विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Sunday, 24 September 2023

6.पारंपारिक अध्यापन पद्धतीला तंत्रज्ञानाची जोड देणारे राहुल सुरवसे

  

             व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत माणसाचं जसं शिक्षण,समाज,आणि कुटुंब महत्त्वाचं ठरतं तसंच परिस्थिती सुद्धा तितकीच महत्त्वाची ठरते . राहुल सुरवसे यांच्या जीवनात सुद्धा त्यांची आर्थिक परिस्थितीच शिक्षक होण्याच्या प्रेरणेचं उगम स्थान ठरली. घरची शिक्षण पूर्ण करण्याइतकीही ऐपत नसल्यानं मोठया काका काकूंनी त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली .

उपशिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळे हिप्परगे येथे त्यांनी 15 वर्षे सेवा केली. के यान प्रोजेक्टर ते मोबाईल संगणक बस असा त्यांचा अद्वितीय प्रवास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पोषक ठरला. याच काळातील शैक्षणिक कार्यानिमित्त त्यांना शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग असा डॉ. मार्डीकर शिक्षक सक्षमता पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोकुतांडा, तालुका उत्तर सोलापूर येथे त्यांनी 7 वर्षे सेवा केली. प्रिसिजन फाउंडेशन आणि सर फाउंडेशन यांच्या सहकार्यानं शाळा डिजिटल स्मार्ट झाली. सोलर पॅनलयुक्त, टॅब स्कूल अशी उल्लेखनीय शाळेची ओळख सोलापूर जिल्ह्यात झाली. त्यामुळे गुजरात आणि राजस्थान येथून संचालक साहेब आणि अधिकारी यांच्या शाळेस भेटी झाल्या. विद्यार्थ्यांचा गुणगौरव झाला. डिजिटल शैक्षणिक क्रांती ज्यांच्यामुळे झाली असेल संदीप गुंड सर यांनी शाळेस भेट दिली.लोकुतांडा शाळेतील पाचवीतील दोन विदयार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आले. त्या काळात जि.प. सोलापूर यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. सहा वर्षात तीन वेळा वार्षिक स्नेह संमेलन घेवून द्विशिक्षकी शाळेत सुद्धा रु.एक्कावन्न हजाररुपये लोकसहभाग जमा केला.. कोरोना काळात राबविलेले उपक्रम पाहून राज्यस्तरावर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत वेबिनार द्वारे सादरीकरण करण्याची संधी त्यांना मिळाली.त्यातील समाजमंदिरातील भोंग्याद्वारे शिक्षण हा अभिनव प्रयोग यशस्वी ठरला.शाळेत विविध उपक्रम, डिजिटल शिक्षणावर अधिक भर देत अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक रंजक करण्यात त्यांचा हातखंडा आहे. याही शाळेत त्यांनी जवळजवळ सत्तर हजार रुपये पर्यंत लोकसहभाग जमवून शाळेच्या भौतिक गरजा व आधुनिक तंत्रज्ञानासाठी निधी गोळा करण्याचा प्रयत्न केला.

           सतत नवीन अध्यापन पद्धती आणि जुनी अध्यापन पद्धती यांचा मेळ घालत अध्यापनात नवनवीन प्रयोग करत राहणं हे त्यांना लागलेलं शिक्षणाचं वेडच! प्राथमिक शिक्षकाच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांची बदली . आता गुरुजींची बदली जि.प.शाळा गुळवंची येथे झाली. नवीन शाळेत नावीन्यपूर्ण असं काय करता येईल ? हा विचार मनात येत असतानाच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे राज्यस्तरीय व्हर्चुअल क्लास ई-बालभारती मध्ये त्यांची निवड झाली. इयत्ता पहिली इंग्रजी आणि इयत्ता चौथी परिसर अभ्यास विषयाचे पाठ घेण्यासाठी त्यांना संधी मिळाली. कोरोना काळात जिल्हा परिषद सोलापूर युट्युब चॅनल साठी पूर्वी केलेल्या कामाचा अनुभव याठिकाणी त्यांना उपयोगी पडला . वर्गातलं अध्यापन अधिक आनंददायी होण्यासाठी साहित्याचा वापर, तंत्रज्ञानाचा अवलंब, कृती, उपक्रम, स्वाध्याय, स्वयं अध्ययन यांचा देखील येथे विचार करावा लागला. राज्यातील सॅटेलाईट वरून जोडल्या गेलेल्या ७६१ शाळांना यूट्यूब लाईव्ह पाहण्याची संधी ई बालभारतीने त्यांना उपलब्ध करून दिली. राज्यातील शिक्षकांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत चर्चा करता आली. 

      इयत्ता पहिली ते दहावी च्या विद्यार्थ्याना सर्व विषय व्हर्चुअल क्लास रूपानं या एकाच मंचावरून शिकण्याची सुवर्ण संधी विद्या परिषदेनं उपलब्ध करून दिली. आजपर्यंत 26 वर्षाच्या सेवेत त्यांनी वस्तुरूपानं आणि रोख स्वरुपात मिळून जवळ जवळ 14 लाख रुपयांचा लोकसहभाग मिळवला. याशिवाय प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इंग्रजी अभ्यास मंडळा मध्ये ते सदस्य आहेत .

बालभारती च्या इयत्ता १ली, २ री व ३ री इंग्रजी पाठ्यपुस्तक निर्मिती मध्ये सहभाग घेण्याची संधी त्यांना मिळाली.

कॉन्व्हर्सेशन स्किल,माझे शैक्षणिक साहित्य लॅंग्वेज गेम्स, अशा पुस्तकांचं लेखन सुद्धा त्यांनी केलं आहे..ई लर्निंग , स्वयंअध्ययन साहित्य , डिजिटल शाळा, भाषिक खेळ, उपक्रम यातून रंजक अध्ययन अध्यापन.

.शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तर विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२३ उपसमिती सदस्य म्हणून राज्यस्तरावर त्यांची निवड झाली आहे.

Saturday, 16 September 2023

5.नाविन्यपूर्ण उपक्रमातून प्रतापसिंह मोहिते साधतात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

 ...


               ग्रामीण भागात वाडी वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या शाळेत मन लावून काम करणारे, विद्यार्थ्यासोबतच समाजात मिसळून शाळेच्या भौतिक गरजा त्यांच्याकडून पूर्ण करून घेणारे अनेक शिक्षक आपल्याला दिसतात. मुख्य रस्त्यापासून आणि शहरापासून थोडंसं दूर असल्यानं त्यांचं काम त्यांच्या शाळेपुरतच मर्यादित राहतं कधीकधी. खरंतर शिक्षकांनी केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम,गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न हे त्यांच्या पुरते मर्यादित न राहता ते सर्वदूर पोहोचले पाहिजेत जेणेकरून त्यांच्या एखाद्या उपक्रमातून इतरांनाही काहीतरी नवीन मार्ग सापडतो.

               प्रतापसिंह नाशिकराव मोहिते हे त्यातीलच एक.सतत काहीतरी नवीन करण्याचा ध्यास घेतलेला अवलिया शिक्षक.अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांचा विकास घडविणारे.त्यांनी शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय काम तर केले आहेच शिवाय सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.बालभारती, एससीइआरटी मध्ये राज्य व जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमात तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करताना आपल्या उपक्रमातून तालुक्यातील इतर शिक्षकांना प्रेरित करण्याचं काम त्यांनी केलं आहे.राष्ट्रीय स्तरावरील एज्युकेशनल कॉन्फरन्स मध्ये विविध राज्यांच्या प्रतिनिधींसोबत सहभागी होऊन विचारांची देवाणघेवाण करून विद्यार्थ्यांना प्रयोगशील बनवण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं आहे.त्यांनी मार्गदर्शन केलेल्या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये,तालुका जिल्हास्तरावर सन्मान मिळवला आहे.

               विविध आंतरराष्ट्रीय दिन उपक्रमात सहभाग व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी शाळेत युनिस्को स्कूल क्लबची स्थापना जिल्ह्यात सर्वप्रथम त्यांनी केली.विद्यार्थ्यांना ज्ञानरचनात्मक अध्यापन पद्धतीनं अभ्यासाची गोडी लावली.शाळेत विविध उपक्रम विद्यार्थी आणि सहकारी शिक्षकाच्या सहाय्याने सुरू केले.तंत्रज्ञान वापरून ई लर्निंग द्वारे अध्यापनात नावीन्यता आणली.त्यांनी राबविलेल्या ज्ञानरचनावादी उपक्रमाचं कौतुक तत्कालीन सीईओ अरुण डोंगरे व राजेंद्र भारुड साहेब यांनी स्वतः त्यांच्या शाळेत येऊन केलं होतं.

                100% विद्यार्थी उपस्थित रहावे म्हणून शाळेत परिपाठापासून नवनवीन उपक्रम राबवण्यात आले.राज्य शासनानं सुरु केलेल्या शिकू आनंदे कार्यक्रमात त्यांनी उत्कृष्टरित्या सादरीकरण केलं,अवांतर वाचनात गोडी लागावी म्हणून शनिवार माझ्या गोष्टीचा या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली.शाळेत अनेक गोष्टीची पुस्तके आणून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावली. शिक्षक पालक यांच्यात योग्य समन्वय रहावा यासाठी विद्यार्थी वाढदिवस ते स्वतः स्वखर्चानं शाळेत पालकासमवेत साजरा करतात. त्यातून भेट वस्तूच्या रूपात शालेय भौतिक सुविधांची पूर्तता करतात .पालक-महिला मिळावे, माता पालकांच्या विविध स्पर्धा , व्यावहारिक ज्ञान मिळावे म्हणून शाळेत बाल आनंद बाजार, सांस्कृतिक कार्यक्रम,विद्यार्थी दिन, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचा वापर,विविध कलाकृती बनवण्यासाठी कला,शिक्षणाची वारी,शाळेत सहलीच्या माध्यमातून मंदिर, किल्ला व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, मुलांच्या प्रवेशासाठी गुढीपाडवा अन पट वाढवा उपक्रम यासारख्या अनेक उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी श्री मोहिते यांनी केली आहे.

                 आपत्कालीन स्थितीत मदतीची भावना वाढीस लागण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्त भागात विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने बिस्किट पुड्यांचे वाटप त्यांनी विद्यार्थी खाऊच्या रकमेतून केले, ग्रीन स्कूल ग्रीन व्हिलेज अंतर्गत वृक्ष लागवड,रक्षाबंधन दिवशी शाळेतील मुलींनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस दादांना राखी बांधण्याचा कार्यक्रम, सैनिकांना राखी पाठवण्याचा उपक्रम, होळी सणा निमित्त गावातील कचऱ्याची व अविचारांची होळी असे विविध उपक्रम मोहिते यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येतात.विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी म्हणून विद्यार्थ्यांचे बचत खाते उघडण्यात आले,त्यातूनच पोस्टामार्फत बचत शाळा म्हणून शाळेचा गौरव झाला.

                     आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून फक्त आपल्या शाळेपुरतं  मर्यादित न राहता महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पनेतून विकास व्हावा यातून पत्नी माधुरी (प्राथमिक शिक्षिका) यांच्या संकल्पनेतून शाळा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेची निर्मिती केली.या माध्यमातून विद्यार्थी हिताच्या अनेक संकल्पना प्रत्यक्षात उतरवल्या. कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद असताना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण देणं  असो वा शोध गुणवंताचा ही पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबविणं  असो यातून विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र होण्यास खारीचा वाटा उचलण्याची संधी त्यांना मिळाली.त्याचबरोबर ऑनलाइन वुईथ माय चित्रकला स्पर्धा,कोण होणार फास्टर फिंगर मास्टर प्रश्न मंजुषा स्पर्धा, महाराष्ट्राचा शिववक्ता ही वक्तृत्व स्पर्धा, डॉ अब्दुल कलाम वाचन अभिवादन स्पर्धा,टॉपर सामान्यज्ञान परीक्षा,फास्टर गणित स्पर्धा असे विविध उपक्रम राज्यस्तरावर राबवून विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न सातत्यानं त्यांनी केला आहे. शहीद जवानांच्या स्मारकांना भेटीतून मानवंदना देणं हे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम त्यांनी हाती घेतले. त्याचबरोबर गावातील सैनिकांना शाळेत बोलून त्यांचा सन्मानही केला .मोहिते यांना कुटुंबीयांची साथ नेहमीच मिळत असते.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता अभियान,निवडणूक कार्य,मतदार जागृती ,राष्ट्रीय सेवा योजनेत जनजागृती,भारत स्काऊट गाईड अंतर्गत कब बुलबुल युनिटची स्थापना,गोवर लसीकरण मोहिमेत सहभाग,केंद्रस्तर स्वच्छता मॉनिटर म्हणून निवड,त्याचबरोबर भारत सरकारच्या विविध मंत्रालयाच्या वतीनं आयोजित ऑनलाइन प्रतिज्ञा उपक्रमामध्ये सहभाग घेऊन राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र प्राप्त केलं आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन ,स्वच्छता शपथ, मृदा संवर्धन, नमामी गंगे ,संविधान दिन ,एकता दिन ,इंधन बचत, हुंडाबंदी ,महिला हक्क, टीबी फ्री इंडिया यासारख्या उपगक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे.शाळा सिद्धी राज्यनिर्धारक म्हणून ही काम पाहिलं आहे.मूल्यवर्धन कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केल्याने राज्य स्तरावरील पुस्तकात त्यांची दखल घेण्यात आली आहे.ई बालभारती च्या माध्यमातून सध्या सुरु असलेल्या व्हर्चुअल क्लाससाठी त्यांची निवड झाली आहे.

                 प्रतापसिंह मोहिते यांनी केलेल्या कार्याचा आलेख पाहून अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं आहे. नुकतंच त्यांना आयसीटीसी पुरस्कारानं मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आलं आहे.त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय शिक्षक संमेलना मध्ये शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला आहे,राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव पुरस्कार,शिक्षकरत्न पुरस्कार,मनोरमा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार ,शांतीलाल मुथा फाउंडेशनचा मूल्यवर्धन पुरस्कार ,रोटरी क्लबचा राष्ट्र शिल्पकार पुरस्कार ,राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार, लोकमत एक्सलंट टीचर अवॉर्ड,आविष्कार फाऊंडेशन शिक्षक सन्मान, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक सन्मान, लायन्स शिक्षकरत्न पुरस्कार, सर फाऊंडेशनचा जिल्हास्तरीय प्रयोगशील शिक्षक सन्मान,शिक्षक व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमांमध्ये पारितोषिक, पंचायत समिती गुणवत्तापूर्ण विद्यार्थी शिक्षक म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.सध्या ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यानगर वसाहत साकत ता-बार्शी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

             सतत नवनवीन उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करताना सहकारी शिक्षकांचं, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांचं खूप योगदान मिळतं असं ते आवर्जून सांगतात.

Sunday, 3 September 2023

4. करकंब परिसरात लेकीचं झाड या उपक्रमामुळे वृक्षारोपण अभियानाला मिळतेय गती..



        प्रत्येक व्यक्ती काहीतरी वेगळी कला घेऊन जन्माला येत असते. आपल्या मधली ही सुप्त कला एकदा का आपल्याला गवसली की, मग तो अनेक संकटातून मार्ग काढत ती कला जोपासण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. शिक्षणाची अडथळ्याची शर्यत पार करत आलेले असेच एक पखवाज , तबला वादक आणि समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेले करकंब तालुका पंढरपूर येथील समाजशील शिक्षक ज्ञानेश्वर दुधाने! 

          भजनगायक आजोबा पंढरीनाथ दुधाणे यांच्या मुळे घरात लहानपणापासूनच त्यांना भजनाची आवड निर्माण झाली. आणि त्यांनी तबला शिकायला सुरुवात केली.ते दहावी दोन वेळा नापास झाले. आता पुढं काय करावं? असा प्रश्न पडला.१९९२ साली ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात ते सामील झाले,त्यावेळी त्यांचे अनेक नातेवाईक वारीत सहभागी झाले होते.इथच काकांनी त्यांना पुढं शिकण्याचा सल्ला दिला. आणि परत फॉर्म भरुन तिसऱ्या वेळेस ते दहावी पास झाले.

        त्यांना हॉटेल मॅनेजमेंट ची आवड होती मात्र घरातील सर्व सांप्रदायिक कुटुंब असल्यानं प्रवेश घेतला. पण लगेचच घरातून नकार आला. मग घेतला डी. एड.ला प्रवेश आणि शिक्षक व्हायचं पक्क ठरवलं. पखवाज शिक्षणही चालूच होतं.पं.दुर्गाप्रसाद मुजूमदार,पं.गोविंद भिलारे यांच्याकडे त्यांनी काही वर्ष शिक्षण घेतलं. २००६ साली आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम गायक पं.शौनक अभिषेकी यांचा परिसस्पर्श लाभला.आणि त्यांना त्यांच्या मुळे महाराष्ट्रातील सर्व ख्यातनाम कलाकारांना आज पर्यंत पखवाज साथ करण्याचं भाग्य लाभलं.महाराष्ट्रा बरोबर जम्मू काश्मीर, हरियाणा, दिल्ली, छत्तीसगड,गुजरात, कर्नाटक अशा राज्यातही मोठमोठे कार्यक्रमात ते सहभागी झाले,आणि जगातील सर्वात मोठ्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवातही त्यांनी साथ दिली.अभिजात शास्त्रीय संगीत प्रचार आणि प्रसारासाठी गेली अनेक वर्ष संगीत महोत्सवाचे यशस्वी आयोजन ते करत असतात.

          हे सर्व करत असताना शाळेकडेही त्यांनी दुर्लक्ष केलं नाही.अनेक मुलं स्कॉलरशिप परिक्षेत उत्तीर्ण झाली . व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेत चमकली.शाळा हेच दैवत मानून आजपर्यत २३ वर्षात ज्या ज्या शाळा मिळाल्या त्या त्या शाळेचं नंदनवन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा बरोबर प्रत्येक शाळा हिरवीगार करण्याचा प्रयत्न केला.सध्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकर वस्ती शाळेत २५००० रुपये खर्च करून शाळा हिरवीगार केली आहे. येथील पालकांनी जवळपास ५लाखाचा निधी जमवून शाळेच्या सर्वं भौतिक गरजा पूर्ण केल्या आहेत. आई-वडिलांचं पूजन मुलींसाठी सायकल बँक यासारखे उपक्रम त्यांनी शाळेत सुरू केले.

      स्वरपंढरी पंचायत समितीच्या गीतमंचातून अनेक शाळांमधून कार्यक्रम सादर केले. सोलापूर जिल्हा परिषद,पंचायत समिती पंढरपूर यांचे आदर्श शिक्षक पुरस्कार ,संगीत क्षेत्रातील सोलापूरचा शिवरंजनी कला गौरव पुरस्कार ,पंढरी कला गौरव पुरस्कार पंढरपूर,असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले.

      अचानक वडिलांचा मृत्यू झाला १३ दिवसाचा कालावधी १३ दिवस स्मशानभूमी स्वच्छ करुन पाळला.आणि सामाजिक पर्यावरण आणि स्वच्छता या कार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतलं . सर्व तरुण युवकांच्या आणि महिलांच्या सहकार्यानं करकंब मध्ये 'करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम',जागर स्वच्छता अभियान टीमची स्थापना केली. आणि करकंब गावच्या प्रवेशद्वाराजवळच ४०० ते ५०० झाडं लावून ती जोपासण्याचं काम त्यांनी सुरू केलं.खर म्हणजे झाडं लावणं खूप सोपं! पण जोपासनं तसं कठीणच. या कामात परिसरातील हजारो हात त्यांच्या मदतीला धावले.ही झाडं आता डौलानं डोलत आहेत. माहेरला गेलेल्या प्रत्येक मुलीच्या नावानं आणि आलेल्या प्रत्येक मुलीच्या नावानं ही झाडं आपली लेक म्हणून वाढवली जातात. करकंब परिसरातील अनेक लेकी या उपक्रमासाठी पुढं आल्या.

        झाडांबरोबरच जागर स्वच्छता अभियान टीम चं कामही सुरू झालं. प्रत्येक रविवारी सकाळी दोन तास एक विभाग गेली दोनवर्ष अखंडपणे स्वच्छ करीत असताना माणसांची मनं आणि त्यांची मानसिकता बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

     महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही दखल घेऊन अभिनंदनपर पत्र दिलं.हे काम करीत असतानाच सहकारी मित्रांच्या सल्यानं एकलव्य अभ्यासिकेचा संकल्प केला. यामधून विविध स्पर्धापरीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल असा दुधाने यांना विश्वास वाटतो.

     नादब्रह्म कला फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम ते राबवितात. ११मुलांना शिक्षणासाठी त्यांनी दत्तक घेतले असून त्यांच्या शिक्षणाचा खर्च ते त्यांच्या सर्व टीम मार्फत करणार आहेत. अशा या अष्टपैलू शिक्षकास प्रोत्साहित करत हातात हात घालून सर्व युवक वर्ग कामाला लागला आहे.

3.मोडनिंब च्या अशोक ढोबळे यांचा मिशन स्कॉलरशिप पॅटर्न

 


    पुणे सोलापूर रस्त्याच्या कडेला मोडनिंब हे एक शहरवजा गाव! मिरच्यांची बाजारपेठ म्हणून पूर्वीच्या काळी प्रसिद्ध असलेल्या या गावानं अलीकडच्या काळात राजकीय, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रासोबतच शैक्षणिक क्षेत्रात खूपच क्रांती केलेली दिसून येते. सहा सात खाजगी शैक्षणिक संस्था असतानासुद्धा मुलांमुलींसाठी 900 च्या आसपास पट असणाऱ्या दोन शाळा इथल्या विविध उपक्रमामुळे आणि स्पर्धा परीक्षेच्या यशामुळे आजही टिकून आहेत. याचं सर्व श्रेय गुणवत्तेसाठी कष्ट घेणारे इथले शिक्षक, त्यांना सहकार्य करणारे पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांचेच.

        इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेसाठी सतत ज्यादा तास घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना सलग यश मिळवून देणारे इथले अशोक ढोबळे सर..

          जून 2018 साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.1 मोडनिंब येथे बदलीने उपशिक्षक म्हणून ते रुजू झाले. पालक व ग्रामस्थांकडून मोडनिंब सारख्या पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या गावातील जिल्हा परिषद शाळेमधून शिष्यवृत्ती,नवोदय, सैनिक स्कूल यांसारख्या परीक्षांमध्ये विद्यार्थी यशस्वी का होत नाहीत? याबाबत पालकांमध्ये सतत होणारी चर्चा आणि त्यावर उपाययोजना यासाठी ... सर्व शिक्षकांनी अंतर्मुख होऊन विचार केला.आपल्या शाळेचं नाव चांगल्या गोष्टींसाठी चर्चेत यावं आणि गावाच्या शाळेकडून शालेय स्पर्धापरीक्षा संदर्भानं ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात या उद्देशानं तत्कालीन केंद्रप्रमुख रामकृष्ण केदार यांच्या मार्गदर्शनाखाली 'मिशन स्कॉलरशिप' हा उपक्रम त्यांनी सुरू केला.

         या उपक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी रात्र अभ्यासिका, मॉर्निंग स्टडी,गेस्ट लेक्चर, प्रॅक्टीस टेस्ट,मॉक टेस्ट, ऑनलाईन वर्ग इत्यादी उपक्रम त्यांनी विद्यार्थ्यांसाठी राबवले . शाळेच्या वेळेव्यतिरिक्त जादा तास घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं . अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचे सराव प्रश्नसंच त्यांच्याकडून सोडवून घेतले. त्यांच्यामध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण केली. सहशिक्षिका जयश्री शिंदे यांच्या सोबत श्री ढोबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि तब्बल आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. पैकी एक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आला, एका विद्यार्थ्याची नवोदय विद्यालय पोखरापूरसाठी निवड झाली तर एका विद्यार्थ्याची सैनिक स्कूल चंद्रपूरसाठी निवड झाली.

          हे दैदिप्यमान यश त्यांना केवळ एका वर्षात मिळालेले नाही तर इयत्ता पहिलीपासूनच त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यास सुरुवात केली होती. कोरोना महामारीच्या संकटकाळामध्ये सुद्धा मुलांचं शिक्षण थांबू नये म्हणून त्यांनी 'शाळा बंद पण शिक्षण चालू' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास व टेस्ट घेत त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू दिला नाही.

           एक मार्चपासूनच इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमाला त्यांनी सुरुवात केली.एकही दिवस सुट्टी न घेता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये देखील ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं शिक्षण चालूच ठेवलं.

     शाळा सुरू झाल्यावर स्कॉलरशिपचा स्वतंत्र वर्ग करून विद्यार्थ्यांना आठवड्यातून चार दिवस स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम तर दोन दिवस नवोदयचा अभ्यासक्रम सुरू केला.शनिवारी आणि रविवारी देखील सुट्टी न घेता अतिरिक्त पूरक मार्गदर्शन आणि सराव चाचण्या घेतल्या.शाळा सुटल्यानंतर रात्र अभ्यासिका व शाळा भरण्यापूर्वी मॉर्निंग स्टडी घेन्याचा विद्यार्थ्यांना फायदा झाला. या काळात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक शिक्षणाबरोबरच त्यांनी दिवसभर कोणता आहार घ्यावा,आरोग्य कसं सांभाळावं, भावनिक संतुलन कसं ठेवावं, यासंदर्भानंही मुलांची काळजी घेतली. मुख्य परीक्षेपूर्वी शाळेमध्येच परीक्षेसारखे कृत्रिम वातावरण निर्माण करत विद्यार्थ्यांच्या मॉक टेस्ट घेतल्या.


त्यांनी विद्यार्थ्यांकडून स्कॉलरशिपच्या 200 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका मुख्य परीक्षेपर्यंत सोडवून घेतल्या.प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर आव्हानात्मक प्रश्नांविषयी वर्गामध्येच चर्चा केली.मुलांच्या शंकांचे निरसन केले . यामुळेच शिष्यवृत्ती , नवोदय परीक्षा आणि सैनिकी स्कूल परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना एवढे मोठे यश मिळाले. नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळेमध्ये विविध स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले.


        शिष्यवृत्ती सोबतच दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, स्वच्छ शाळा सुंदर शाळा,ध्यास गुणवत्तेचा,दशसूत्री कार्यक्रम, एक मूल एक झाड,ऑनलाईन वर्ग आदी अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन ते यशस्वी केले आहेत.इंग्रजी आणि मराठी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची हातोटी ज्या शिक्षकांमध्ये आहे ते शिक्षक शाळा विद्यार्थी आणि गावामध्ये कायापालट करू शकतात हे याचं उत्तम उदाहरण आहेअशा या गुणी शिक्षकांमुळे शाळेचा पट वाढण्यास नक्कीच मदत होते यात शंकाच नाही..