विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Friday, 20 August 2021

शिवाजी चहाची टपरी....ते.. हायवेवरचा दुकानदार

 हाय वे च्या कडेला शिवाचं छोटसं चहाचं हाॅटेल. सोबत भेळ,चिवडा,ड्रायव्हरसाठी लागणारं छोटं मोठं  सामान .त्यांच्या अंघोळीसाठी इंजिनसाठी पाणी, ड्रायव्हर म्हणजे आपला पाहुणा ,अशी त्याची धारणा.दिवसभर सर्वाना गोड बोलून स्वतः आणि दुस-यांना आनंदी ठेवणारा हा छोटा दुकानदार.

             पदवी पर्यत शिक्षण घेतलेल्या शिवाला शेतीचा खूप नाद होता .तीन भाऊ आई वडील असं मोठं कुटुंब .मोठ्या भावाचं गावात किराणा दुकान .दोन भाऊ शेतात. वडील बैल, वैरण,कुळव ,नांगर यामध्ये गुंतलेले.डाळींब ,बोरीच्या बागांमध्ये दिवसरात्र काम करणं एवढच सा-या कुटुंबाला माहीत.परंतु बोअर आणि विहिरीच्या पाण्यावरचा त्यांचा विश्वास उडाला आणि मग शिवा व्यवसायाकडे वळला.सुरूवातीला छोटीशी टपरी सुरू करत चांगली सेवा देऊन हळूहळू तो  या धंद्यात चांगलाच रमला . 

गि-हाइकांचा तो आवडता झाला.त्याच्या हाॅटेलसमोर खूप  ट्रक्स इतर वाहनं थांबू लागली . मग त्याने तिथचं किराणा सामानाचं दुकान सुरु केलं.ड्रायव्हरांना तो माल देऊ लागला कर्नाटक ,तामिळनाडू, आंध्र ,उ.प्रदेश येथील  कितीतरी ड्रायव्हरांना तो उदार सामान देऊ लागला.विश्वास संपादक केला त्यांच्या भाषा त्याला समजू लागल्या. तो सांगतो , "ओळख पाळख नसताना पर राज्यातील ड्रायव्हर लोकांना  नोटबदलीच्या काळात जवळ जवळ वीस हजार रुपये मी उसने दिले कोण म्हणायचं उपाशी आहे,कोण म्हणायचं आजारी आहे ,कुणाला गावाकडं आई वडिलांना पाठवावयाचे आहेत तर कुणाच्या गाडीत डिझेल नाही एक ना दोन अशा असंख्य अडचणी सोडवण्याचं काम शिवानं केलं
लोकं मला घरच्या सारखं हक्कानं पैसे मागायचे आणि मी ही माझ्या धंद्यातील पैसे दयायचो.पण ड्रायव्हर लोकं खूप प्रामाणिक माझे सर्व पैसे त्यांनी दोन तीन महिन्यात परत केले.कसलीही लिखापड आणि अोळख नसताना पैसे परत मिळाले यावरून मला माझ्या देशातील या गरीब आणि प्रामाणिक लोकांचा खूप अभिमान वाटतो असं तो सांगतो.
            सुरूवातीला किलो किलोनं माल आणणारा शिवा आता टनावर माल खरेदी करतो.डाळी,तांदूळ,गहू,मैदा,लापशीसाठी गव्हाचा रवा ,ब्रेड,इत्यादी मालाची विक्री तो करतो.स्वतः मालाच्या पिशव्या डोक्यावर घेऊन गि-हाईकाच्या ट्रक मध्ये ठेवतो.कितीतरी ड्रायव्हर त्याचे दोस्त बनले.स्वतःचं दुकान असल्यासारखं माल हातानं घेऊन हिशोब करुन पैसे त्याला देतात.जास्त नफा न मिळवता जास्तीत जास्त लोकांपर्यत आपली सेवा पोहोचल्याचा त्याला आनंद.दिवसासाठी एक ते दीड हजार रु.नफा त्याला मिळतो
              अनेक मित्रकंपनी असलेला शिवा दरवर्षी राष्ट्रीय सणाच्या दिवशी पहाटेच  जवळच्या  शाळेत जातो संपूर्ण परिसर झाडून स्वच्छ करतो.शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो अरे हे कसं स्वच्छ झालं आणि कुणी केलं.ना प्रसिद्धीची हाव ना कामाची लाज!
            रस्त्याच्या कडेला

 वृक्षारोपण असो अथवा रस्त्यावर रांगोळी काढायची असो उत्साह याच्या नसानसांत भरलेला.

        असा हा छोटा दुकानदार सांगतो धंदा करायचा असेल तर डोकं शांत ठेवा ,कशाची लाच वाटू देवू  नका,कुणाला फसवू नका,धंद्याशी आणि गि-हाईकाशी प्रामाणित रहा .क्षणभंगूर जीवनाचा आनंद घ्या आणि इतरांना द्या .

असा हा शिवा , अरणच्या आदर्श शाळेत माझा शेवटच्या बेंचवरचा विद्यार्थी होता आज पहिल्या बेंचवरच्या विद्यार्थ्याच्या  कितीतरी  पुढे पोचलाय !!

छोटे उद्योजक

 

छोटे उद्योजक
.... अविनाश पाटील ची गगन भरारी..

          'कामालाच देव मानणारे'आमच्या अरणचे सर्व गावकरी .सावता महाराजांचीच शिकवण दुसरं काय!गाव नेहमीच दुष्काळाच्या छायेत वाढलेलं.त्यामुळं नोकरी, धंदा,आणि पावसाच्या पाण्यावरची शेती यावरच  लोकांचं जगणं. येथील लोकांना शिक्षणाची मात्र फार आवड. शिक्षणासाठी कुठून पैसा येतो हे मात्र मला न उलगडलेलं कोडं!खूप शिकायचं कुठतरी नोकरी शोधायची नाहीतर आहेच छोटा मोठा धंदा .
       अविनाश पाटील असाच आमच्या गावचा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेला विज्ञानाचा पदवीधर तरूण.वडील रावण पाटील माजी सैनिक धाकटा भाऊ संपत शिक्षकाची नोकरी करतो. अविनाशला मात्र शेतीचा चांगलाच नाद लागला.न लाजता खत घालणं,बाग चाळणं,बाग छाटणं ही काम तो आनंदानं करायचा. आधुनिक पद्धतीनं थोड्याशा पाण्यावर ड्रीपच्या सहाय्याने त्यानं डाळींबाची शेती करायला सुरूवात केली .शेती व्यवसायात चांगला जम बसला .अचानक डाळिंबाच्या बागांवर तेल्या ,कुजव्या यासारख्या रोगानं डाळींबाची शेती धोक्यात आणली.तोपर्यंत अविनाशचं लग्न झालं खर्च वाढला. वडिलांच्या पेन्शनवर आणि भावाच्या पगारीवर आपण किती दिवस अवलंबून रहायचं! काहीतरी धंदा करावा मनात विचार आला.
              इच्छा असली की नक्कीच मार्ग सापडतो.अविनाशला सुद्धा सापडला.या कामी अतुल चौधरी सारखे गुरु त्याला मिळाले.मंगल सिद्धी ग्रुपचे ते संकलन अधिकारी. 'दुधाचा धंदा करतोस का?मी तुला पाहिजे ती मदत करतो.घाई नाही एक दिवस विचार कर आणि मग निर्णय घे'असा सल्ला त्यांनी मला दिला आणि मी कामाला लागलो असं अविनाश अानंदानं सांगतो.
            तो सांगतो, दुध डेअरी सुरु केली वर्ष होतं २०११ .सुरूवातीला ६० ते ७०लिटर दूध संकलन झालं.हळूहळू शेतक-यांना विश्वासात घेत दुधाचा व्यवसाय करणा-यांना एकत्र केलं. त्यांना दुधाच्या योग्यतेनुसार भाव दिला.ना नफा ना तोटा असा माझा व्यवसाय सुरु झाला.रोजच्या रोज भाव कळू लागल्यानं दूध वाढू लागलं.मग मंगलसिद्धीच्या मशिनरी घेऊन दुध साठवायला सुरू झालं.कधी कधी दूध खराब व्हायचं. अख्ख्या टँकरचा तोटा वरचं काही सांगून जायचा.दरम्यानच्या काळात धंद्याची चांगली माहिती धेतली.प्रशिक्षण घेतलं.अनेकांच्या ओळखी झाल्या .धंद्यातली चांगली वाईट माणसं समजली आणि ठरवलं आता मागं वळून पहायचं नाही.
              माझे मेहुणे दत्तात्रय गाजरे, बहीण सुनिता यांनी मानसिक आधार देत माझ्यामधील आत्मविश्वास जागा केला.बँक आॅफ इंडियाने आर्थिक आधार दिला आणि पंचवीस लाखाची दूध संकलनासाठीची मशीन खरेदी केली.व्याप वाढला संगणकीकृत कामकाज सुरू झालं .पत्नी विद्या आणि वडिल यांच्यावर काम सोपवून मी बाहेरची कामं पाहू लागलो.हे सर्व सांगताना त्याच्या चेहऱ्यावर चा उत्साह ओसंडून वाहत होता.
        आज त्याच्याकडं पाच साडे पाच हजार लिटर दूध संकलन होतं.आई विमल,वडील, पत्नी,यांच्या सह चार कामगार दिवसभर हा सर्व कारभार पाहतात. महिन्याला त्याला या मधून सर्व खर्च वजा जाता ८० ते ९०हजार रूपये मिळतात.
            यापुढे दुग्धजन्य पदार्थ स्वतः तयार करुन बाजारात आणण्याचा त्याचा विचार आहे. या कार्यासाठी त्याला शुभेच्छा देऊयात.

°°°°°°°°°°°°°°°°°° नवनाथ शिंदे.