विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Sunday, 3 September 2023

3.मोडनिंब च्या अशोक ढोबळे यांचा मिशन स्कॉलरशिप पॅटर्न

 


    पुणे सोलापूर रस्त्याच्या कडेला मोडनिंब हे एक शहरवजा गाव! मिरच्यांची बाजारपेठ म्हणून पूर्वीच्या काळी प्रसिद्ध असलेल्या या गावानं अलीकडच्या काळात राजकीय, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रासोबतच शैक्षणिक क्षेत्रात खूपच क्रांती केलेली दिसून येते. सहा सात खाजगी शैक्षणिक संस्था असतानासुद्धा मुलांमुलींसाठी 900 च्या आसपास पट असणाऱ्या दोन शाळा इथल्या विविध उपक्रमामुळे आणि स्पर्धा परीक्षेच्या यशामुळे आजही टिकून आहेत. याचं सर्व श्रेय गुणवत्तेसाठी कष्ट घेणारे इथले शिक्षक, त्यांना सहकार्य करणारे पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांचेच.

        इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेसाठी सतत ज्यादा तास घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना सलग यश मिळवून देणारे इथले अशोक ढोबळे सर..

          जून 2018 साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.1 मोडनिंब येथे बदलीने उपशिक्षक म्हणून ते रुजू झाले. पालक व ग्रामस्थांकडून मोडनिंब सारख्या पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या गावातील जिल्हा परिषद शाळेमधून शिष्यवृत्ती,नवोदय, सैनिक स्कूल यांसारख्या परीक्षांमध्ये विद्यार्थी यशस्वी का होत नाहीत? याबाबत पालकांमध्ये सतत होणारी चर्चा आणि त्यावर उपाययोजना यासाठी ... सर्व शिक्षकांनी अंतर्मुख होऊन विचार केला.आपल्या शाळेचं नाव चांगल्या गोष्टींसाठी चर्चेत यावं आणि गावाच्या शाळेकडून शालेय स्पर्धापरीक्षा संदर्भानं ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात या उद्देशानं तत्कालीन केंद्रप्रमुख रामकृष्ण केदार यांच्या मार्गदर्शनाखाली 'मिशन स्कॉलरशिप' हा उपक्रम त्यांनी सुरू केला.

         या उपक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी रात्र अभ्यासिका, मॉर्निंग स्टडी,गेस्ट लेक्चर, प्रॅक्टीस टेस्ट,मॉक टेस्ट, ऑनलाईन वर्ग इत्यादी उपक्रम त्यांनी विद्यार्थ्यांसाठी राबवले . शाळेच्या वेळेव्यतिरिक्त जादा तास घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं . अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचे सराव प्रश्नसंच त्यांच्याकडून सोडवून घेतले. त्यांच्यामध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण केली. सहशिक्षिका जयश्री शिंदे यांच्या सोबत श्री ढोबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि तब्बल आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. पैकी एक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आला, एका विद्यार्थ्याची नवोदय विद्यालय पोखरापूरसाठी निवड झाली तर एका विद्यार्थ्याची सैनिक स्कूल चंद्रपूरसाठी निवड झाली.

          हे दैदिप्यमान यश त्यांना केवळ एका वर्षात मिळालेले नाही तर इयत्ता पहिलीपासूनच त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यास सुरुवात केली होती. कोरोना महामारीच्या संकटकाळामध्ये सुद्धा मुलांचं शिक्षण थांबू नये म्हणून त्यांनी 'शाळा बंद पण शिक्षण चालू' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास व टेस्ट घेत त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू दिला नाही.

           एक मार्चपासूनच इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमाला त्यांनी सुरुवात केली.एकही दिवस सुट्टी न घेता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये देखील ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं शिक्षण चालूच ठेवलं.

     शाळा सुरू झाल्यावर स्कॉलरशिपचा स्वतंत्र वर्ग करून विद्यार्थ्यांना आठवड्यातून चार दिवस स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम तर दोन दिवस नवोदयचा अभ्यासक्रम सुरू केला.शनिवारी आणि रविवारी देखील सुट्टी न घेता अतिरिक्त पूरक मार्गदर्शन आणि सराव चाचण्या घेतल्या.शाळा सुटल्यानंतर रात्र अभ्यासिका व शाळा भरण्यापूर्वी मॉर्निंग स्टडी घेन्याचा विद्यार्थ्यांना फायदा झाला. या काळात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक शिक्षणाबरोबरच त्यांनी दिवसभर कोणता आहार घ्यावा,आरोग्य कसं सांभाळावं, भावनिक संतुलन कसं ठेवावं, यासंदर्भानंही मुलांची काळजी घेतली. मुख्य परीक्षेपूर्वी शाळेमध्येच परीक्षेसारखे कृत्रिम वातावरण निर्माण करत विद्यार्थ्यांच्या मॉक टेस्ट घेतल्या.


त्यांनी विद्यार्थ्यांकडून स्कॉलरशिपच्या 200 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका मुख्य परीक्षेपर्यंत सोडवून घेतल्या.प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर आव्हानात्मक प्रश्नांविषयी वर्गामध्येच चर्चा केली.मुलांच्या शंकांचे निरसन केले . यामुळेच शिष्यवृत्ती , नवोदय परीक्षा आणि सैनिकी स्कूल परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना एवढे मोठे यश मिळाले. नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळेमध्ये विविध स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले.


        शिष्यवृत्ती सोबतच दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, स्वच्छ शाळा सुंदर शाळा,ध्यास गुणवत्तेचा,दशसूत्री कार्यक्रम, एक मूल एक झाड,ऑनलाईन वर्ग आदी अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन ते यशस्वी केले आहेत.इंग्रजी आणि मराठी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची हातोटी ज्या शिक्षकांमध्ये आहे ते शिक्षक शाळा विद्यार्थी आणि गावामध्ये कायापालट करू शकतात हे याचं उत्तम उदाहरण आहेअशा या गुणी शिक्षकांमुळे शाळेचा पट वाढण्यास नक्कीच मदत होते यात शंकाच नाही..


No comments:

Post a Comment