विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Wednesday, 21 February 2024

20.सावता माळी विद्यालयाचे अष्टपैलू कलाशिक्षक सावता घाडगे

 सावता माळी विद्यालयाचे अष्टपैलू कलाशिक्षक सावता घाडगे


       धन्य ते अरण रत्नाची खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरण मध्ये एका वरचढ एक अशी व्यक्तिमत्वं  आपल्याला विविध क्षेत्रात पहावयास मिळतील. त्यामध्ये शिक्षणक्षेत्र तर अव्वलच! उत्तम क्रिकेटपटू, यशस्वी कलाशिक्षक, देशपातळीपर्यंत धनुर्विद्या पोहोचवणारे सामाजिक, शैक्षणिक आणि कला  क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणारे संत सावतामाळी विद्यालयाचे कला, क्रीडा शिक्षक सावता घाडगे सर.

         खरं तर कलाशिक्षक म्हणून नेमणूक असतानाही अंगामधला खेळाडू जिवंत ठेवत  गेल्या बारा वर्षात धनुर्विद्या खेळात 34 राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू त्यांनी घडवलेले आहेत.150 पेक्षा जास्त खेळाडूंनी धनुर्विद्या क्रीडा प्रकारात उज्वल कामगिरी केलेली आहे. कला व क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना घडवून  त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचं काम त्यांच्याकडून सतत घडतं आहे.विद्यालयातील अध्यापनाचं काम पूर्ण करून शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त विद्यालयाच्या मैदानावर वर्षभर धनुर्विद्या खेळाचा सराव नियमितपणे ते घेतात. सर्व खेळाडूंना धनुर्विद्या खेळाचं प्रशिक्षण मोफत दिलं जातं. 

       महाराष्ट्र राज्य कला संचलनालयामार्फत घेतल्या जाणाऱ्या ग्रेड परीक्षेमध्ये  अ श्रेणी व ब श्रेणी मध्ये आज पर्यंत शेकडो विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

 विद्यालयात रांगोळी,सुंदर हस्ताक्षर, चित्रकला व विविध प्रदर्शने यासारख्या उपक्रमांचे यशस्वी आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य ते करत असतात.  सकाळ बालमित्र चित्रकला स्पर्धेचे विद्यालयामध्ये ते केंद्र चालवितात . शासनाच्या चित्रकला ग्रेड परीक्षेचे परीक्षक म्हणून पुणे येथेही त्यांनी काम केले आहे.

 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देण्यासाठी विद्यालयात  सुसज्ज अशी कॉम्प्युटर लॅब तयार केली आहे.  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यार्थ्यांची संवाद साधण्यासाठी विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.राज्यस्तरीय सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण घेऊन संधी,क्षमता, आवड यातून विद्यार्थ्यांनी आपलं करिअर कसं घडवावं याविषयी ते मार्गदर्शन करतात. किशोरवयीन विद्यार्थ्यांना समुपदेशन करून व्यक्तिमत्व विकास घडवतात. एन. एम.एम. एस व एन. टी. एस परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ते करतात.

         विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक दृष्ट्या कणखर बनवण्यासाठी विशेष प्रयत्न ते करतात. आज पर्यंत त्यांच्या चारशे विद्यार्थ्यांना चित्रकला व क्रीडा प्रकारात सवलतीच्या गुणांचा फायदा मिळाला आहे.  खेळाडू आरक्षणातून अनेक विद्यार्थ्यांना शासकीय सेवेचा लाभ मिळाला आहे.


      घाडगे सर यांची महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघाचे प्रशिक्षक म्हणून पाच वेळा नियुक्ती झालीआहे. धनुर्विद्या मार्गदर्शक(NSNIS), कोच लेवल १ पंच परीक्षा लेवल१, ऍडव्हान्स लेवल कोचिंग अशी प्रशिक्षणे पूर्ण करून विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण ते देतात.

          अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या  खेलो इंडिया स्पर्धेत धनुर्विद्या खेळातील सोलापूर जिल्ह्याला पहिले पदक घाडगे सरांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले आहे. ट्रेन द ट्रेनर प्रशिक्षणामध्ये सहभाग.

 राज्य व जिल्हा स्तरावरील वक्तृत्व,नाटक, लोकनृत्य एकांकिका व चित्रकला स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम केले आहे. रोटरी क्लब,अंधश्रद्धा निर्मूलन समिती, हरिभाऊ नाना शिंदे फाउंडेशन, संत सावता माळी अन्नछत्र मंडळ, सोलापूर जिल्हा कलाध्यापक संघ, क्रीडा कार्यालय सोलापूर यांच्या विविध उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य सातत्यानं ते करत आहेत.तीस वेळा रक्तदानाचं बहुमोल कार्य त्यांनी केलं आहे.


       प्राप्त पुरस्कार

 सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ,

महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती,

सोलापूर जिल्हा कलाध्यापक संघ,

सृजन फाउंडेशन फलटण, पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचा, जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ,

महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार,

लोकमंगल फाउंडेशन सोलापूर,

राज्यातील विविध कला संस्था कडून 27 विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

Sunday, 18 February 2024

19. शशिकांत घाडगे यांचे शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातही भरीव कार्य



      शिक्षक म्हणून सेवेचा रौप्यमहोत्सव साजरा करतानाही शैक्षणिक कार्यातील उत्साह तसूभरही कमी न करता उलट मिळालेल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर आढीव (ता.पंढरपूर) शाळेतील पदवीधर शिक्षक शशिकांत अशोक घाडगे हे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांनी शिक्षकी पेशा नोकरी न मानता एक व्रत म्हणून स्वीकारले आहे. आपल्या वर्गातील मुला-मुलींमधील गुणवत्ता हेरुन त्या-त्या क्षेत्रात त्यांना पुढे नेण्यासाठी जे काही करता येईल ते सर्वस्व झोकून देत घाडगे गुरुजी साठी कार्य करत आहेत . सर्वात महत्वाचे म्हणजे गण्या, बाब्या, राज्या, पक्या, अशा उद्धट नावांनी विद्यार्थी पात्रे रेखाटणाऱ्या जमान्यात आज पंचवीस वर्षाच्या सेवेनंतरही आपल्या विद्यार्थ्यांना एकेरी नावाने न बोलता आदरार्थी बोलणारे घाडगे गुरुजी एकमेव असावेत. पंढरपूर, मंगळवेढा आणि माढा अशा तीन तालुक्यातील आठ शाळांवर काम करताना त्यांनी आपल्या परीसस्पर्शानं प्रत्येक शाळेत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. शैक्षणिक गुणवत्ता, शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धात्मक परिक्षा, व्यक्तिमत्व विकास स्पर्धा, क्रिडा स्पर्धा, गुणवत्ता शोध चाचणी, प्रज्ञाशोध परीक्षा, अशा अनेक क्षेत्रांत त्यांच्या विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे काबीज केली आहेत. लोकवर्गणीतून शाळांच्या भौतिक सुविधा पूर्ण करणे, पटनोंदणी, रात्र अभ्यासिका, असे विविध उपक्रम आजपर्यंतच्या सेवेत त्यांनी राबवले आहेत. 

          छत्रपती परिवाराच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक कार्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात राज्यभरात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या मरवडे (ता.मंगळवेढा) येथील छत्रपती परिवाराचे संस्थापक अध्यक्ष म्हणून १९९५ ते २००० या कालावधीत त्यांनी काम पाहिले आहे. या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील अनेक शाळा शिक्षक यांच्याशी संपर्क साधत सुंदर शाळा उपक्रमशील शिक्षक निवडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जिल्ह्यातील कृतिशील शिक्षकांच्या कार्याचा ठसा संपूर्ण जिल्ह्याला माहित व्हावा आणि त्यांनी केलेल्या कामाचं अनुकरण इतरांनी करावं यासाठी त्यांची गेल्या वीस वर्षापासून अखंड सेवा चालू असून सध्या खजिनदार म्हणून ते काम पाहत आहेत. छत्रपती परिवाराच्या व्यासपीठावरून सामुदायिक विवाह सोहळे, शाळा व शिक्षकांना जिल्हास्तरीय पूरस्कार, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, मरवडे फेस्टिव्हल, मान्यवर तज्ज्ञांच्या व्याख्यानमाला, रक्तदान शिबिरे, क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, असे राज्यस्तरीय विविध उपक्रम राबविले आहेत. 

         दैनिक सकाळ च्या माध्यमातून राबविलेल्या जलसंधारण चळवळी मध्येही त्यांनी सहभाग नोंदवला. यामधून पाणीप्रश्नाची तीव्रता कमी होण्यास मदत तर झालीच पण राज्यात या कामाचा एक वेगळा ठसा निर्माण झाला. लेकीचं झाड या आगळ्यावेगळ्या उपक्रमानं तर संपूर्ण मरवडे गाव हरितछायेमध्ये विसावले आहे. 

   याशिवाय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सलग पंचवीस वर्षे मार्गदर्शन व यश . प्रज्ञाशोध परीक्षेसाठी मार्गदर्शन , आज पर्यंत विविध शाळांमधून लोकवर्गणीतून विद्युत सुविधा , बेंचेस व शाळांचे रंगकाम , लोकवर्गणीतून संरक्षक भिंतीचे काम, प्रश्नमंजुषा व इंग्रजी शब्दभंडार वृद्धीचा उपक्रम, इंग्रजी वाचन सुधार प्रकल्प , पंचायत समिती मंगळवेढा येथे स्वच्छतादूत म्हणून काम करताना अनेक गावे हगणदारीमुक्त करण्यात मोलाचे कार्य.

Wednesday, 7 February 2024

18.शिक्षणक्षेत्रात सतत नव्या वाटा शोधाणारा हरहुन्नरी शिक्षक... !

 शिक्षणक्षेत्रात सतत नव्या वाटा शोधाणारा हरहुन्नरी शिक्षक... !


      प्रयोगशीलतेला अमाप संधी असलेल्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांची मालिका निर्माण करणारे, उत्तम वक्तृत्व शैली, निवेदनाची आवड, हस्ताक्षराची देणगी, आणि सुमधुर आवाज, उत्तम शिस्त, कार्यक्रमातला काटेकोरपना, प्रशासनावरची भिस्त अशा सर्व अंगांनी काम करणारं अष्टपैलू व्यक्तिमत्व, माढा तालुक्यातील सोलंकरवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेतील सृजनशील शिक्षक रामकृष्ण केदार गुरुजी

         स्पर्धा परीक्षांमध्ये हातखंडा असलेल्या केदार यांचे अद्यापपर्यंत विविध शाळांमध्ये नवोदय मध्ये 4 विद्यार्थी तर शिष्यवृत्ती मध्ये 15 विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरले आहेत. विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धांमध्ये जिल्हास्तरापर्यंत सातत्यानं यश मिळवले आहे.

         जिल्हा परिषद शाळांकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा या उद्देशानं अरण व मोडनिंब सारख्या सर्वात जास्त पटाच्या शाळा आय एस ओ करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.

 मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे मुक्त शिक्षण घेता यावं म्हणून यांनी मोडनिंबच्या शाळेमध्ये 'मुक्तांगण' हा प्रकल्प राबवला.शिक्षक म्हणून नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू असतानाच त्यांच्याकडे मोडनिंब केंद्राच्या केंद्रप्रमुख पदाची जबाबदारी आली . या कालावधीत त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांनी राबविले. शाळेच्या भौतिक व इतर अडीअडचणी दूर करून शाळेचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षक,मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांचा समन्वय घडवत शाळेचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी 'महसूल गावसभे' सारखा उल्लेखनीय उपक्रम हाती घेतला. त्या माध्यमातून केंद्रातील सर्व शाळांमध्ये लाख रुपयाचा निधी संकलनासह भौतिक सुविधांनी शाळा संपन्न झाल्या.

    बौद्धिक विकासाबरोबर सर्वांगीण विकासासाठी विविध कृती कार्यक्रमाची रेलचेल असणारा मुक्तांगण यांसारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेत 'सर फाउंडेशन सोलापूर'ने त्यांना राज्यस्तरीय नवोपक्रमशील अधिकारी व नवोपक्रमशील शिक्षक पुरस्कार देऊन त्यांच्या सन्मानित केले.

लॉकडाऊननंतर विद्यार्थी मूलभूत क्षमतेमध्ये मागे पडत आहेत असे लक्षात आल्यानंतर त्यांनी समूह साधन गटाच्या माध्यमातून ध्यास गुणवत्ते सारखा उपक्रम प्रभावीपणे राबवला...या उपक्रमाला स्पर्धात्मक स्वरूप देऊन शिक्षकांमध्ये स्पर्धा निर्माण केली. 

त्यांनी केंद्र स्तरावर सुरू केलेल्या 'मिशन स्कॉलरशिप' या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि शिष्यवृत्तीला केंद्रातील अनेक विद्यार्थी यशस्वी झाले.

  आमच्यासाठी आम्हीच या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षक संख्या कमी असलेल्या शाळेवर पालक सहभाग व शिक्षक सहभागाच्या माध्यमातून स्वयंसेवक नेमून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली.या विविध उपक्रमांबरोबरच शाळा स्तरावरील एक मूल एक झाड, अभ्यासाचं गाव सोलंकरवाडी,प्रभावी गुणवत्ता कक्ष,आदर्श समूह साधन केंद्राची निर्मिती असे अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग त्यांनी त्यांच्या कार्यकाळात यशस्वीपणे पूर्ण केले. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी साहेबांनी सुद्धा त्यांच्या कामाविषयी गौरवोद्गार काढले होते.

         जिल्हा परिषद शाळा सोलंकरवाडी येथे शाळेचा अमृत महोत्सव सुरू आहे. त्यानिमित्त अमृत महोत्सव शुभारंभ,निपुण भारत अंतर्गत माता पालक मेळावा,विद्यार्थी विकास निधी संकलन योजना,अभिनव अमृत कलश योजना मेळावा,माता-पिता पाद्यपूजन, माजी विद्यार्थी मेळावा, लेकीचं घर,असे विविध उपक्रम शाळेत सुरू असून त्यांनी ग्रामस्थ व शिक्षक यांच्या सहकार्यानं विविध संस्था व विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करत शाळा डिजिटल केली आहे. रोख व वस्तूरूपाने जवळजवळ 4.5 लाख रुपयाचा शैक्षणिक उठाव यावर्षी त्यांनी जमा केला आहे. गड किल्ले ट्रेकिंगची त्यांना आवड आहे. 125 पेक्षा जास्त किल्ले ट्रेकिंग पूर्ण झाले आहे. पूर्णगायन,वादन, कविता करणं इत्यादी स्वतःचे छंद देखील जोपासले आहेत.

 त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. जिल्हास्तरीय शिष्यवृत्तीआदर्श शिक्षक पुरस्कार ,

कृतिनिष्ठ शिक्षक पुरस्कार छत्रपती परिवार मरवडे, आदर्श शिक्षक पुरस्कार पंचायत समिती कुर्डवाडी,

राज्यस्तरीय नवोपक्रमशील शिक्षक पुरस्कार, मुक्तांगण प्रकल्प सर फाउंडेशन सोलापूर यांचा पुरस्कार.

17.बाल स्नेही शिक्षणाचे पुरस्कर्ते शिवाजी वडते गुरुजी

 बाल स्नेही शिक्षणाचे पुरस्कर्ते शिवाजी वडते गुरुजी


      शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणासाठी पूरक वातावरण निर्माण करत बालस्नेही शिक्षणासाठी धडपडणारे शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिका नगर (बाळे) तालुका उत्तर सोलापूर येथील शिवाजी राम वडते हे सर्वत्र परिचित आहेत. त्यांनी विद्यार्थी विकासासाठी राबविलेल्या प्रत्येक उपक्रमात बालकेंद्री शिक्षणाचा पुरस्कार केला आहे. त्यामुळे विद्यार्थी प्रिय शिक्षक अशी त्यांची पालक , विद्यार्थी व शिक्षकांमध्ये ओळख आहे. 

        हद्दवाढ भागातील जिल्हा परिषद शाळा व त्यांच्या समोरील आव्हानं, यांना सक्षमपणे तोंड देत या शाळेला नावलौकिक मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. 

विशेष म्हणजे आपल्या वर्गातील विद्यार्थी व पालकासोबतच इतर वर्गातील विद्यार्थी व पालक यांच्याशीही त्यांचा सुसंवाद आहे. शाळेत आयोजित होणारा प्रत्येक उपक्रम विद्यार्थी केंद्रित असावा, इतर शाळांपेक्षा वेगळ्या गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांना मिळाव्या असा त्यांचा प्रयत्न असतो. उत्तर सोलापूर तालुक्यातील एक तंत्रस्नेही शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यासोबतच वर्गस्तरावर विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, डिजिटल क्लासरूम, माझे विद्यार्थी माझा अभिमान, व्यक्तिमत्व विकास स्पर्धा, प्रश्नमंजुषा, एका संख्येपासून अनेक गणिते क्रिया, तंत्रस्नेही विद्यार्थी, असे विविध उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांना हटके विचार करून त्यांना शिकण्यासाठी आनंदी वातावरण निर्माण हे त्यांचे ध्येय आहे. त्यामुळे शाळेतील प्रत्येक कोपरा बाल स्नेही बनवला आहे. 

       शाळेतील साहित्य, परिसर, बाग, रंगरंगोटी या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांचे आकर्षण बनले आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची अडचण येऊ नये म्हणून ते उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. स्वतःचे हस्ताक्षर अतिशय सुंदर असल्याने आपल्या विद्यार्थ्यांचेही हस्ताक्षर सुंदर असावे, यासाठी ते उपक्रम घेत आहेत. वर्गाबरोबरच शाळा स्तरावर विविध उपक्रम राबवीत असताना, शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना सोबत घेऊन नियोजन व त्यांची अंमलबजावणीत मोठा सहभाग हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. सहकार्यासोबत शाळेचा कायापालट करण्यासाठी त्यांनी विविध प्रयत्न केले ,त्यामुळे शाळेत अमुलाग्र बदल होऊन शाळा स्वच्छ सुंदर शाळा म्हणून नावारूपाला आली. 

     शाळेतील विद्यार्थ्यांचा पट वाढण्यासाठी परिसरातील अनेक मोठ्या शाळांशी स्पर्धा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व उत्तम प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांचा आग्रह असतो .त्यातूनच सर्व सोयींनी युक्त अशी स्वच्छ सुंदर शाळा म्हणून अंबिकानगर जिल्हा परिषद शाळेची ओळख निर्माण झाली आहे. 

     स्वच्छ सुंदर व हरित शाळा, उपक्रमशील शाळा याबरोबरच प्रिसिजन फाउंडेशनच्या मदतीने शाळेत बैठक अँट स्कूल, पासवर्ड वाचन अभियान, प्रिसिजन ई लर्निंग प्रोजेक्ट, गीलो ऑन गो असे उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत, बैठक अँट स्कूल या उपक्रमातून विद्यार्थ्यांना अभिजात भारतीय संगीत व नृत्यकला त्यांची ओळख करून दिली जाते. पासवर्ड वाचन अभियानातून विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड व स्पर्धात्मक वातावरण तयार होते. प्रिसिजन ई लर्निंग प्रोजेक्टच्या माध्यमातून अत्याधुनिक ई लर्निंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गिल्लो उपक्रमातून नाट्य अभिनयाची पायाभरणी केली जाते. विविध क्रीडा स्पर्धा, व्यक्तिमत्व विकास स्पर्धा याचेही आयोजन ते करतात. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी इनोवेशन क्लब ची स्थापना केली असून शाळा स्तरावर विविध नाविन्यपूर्ण पद्धतीने विचार करण्याची सवय त्यांनी विद्यार्थ्यांना लावली आहे. त्यामुळे विविध समस्येवर उत्तर शोधण्यासाठी वेगळ्या पद्धतीने विचार करणारे विद्यार्थी निर्माण झाले आहेत. बाल सभा व सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सभाधीट पणा निर्माण होतो. 

    

विद्यार्थी हिताचे कार्य करत असताना त्यांना अनेक पुरस्काराने विविध संस्थेने सन्मानीत केला आहे. आजादी बचाव संस्थेने आदर्श शिक्षक पुरस्कार, सर फाउंडेशनच्या राष्ट्रीय स्तरावरील इनोव्हेटिव्ह टीचर अवार्ड तसेच गुजरातच्या संस्थेच्या वतीने डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम विंग्स ऑफ फायर नॅशनल एज्युकेशन व सोशल इनोवेशन अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आपल्याला आनंदाचे क्षण आपल्याला विद्यार्थ्यांमुळेच मिळतात असे नेहमी त्यांना वाटतं . त्यांचे कार्य सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी आहे.

16.विद्यार्थ्यांमध्ये सतत काहीतरी नवं शोधणाऱ्या शिक्षिका गिरीजा नाईकनवरे

 विद्यार्थ्यांमध्ये सतत काहीतरी नवं शोधणाऱ्या शिक्षिका गिरीजा नाईकनवरे.


                    विद्यार्थ्यांसाठी सतत धडपडत राहणं. नवीन आव्हानं स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणं.शालेय, सहशालेय उपक्रमातून आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, आणि प्रत्येक समस्येवर उपाय असतोच हे लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या अंगी बिंबवनं हे खरंतर शिक्षकाचं आणि शिक्षणाचं काम असतं. असेच नवनवीन प्रयोग आणि नवनवीन उपक्रमातून सतत विद्यार्थ्यांसमवेत कार्यमग्न असणाऱ्या माळशिरस तालुक्यातील बोंडले जि.प.शाळेतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या लाडक्या गिरीजा नाईकनवरे मँडम त्यांच्या विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे आज त्या तालुक्यातच नव्हे तर राज्यभर परिचित झाल्या आहेत.

          शाळा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणं आवश्यक असतं,ही बाब लक्षात आल्यानंतर मैत्री अक्षरांशी, मी ही काढणार सुंदर हस्ताक्षर, शाळेची परसबाग, कला कार्यानुभव कक्ष, माझा वर्ग स्वच्छ व सुंदर वर्ग,माझी शाळा सुंदर शाळा,मी कसा दिसतो ?, शिक्षणासाठी दत्तक मुले, चला तयारी करुया वक्तृत्वाची...,हे बंध रेशमी मैत्रीचे, माझे विद्यार्थी - माझा अभिमान,जोडू नाते माणुसकीचे, स्पर्धा परीक्षांची तयारी, पर्यावरणाचं रक्षण- आमची जबाबदारी यांसारखे उपक्रम त्यांनी राबवायला सुरुवात केली.पालकांशी सुसंवाद साधत त्यांनाही शाळेच्या विकासात सहभागी करुन घेतलं.शिष्यवृत्ती परीक्षेतही त्यांच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यांसारख्या उपक्रमांमुळे शाळेचा पट वाढण्यासाठी मदत झाली.

        आधुनिक तंत्रज्ञानाचं ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांच्या सहकार्यानं यशवंत नगर येथील शाळेत असताना १५ संगणक ग्रामपंचायतीकडून उपलब्ध करुन घेत सुसज्ज अशा संगणक कक्षाची निर्मिती केली.लाखो रुपयांचा शैक्षणिक उठाव करत शाळेतील प्रत्येक वर्ग स्मार्ट क्लासरुम करण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतलं.

            विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा तसेच विद्यार्थी गुणवत्ता शोध स्पर्धांतर्गत वक्तृत्व, कथाकथन,निबंध, वैयक्तिक तसेच समूहगीतगायन,समूह नृत्य व क्रीडा स्पर्धांमध्ये तालुका व जिल्हास्तरावर अनेक विद्यार्थांनी यश मिळवलं.

       कोरोना काळात "शाळा बंद पण शिक्षण चालू " हा उपक्रम गिरीजा मँडमसह सुमारे १५० शिक्षकांनी सलग २०० दिवस चालवला. इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना आँनलाईन प्रत्यक्ष अध्यापन केलं.प्रत्येक वर्गाचे आँनलाईन स्नेहसंमेलन, संडे फन डे,मैत्री अक्षरांशी,चला रांगोळी काढूया...,विविध सण व उत्सव आँनलाईन साजरे केले.. 

           बोंडले जि.प.शाळेत स्वतः ५०,००० रुपये खर्चून ग्रामपंचायतीने तात्पुरत्या स्वरूपात दिलेल्या वर्गखोलीची रंगरंगोटी करुन शैक्षणिक वातावरणनिर्मिती केली.शाळेतील सर्व शिक्षक बांधव व ग्रामस्थांच्या सहकार्यानं आमदार निधीतून शाळेत स्मार्ट क्लासरुम तयार झाला. 

         कोणत्याही कार्यक्रमाचं स्वागत त्यांनी रेखाटलेल्या अप्रतिम अशा रांगोळीनचं होतं.. ही कला स्वतःपुरती मर्यादित न ठेवता त्यांनी अनेक शिक्षक बंधू - भगिनींनाही या कलेचं प्रशिक्षण दिलं.या कलेतील त्यांचं प्रभुत्व पाहून "रांगोळी सम्राज्ञी" ही उपाधीच माळशिरसकरांनी त्यांना बहाल केली .सूत्रसंचालनाची जबाबदारीही त्या लीलया पेलतात. .विविध प्रशिक्षणासाठी सुलभक म्हणून त्यांनी काम केलं आहे.कलासमेठीत अध्ययन- अध्यापन या पायलट प्रोजेक्टवर देखील त्यांनी काम केलं आहे.तालुक्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत सुंदर हस्ताक्षर व रांगोळी कार्यशाळा घेतल्या आहेत.मुलींना मासिक पाळीसंदर्भानं मार्गदर्शन केलं आहे. शिवरत्न फाऊंडेशन व डॉटर माँम्स फाउंडेशन सोबत "बेटी बचाओ, बेटी पढा़ओ " यासाठी सामाजिक कार्य केलं आहे. महिला सक्षमीकरणासाठी मोफत रांगोळी, मेहंदी,शिवणकाम कार्यशाळा घेतल्या आहेत.सायकल बँकेसाठी योगदान दिले आहे. Virtual Classroom या उपक्रमात इयत्ता पहिली व दुसरी - मराठी व गणित विषयासाठी त्या राज्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत.

माळशिरस तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार, जिल्हा परिषद, सोलापूरचा आदर्श शिक्षक पुरस्कार,राज्यस्तरीय आचार्य दोंदे आदर्श शिक्षक पुरस्कार, त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.