विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Saturday, 16 September 2023

5.नाविन्यपूर्ण उपक्रमातून प्रतापसिंह मोहिते साधतात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

 ...


               ग्रामीण भागात वाडी वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या शाळेत मन लावून काम करणारे, विद्यार्थ्यासोबतच समाजात मिसळून शाळेच्या भौतिक गरजा त्यांच्याकडून पूर्ण करून घेणारे अनेक शिक्षक आपल्याला दिसतात. मुख्य रस्त्यापासून आणि शहरापासून थोडंसं दूर असल्यानं त्यांचं काम त्यांच्या शाळेपुरतच मर्यादित राहतं कधीकधी. खरंतर शिक्षकांनी केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम,गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न हे त्यांच्या पुरते मर्यादित न राहता ते सर्वदूर पोहोचले पाहिजेत जेणेकरून त्यांच्या एखाद्या उपक्रमातून इतरांनाही काहीतरी नवीन मार्ग सापडतो.

               प्रतापसिंह नाशिकराव मोहिते हे त्यातीलच एक.सतत काहीतरी नवीन करण्याचा ध्यास घेतलेला अवलिया शिक्षक.अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांचा विकास घडविणारे.त्यांनी शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय काम तर केले आहेच शिवाय सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.बालभारती, एससीइआरटी मध्ये राज्य व जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमात तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करताना आपल्या उपक्रमातून तालुक्यातील इतर शिक्षकांना प्रेरित करण्याचं काम त्यांनी केलं आहे.राष्ट्रीय स्तरावरील एज्युकेशनल कॉन्फरन्स मध्ये विविध राज्यांच्या प्रतिनिधींसोबत सहभागी होऊन विचारांची देवाणघेवाण करून विद्यार्थ्यांना प्रयोगशील बनवण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं आहे.त्यांनी मार्गदर्शन केलेल्या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये,तालुका जिल्हास्तरावर सन्मान मिळवला आहे.

               विविध आंतरराष्ट्रीय दिन उपक्रमात सहभाग व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी शाळेत युनिस्को स्कूल क्लबची स्थापना जिल्ह्यात सर्वप्रथम त्यांनी केली.विद्यार्थ्यांना ज्ञानरचनात्मक अध्यापन पद्धतीनं अभ्यासाची गोडी लावली.शाळेत विविध उपक्रम विद्यार्थी आणि सहकारी शिक्षकाच्या सहाय्याने सुरू केले.तंत्रज्ञान वापरून ई लर्निंग द्वारे अध्यापनात नावीन्यता आणली.त्यांनी राबविलेल्या ज्ञानरचनावादी उपक्रमाचं कौतुक तत्कालीन सीईओ अरुण डोंगरे व राजेंद्र भारुड साहेब यांनी स्वतः त्यांच्या शाळेत येऊन केलं होतं.

                100% विद्यार्थी उपस्थित रहावे म्हणून शाळेत परिपाठापासून नवनवीन उपक्रम राबवण्यात आले.राज्य शासनानं सुरु केलेल्या शिकू आनंदे कार्यक्रमात त्यांनी उत्कृष्टरित्या सादरीकरण केलं,अवांतर वाचनात गोडी लागावी म्हणून शनिवार माझ्या गोष्टीचा या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली.शाळेत अनेक गोष्टीची पुस्तके आणून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावली. शिक्षक पालक यांच्यात योग्य समन्वय रहावा यासाठी विद्यार्थी वाढदिवस ते स्वतः स्वखर्चानं शाळेत पालकासमवेत साजरा करतात. त्यातून भेट वस्तूच्या रूपात शालेय भौतिक सुविधांची पूर्तता करतात .पालक-महिला मिळावे, माता पालकांच्या विविध स्पर्धा , व्यावहारिक ज्ञान मिळावे म्हणून शाळेत बाल आनंद बाजार, सांस्कृतिक कार्यक्रम,विद्यार्थी दिन, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचा वापर,विविध कलाकृती बनवण्यासाठी कला,शिक्षणाची वारी,शाळेत सहलीच्या माध्यमातून मंदिर, किल्ला व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, मुलांच्या प्रवेशासाठी गुढीपाडवा अन पट वाढवा उपक्रम यासारख्या अनेक उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी श्री मोहिते यांनी केली आहे.

                 आपत्कालीन स्थितीत मदतीची भावना वाढीस लागण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्त भागात विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने बिस्किट पुड्यांचे वाटप त्यांनी विद्यार्थी खाऊच्या रकमेतून केले, ग्रीन स्कूल ग्रीन व्हिलेज अंतर्गत वृक्ष लागवड,रक्षाबंधन दिवशी शाळेतील मुलींनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस दादांना राखी बांधण्याचा कार्यक्रम, सैनिकांना राखी पाठवण्याचा उपक्रम, होळी सणा निमित्त गावातील कचऱ्याची व अविचारांची होळी असे विविध उपक्रम मोहिते यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येतात.विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी म्हणून विद्यार्थ्यांचे बचत खाते उघडण्यात आले,त्यातूनच पोस्टामार्फत बचत शाळा म्हणून शाळेचा गौरव झाला.

                     आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून फक्त आपल्या शाळेपुरतं  मर्यादित न राहता महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पनेतून विकास व्हावा यातून पत्नी माधुरी (प्राथमिक शिक्षिका) यांच्या संकल्पनेतून शाळा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेची निर्मिती केली.या माध्यमातून विद्यार्थी हिताच्या अनेक संकल्पना प्रत्यक्षात उतरवल्या. कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद असताना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण देणं  असो वा शोध गुणवंताचा ही पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबविणं  असो यातून विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र होण्यास खारीचा वाटा उचलण्याची संधी त्यांना मिळाली.त्याचबरोबर ऑनलाइन वुईथ माय चित्रकला स्पर्धा,कोण होणार फास्टर फिंगर मास्टर प्रश्न मंजुषा स्पर्धा, महाराष्ट्राचा शिववक्ता ही वक्तृत्व स्पर्धा, डॉ अब्दुल कलाम वाचन अभिवादन स्पर्धा,टॉपर सामान्यज्ञान परीक्षा,फास्टर गणित स्पर्धा असे विविध उपक्रम राज्यस्तरावर राबवून विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न सातत्यानं त्यांनी केला आहे. शहीद जवानांच्या स्मारकांना भेटीतून मानवंदना देणं हे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम त्यांनी हाती घेतले. त्याचबरोबर गावातील सैनिकांना शाळेत बोलून त्यांचा सन्मानही केला .मोहिते यांना कुटुंबीयांची साथ नेहमीच मिळत असते.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता अभियान,निवडणूक कार्य,मतदार जागृती ,राष्ट्रीय सेवा योजनेत जनजागृती,भारत स्काऊट गाईड अंतर्गत कब बुलबुल युनिटची स्थापना,गोवर लसीकरण मोहिमेत सहभाग,केंद्रस्तर स्वच्छता मॉनिटर म्हणून निवड,त्याचबरोबर भारत सरकारच्या विविध मंत्रालयाच्या वतीनं आयोजित ऑनलाइन प्रतिज्ञा उपक्रमामध्ये सहभाग घेऊन राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र प्राप्त केलं आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन ,स्वच्छता शपथ, मृदा संवर्धन, नमामी गंगे ,संविधान दिन ,एकता दिन ,इंधन बचत, हुंडाबंदी ,महिला हक्क, टीबी फ्री इंडिया यासारख्या उपगक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे.शाळा सिद्धी राज्यनिर्धारक म्हणून ही काम पाहिलं आहे.मूल्यवर्धन कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केल्याने राज्य स्तरावरील पुस्तकात त्यांची दखल घेण्यात आली आहे.ई बालभारती च्या माध्यमातून सध्या सुरु असलेल्या व्हर्चुअल क्लाससाठी त्यांची निवड झाली आहे.

                 प्रतापसिंह मोहिते यांनी केलेल्या कार्याचा आलेख पाहून अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं आहे. नुकतंच त्यांना आयसीटीसी पुरस्कारानं मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आलं आहे.त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय शिक्षक संमेलना मध्ये शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला आहे,राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव पुरस्कार,शिक्षकरत्न पुरस्कार,मनोरमा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार ,शांतीलाल मुथा फाउंडेशनचा मूल्यवर्धन पुरस्कार ,रोटरी क्लबचा राष्ट्र शिल्पकार पुरस्कार ,राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार, लोकमत एक्सलंट टीचर अवॉर्ड,आविष्कार फाऊंडेशन शिक्षक सन्मान, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक सन्मान, लायन्स शिक्षकरत्न पुरस्कार, सर फाऊंडेशनचा जिल्हास्तरीय प्रयोगशील शिक्षक सन्मान,शिक्षक व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमांमध्ये पारितोषिक, पंचायत समिती गुणवत्तापूर्ण विद्यार्थी शिक्षक म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.सध्या ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यानगर वसाहत साकत ता-बार्शी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

             सतत नवनवीन उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करताना सहकारी शिक्षकांचं, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांचं खूप योगदान मिळतं असं ते आवर्जून सांगतात.

No comments:

Post a Comment