शिक्षक म्हणून सेवेचा रौप्यमहोत्सव साजरा करतानाही शैक्षणिक कार्यातील उत्साह तसूभरही कमी न करता उलट मिळालेल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर आढीव (ता.पंढरपूर) शाळेतील पदवीधर शिक्षक शशिकांत अशोक घाडगे हे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांनी शिक्षकी पेशा नोकरी न मानता एक व्रत म्हणून स्वीकारले आहे. आपल्या वर्गातील मुला-मुलींमधील गुणवत्ता हेरुन त्या-त्या क्षेत्रात त्यांना पुढे नेण्यासाठी जे काही करता येईल ते सर्वस्व झोकून देत घाडगे गुरुजी साठी कार्य करत आहेत . सर्वात महत्वाचे म्हणजे गण्या, बाब्या, राज्या, पक्या, अशा उद्धट नावांनी विद्यार्थी पात्रे रेखाटणाऱ्या जमान्यात आज पंचवीस वर्षाच्या सेवेनंतरही आपल्या विद्यार्थ्यांना एकेरी नावाने न बोलता आदरार्थी बोलणारे घाडगे गुरुजी एकमेव असावेत. पंढरपूर, मंगळवेढा आणि माढा अशा तीन तालुक्यातील आठ शाळांवर काम करताना त्यांनी आपल्या परीसस्पर्शानं प्रत्येक शाळेत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. शैक्षणिक गुणवत्ता, शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धात्मक परिक्षा, व्यक्तिमत्व विकास स्पर्धा, क्रिडा स्पर्धा, गुणवत्ता शोध चाचणी, प्रज्ञाशोध परीक्षा, अशा अनेक क्षेत्रांत त्यांच्या विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे काबीज केली आहेत. लोकवर्गणीतून शाळांच्या भौतिक सुविधा पूर्ण करणे, पटनोंदणी, रात्र अभ्यासिका, असे विविध उपक्रम आजपर्यंतच्या सेवेत त्यांनी राबवले आहेत.
छत्रपती परिवाराच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक कार्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात राज्यभरात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या मरवडे (ता.मंगळवेढा) येथील छत्रपती परिवाराचे संस्थापक अध्यक्ष म्हणून १९९५ ते २००० या कालावधीत त्यांनी काम पाहिले आहे. या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील अनेक शाळा शिक्षक यांच्याशी संपर्क साधत सुंदर शाळा उपक्रमशील शिक्षक निवडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जिल्ह्यातील कृतिशील शिक्षकांच्या कार्याचा ठसा संपूर्ण जिल्ह्याला माहित व्हावा आणि त्यांनी केलेल्या कामाचं अनुकरण इतरांनी करावं यासाठी त्यांची गेल्या वीस वर्षापासून अखंड सेवा चालू असून सध्या खजिनदार म्हणून ते काम पाहत आहेत. छत्रपती परिवाराच्या व्यासपीठावरून सामुदायिक विवाह सोहळे, शाळा व शिक्षकांना जिल्हास्तरीय पूरस्कार, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, मरवडे फेस्टिव्हल, मान्यवर तज्ज्ञांच्या व्याख्यानमाला, रक्तदान शिबिरे, क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, असे राज्यस्तरीय विविध उपक्रम राबविले आहेत.
दैनिक सकाळ च्या माध्यमातून राबविलेल्या जलसंधारण चळवळी मध्येही त्यांनी सहभाग नोंदवला. यामधून पाणीप्रश्नाची तीव्रता कमी होण्यास मदत तर झालीच पण राज्यात या कामाचा एक वेगळा ठसा निर्माण झाला. लेकीचं झाड या आगळ्यावेगळ्या उपक्रमानं तर संपूर्ण मरवडे गाव हरितछायेमध्ये विसावले आहे.
याशिवाय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सलग पंचवीस वर्षे मार्गदर्शन व यश . प्रज्ञाशोध परीक्षेसाठी मार्गदर्शन , आज पर्यंत विविध शाळांमधून लोकवर्गणीतून विद्युत सुविधा , बेंचेस व शाळांचे रंगकाम , लोकवर्गणीतून संरक्षक भिंतीचे काम, प्रश्नमंजुषा व इंग्रजी शब्दभंडार वृद्धीचा उपक्रम, इंग्रजी वाचन सुधार प्रकल्प , पंचायत समिती मंगळवेढा येथे स्वच्छतादूत म्हणून काम करताना अनेक गावे हगणदारीमुक्त करण्यात मोलाचे कार्य.
No comments:
Post a Comment