी जिल्ह्यातील चिलगरवाडी येथे खूप मोठं काम केलं. पहिल्याच प्रयत्नात चौथी शिष्यवृत्तीसाठी सहा विद्यार्थ्यांची निवड झाली.गावातील तरुणांना सोबत घेऊन शाळेच्या परिसरातील एक एकर झाडी जंगल तोडून त्याच ठिकाणी त्याच पैशातून सुमारे 200 झाडांचं वृक्षारोपण करून संगोपन केलं. तिथं ही माझी शाळा ,सुंदर शाळा या अभियानात चिलगरवाडी या शाळेनं गंगाखेड तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.

         आता गुरुजींची बदली शेरेवाडी माळशिरस तालुक्यात झाली 17 पटाची शाळा 42 पटा पर्यंत पोहोचली. या छोट्याशा वस्तीत दोन लाख 53 हजार वर्गणी करून शाळेचा संपूर्ण कायापालट केला.शंकरराव मोहिते पाटील गुणवत्ता विकास अभियान जिल्ह्यात सुरू झालं. या अभियानामध्ये शेरेवाडी शाळेनं जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. तीन विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षेत पात्र झाले. एक विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत पात्र झाला. अनेक विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत चमकले. माळशिरस पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार गुरुजींना मिळाला.

     पुढं

 गुरुजी बदली होऊन गुरसाळे शाळेत आले . पहिल्याच वर्षी सातवी चा वर्ग 22 पैकी 17 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत बसून 100% विद्यार्थी पास झाले. जुन्या खोल्या पाडून त्या ठिकाणी नवीन सुसज्ज इमारत, वृक्ष संवर्धक कठडे ,स्वतंत्र मुख्याध्यापक कार्यालय ,स्वतंत्र ई लर्निंग कक्ष व सलग तीन वर्ष अतिशय देखणा सांस्कृतीक कार्यक्रम करून 14 लाख रुपये लोकसहभागातून जमा केले. अनेक विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत जिल्ह्यात पहिले आले. दरम्यान जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार गुरुजींना देण्यात आला... माळशिरस तालुक्यातील पहिली आय एस ओ मानांकन प्राप्त शाळा म्हणून गुरसाळे शाळेची ओळख संपूर्ण जिल्हाभर झाली .पुढं गुरसाळे शाळा सुद्धा 'माझी समृद्ध शाळा' या अभियानामध्ये जिल्ह्यात पहिलीच आली.

Wednesday, 7 August 2024

39.ननवरे गुरुजींचा विज्ञान आणि इंग्रजी विषयात लौकिक



लहानपणापासून कुस्तीची आवड जोपासणारे मच्छिंद्र ननवरे गुरुजी हे आखाड्यात उतरून मुलांना कुस्तीचं प्रशिक्षण देण्याचं स्वप्न पहात होते. मात्र ते शक्य न झाल्यानं कबड्डीमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून त्यांनी आपला चांगला ठसा उमटविला. स्वतः जुदो- कराटेचं प्रशिक्षण घेऊन ते मुलांना शिकवीत आहेत. त्यांचे विद्यार्थी योगासनामध्ये पारंगत आहेत. सध्या माळशिरस तालुक्यातील तिरवंडी येथील जिल्हा परिषदेचे शाळेत ते विज्ञान विषयाचे शिक्षक म्हणून काम पाहतात. विज्ञान आणि इंग्रजी विषयाचे उत्तम शिक्षक म्हणून माळशिरस तालुक्यात त्यांचा नावलौकिक आहे. माळशिरस तालुक्यातील शिक्षकांना इंग्रजी विषयाचं प्रशिक्षण देण्याचं काम ते करतात. तुपे वस्ती या शाळेत शिक्षकी पेशाची सुरुवात केल्यानंतर मेडद व येळीव या शाळांमध्ये त्यांनी सेवा केली.

        तुपे वस्ती शाळेत पैगंबर तांबोळी या शिक्षकांच्या सोबतीने सोलापूर जिल्हा परिषदेच्या शंकराव मोहिते पाटील गुणवत्ता विकास कार्यक्रमात. महाराष्ट्र शासनाच्या सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात दोन वेळा शाळेला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून दिला. तसेच ग्रामीण गुणवत्ता विकास कार्यक्रमातही शाळेनं तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. गेल्यावर्षी मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धेत त्यांच्या सध्याच्या तिरवंडी शाळेना तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविला. जिल्हा परिषदेच्या व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत त्यांच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर यश मिळविले. स्पर्धा परीक्षांचा मुलांचा पाया पक्का व्हावा याकरिता पहिलीच्या वर्गापासूनच ते मुलांची तयारी करून घेतात. मुलांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्यही ते करतात. मुलांचा हस्ताक्षर सुंदर असावं यासाठी ते जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. आत्तापर्यंतच्या सर्व शाळांमध्ये चांगले वृक्षारोपण व्हावे यासाठी उपक्रम राबवले. तुपे वस्ती शाळेतील कठीण खडकावर वृक्षारोपण करताना माती उपलब्ध नसल्यानं त्यांनी राबविलेल्या एक मुलगा एक ढेकूळ या उपक्रमाचं शाळेला भेट देणाऱ्या शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी यांनी खूप कौतुक केलं.

      विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सतत प्रयत्न करतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत माळशिरस तालुक्यातील चाकोरे या गावातील परिस्थिती अतिशय बिकट होती. गावातील अनेक व्यक्तींचा मृत्यू झालेला होता. अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह होते. पूर्ण चाकोरे गाव मानसिक दबावात होतं. अशा काळात जि प शाळेतील शिक्षक ननवरे यांनी स्वतःच्या जीवाला धोका पत्करून रुग्णांच्या सेवेसाठी वाहून घेण्याचं ठरवलं. सरांचे अनेक वर्गमित्र अकलूज मधील नामांकित डॉक्टर आहेत या संबंधाचा फायदा चाकोरेच्या रुग्णांना करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या जवळ कोणत्याही नातेवाईकांची जाण्याची हिंमत होत नसताना ते रुग्णाजवळ जाऊन त्यांना मानसिक आधार देत होते. त्यांची वाणी गोड असल्यानं रुग्णांवर त्याचा सकारात्मक प्रभाव पडत होता. डॉक्टर मित्रांच्या सहकार्यानं त्यांनी समुपदेशन करण्याचं काम सुरू केलं होतं. जवळपास 14 रुग्णांना त्यांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. कोरोना नंतर ही त्यांचं सामाजिक कार्य सुरूच आहे.

      ननवरे गुरुजी 2008 पासून सेमी इंग्रजी माध्यमातून मुलांना शिकवितात. त्यामुळं ते ज्या शाळेत कार्यरत असतात त्या शाळेची पटसंख्या वाढते. मच्छिंद्र ननवरे गुरुजींना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. माळशिरस पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार, नवोपक्रमासाठी गुजरातच्या रेडिओ पालनपुर आणि ऋचारी इनोवेशन यांचा पुरस्कार, माने पतसंस्थेचा आचार्य दोंदे पुरस्कार, पत्रकार संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं आहे.