विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Thursday, 25 July 2024

38.विठ्ठल भालेराव यांचं धनुर्विद्या खेळातलं योगदान

 प्राथमिक शाळेपासूनच खेळाची आवड. संपूर्ण राज्याला परिचित असणारं आर्चरी खेळाचं ऊर्जा स्रोत असणाऱ्या संत सावतामाळी विद्यालयात माध्यमिक शिक्षण आणि तिथूनच क्रीडा क्षेत्रात प्राविण्य दाखवून पुढं  स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असं स्वप्न मनी बाळगत अपार कष्ट करणारा विद्यार्थी विठ्ठल भालेराव. धनुर्विद्या खेळातला सराव चालू ठेवत, पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करत बीए बी पी एड पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं आणि शांतिनिकेतन माध्यमिक विद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून भालेराव यांनी नोकरी स्वीकारली. आता स्पर्धा परीक्षेतलं स्वप्न विद्यार्थ्यांच्या रूपानं पूर्ण करायचं ठरलं आणि धनुर्विद्या याच खेळावर लक्ष केंद्रित करत अरण मध्ये पहिल्यांदा ज्यांनी धनुर्विद्या हा खेळ आणला ते हरिदास रणदिवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायला भालेराव यांनी सुरुवात केली.

        

          भालेराव राज्यस्तरीय स्पर्धेत  चार वेळा खेळले , राष्ट्रीय स्पर्धेत खेळले पण यश प्राप्त करता आले नाही.  महाराष्ट्र संघाचा ब्लेजर मिळावा हे स्वप्न अपूरं राहिलं मग 2011 पासून विद्यार्थ्यांना धनुर्विद्या प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.  एका विद्यार्थ्यावर सुरू केलेलं प्रशिक्षण पुढं शंभर विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन पोहोचलं.

       त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी नव नवीन रेकॉर्ड तयार केलं.  2018 साली त्यांनी निवासी गुरुकुल सुरू केलं.फक्त आपल्याच विद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलं नाही तर राज्यातील अनेक  विद्यार्थी त्यांच्या धनुर्विद्या प्रशिक्षण गुरुकुलात सामील झाले.

त्यांचा मुलगा विश्व रत्नने तर दहा वर्षाखालील गटात महाराष्ट्रात पाच गोल्ड मेडल प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला . नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट पतीयाला आर्चरी कोलकत्ता येथून त्यांनी प्रशिक्षण कोर्स पूर्ण केला आणि भालेराव यांची महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झाली.  खेळाडू म्हणून महाराष्ट्र संघाचा ट्रॅक सूट मिळावा अशी त्यांची इच्छा होती पण धनुर्विद्या प्रशिक्षण प्रशिक्षक म्हणून  आंध्र प्रदेशात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांना  ट्रॅक सूट मिळाला हा त्यांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण .

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विकास मोरे या खेळाडूने सुवर्णपदक प्राप्त केले. एक खेळाडू खेलो इंडीयासाठी पात्र झाला ,एक खेळाडू दोन वेळा राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाला, 17 खेळाडू  राष्ट्रीय स्पर्धेत विजेते आहेत तर  25 खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत पदक प्राप्त केलं आहे. त्यांचे दोन खेळाडू सध्या  खेळामधूनच प्रशासकीय सेवेमध्ये  कार्यरत आहेत. 

       एक चांगला खेळाडू एक चांगला प्रशिक्षक होऊ शकत नाही आणि चांगला प्रशिक्षित एक चांगला खेळाडू होऊ शकत नाही हे एका पुस्तकात वाचलं होतं. ते इथं तंतोतंत जुळलेलं दिसून येत होतं. गरीब कुटुंबातून निर्माण झालेला खेळाडू, पुढं तुटपुंज्या पगारावर नोकरी करत असलेला शिक्षक आणि त्यांची धनुर्विद्या प्रशिक्षणासाठी चाललेली  धडपड पाहून अनेक मित्रांनी त्यांना मदत केली. डॉ. प्रवीण पाटील , सुदीपची शहा आणि आकाश  माने  

यांनी आर्थिक रुपानं तर कायमस्वरूपी खिलाडूवृत्ती जागृत रहावी यासाठी संजय शिंदे सर, रणजीत चामले सर हे भालेराव सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

      धनुर्विद्या हा खेळ खरंतर खूप खर्चिक आहे. ज्या विद्यार्थ्यांना खेळाची आवड आहे आणि बौद्धिक क्षमता ही चांगली आहे. अशा विद्यार्थ्यांचा  स्पर्धा परीक्षेकडे बऱ्यापैकी कल दिसून येतो. भविष्यात अशा विद्यार्थ्यांसाठी आपण मार्गदर्शन करणार आहोत असे त्यांनी सांगितले.

Friday, 12 July 2024

37. माने गुरुजी नव्हे... कौठाळीचे साने गुरुजी



      सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात अगदी कडक निर्णय घेणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही आपला निर्णय बदलून गुरुजींची बदली थांबवायला भाग पाडणारे कौठाळी गावचे श्रद्धास्थान म्हणजे राजेंद्र माने गुरुजी !

1997 मध्ये माने गुरुजींना कौठाळी गावात नेमणूक मिळाली. राजकारणाच्या बाबतीत गाव बरच गाजलेलं. रेशन दुकानाची केस हाय कोर्टात तर गोबरगॅस टाकीचा विषय विधानसभेत गाजविणारं गाव ! पण मराठी शाळेच्या बाबतीत राजकारण गेटच्या बाहेर सोडून एकदिलानं सहकार्य करणारे ग्रामस्थ अशी आगळी वेगळी ओळख असणाऱ्या गावात रविंद्र देशमुख व राजेंद्र भाईकट्टी यांनी या गावात शैक्षणिक वातावरण निर्माण केलं होतं .

         त्या काळात चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत , सैनिक स्कुल व नवोदय प्रवेश परीक्षा या स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी चमकले होते.माने गुरुजींना काम करण्याची चांगली संधी मिळाली. त्या काळात शिष्यवृत्ती परीक्षा फक्त तालुकास्तरावर एकाच केंद्रावर व्हायची.अगदी पारदर्शक ! एखादा विद्यार्थी जरी गुणवत्ता यादीत चमकला तरी ग्रामस्थ त्या शिक्षकाचं खूप कौतुक करायचे .पदवीधर शिक्षक माणिक घोडके गुरुजी यांनी माने गुरुजींना खूप प्रोत्साहन दिलं. आणि कौठाळी शाळेचा एक नवा शिष्यवृत्ती पॅटर्न उदयास आला. 

  सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल 17 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले.राज्य गुणवत्ता यादीत मुले झळकली. 

           केवळ स्पर्धा परीक्षाच नव्हे तर शैक्षणिक ताक धीना धीन , विचारा तुम्ही सांगतो आम्ही , शैक्षणिक सहली , विविध गुणदर्शन कार्यक्रम , बालनाट्य , क्रीडास्पर्धा या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गुरुजी अगदी तन मन धनानं झटत होते.गुरुजींनी शाळेची सहल मुंबईला नेली, स्वतः हार्मोनिअम शिकून विद्यार्थ्यांचा संगीत वादक संच तयार केला, सांस्कृतिक कार्यक्रमात दरवर्षी विनोदी बातम्या सादर करून लोकांना खळखळून हसविले . हे सारे करत असताना कधी निम्मी पगार तर कधी आख्खी पगार गुरुजींनी विद्यार्थ्यांसाठी खर्च करून टाकली. त्या काळात गुरुजी व विद्यार्थी शाळेतच राहत. मुले फक्त अंघोळीला घरी जायचे. पहाटे साडे पाच ते रात्री अकरा पर्यंत शाळा व तास चालायचे. 

    दिवाळीला फक्त तीन दिवस सुट्टी ! बाकी वर्षभर शाळा सुरु ! त्या दहा- बारा वर्षात गुरुजींनी एकही रजा घेतली नाही. अशा शैक्षणिक वातावरणामुळं कौठाळी शाळेनं सलग दहा वर्षे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार पटकविला. 

माने गुरुजींनी गावाला जितकं दिलं त्यापेक्षा जास्त गावानं गुरुजींना दिलं.त्या काळात हॉटेल,फोन,वाहतूक यांची सुविधा नव्हती. परंतु अचानक आठ दहा शिक्षक मुक्कामी राहिले तरी एकदाही शिक्षकांना उपाशी झोपावं लागत नसायचं. दररोज संध्याकाळी एक दोन पालक शाळेत चक्कर टाकायचे व आवर्जून जेवण पाठवायचे.बऱ्याच पालकांची आर्थिक ओढाताण असली तरी स्टेज कट्टा , फरशीकरण , सर्व वर्गात डेस्क, वॉल कंपाउंड , स्पीकर सेट, वादन संच अशा सर्व सुविधा लोकांनी उपलब्ध करून दिल्या.

अचानक माने गुरुजींची प्रशासकीय बदली झाली. गावातील लोकांनी निर्णय घेतला.बदली होऊ द्यायची नाही. लोकांनी मुलांना शाळेत पाठवीणंच बंद केलं. 300 पटाची शाळा ओस पडली. सर्व अधिकारी भेट देऊन विनंती करू लागले.शेवटी मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी स्पेशल केस म्हणून गुरुजींची बदली रद्द केली !

        उत्तर सोलापूर तालुक्यातील एक चारित्र्यसंपन्न आजातशत्रू आदर्श शिक्षक म्हणून माने गुरुजींची ओळख आहे.     

          गुळवंची येथे काही दिवस काम करण्याची संधी गुरुजींना मिळाली. त्यानंतर आता सध्या बीबीदारफळ येथे शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ते काम पाहतात. मॉडेल स्कुल म्हणून शासनानं या शाळेची निवड केले आहे.त्यादृष्टीनं तालुक्यासाठी एक संपन्न शाळेची निर्मिती करण्याची संधी माने गुरुजीला मिळाली आहे. ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजीतसिंह डिसले यांची सहा महिन्यांची इंटर्नशीप माने गुरुजींच्या हाताखालीच कौठाळी येथे झाली होती. डिसले सरांना न्यूज चॅनलवाल्यांनी विचारल्यानंतर त्यांनी त्यांचे आदर्श म्हणून माने गुरुजींचच नाव घेतलं होतं. शाळेसाठी संपूर्ण समर्पण करणाऱ्या अशा काही आदर्श गुरुजींमुळेचं जिल्हा परिषदेच्या शाळा आज भयानक स्पर्धेतही टिकून आहेत.

Wednesday, 3 July 2024

36.बार्शी चे पांडुरंग कांबळे

 शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गावामध्ये जिल्हा परिषदेच्या दोन उच्च प्राथमिक शाळा आणि एक हायस्कूल असून हे गाव बार्शीच्या जवळच असल्यानं खाजगी शाळांचं सुद्धा इथल्या काही पालकांना आकर्षण आहे. एवढ्या सगळ्या शैक्षणिक पसाऱ्यामध्ये जिल्हा परिषद शाळेचं अस्तित्व, पटसंख्या आणि शाळेचं नावलौकिक वाढवण्यात मुख्याध्यापक पांडुरंग कांबळे गुरुजी यांचं काम कौतुकास्पद आहे.

        गुरुजी शाळेत येण्याअगोदर शाळेची फार दुरावस्था झाली होती .सर्वप्रथम शाळेला पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था त्यांनी करून घेतली. 

सर्व स्वच्छतागृहे अद्यावत करून घेतली .

 ग्रामपंचायत , शाळा व्यवस्थापन समिती, आणि सर्व वर्गाच्या पालक सभा घेऊन तीन वर्षाचा कृती आराखडा गुरुजींनी तयार केला. सर्व पालकांनी शब्द दिला "तन-मन-धनानं आम्ही शाळेत तुमच्या सोबत आहोत".शाळेचं रूपडं बदलण्यासाठी दुसरं काय लागतं! सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक कामाला लागले. परसबाग स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला . पुढे मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धा आली . शाळेतील शिक्षक हरिश्चंद्र थोरात , गोरोबा यावलकर , सुनिता उकिरडे, वंदना कुलकर्णी , स्मिता तेलकर , आशा व्हनकळस, राजकन्या वलसे यांनी

कांबळे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली एक नियोजन तयार केलं. कामाला सुरुवात झाली आणि बघता बघता भकास दिसणारी शाळा अतिशय सुंदर, स्वच्छ, आनंददायी दिसू लागली आणि या स्पर्धेत सुद्धा जिल्ह्यात पाच लाख रुपयाचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं .इंग्रजी सारख्या विषयात विद्यार्थी मागं राहू नयेत म्हणून स्वतः गुरुजींनी इंग्लिश डे सारखा उपक्रम चालू केला ,तो अतिशय फलदायी ठरला. दर शनिवारी इंग्लिश डे हा उपक्रम शाळेत घेतला जातो.

  विद्यार्थ्यांना खेळांची गोडी लागावी म्हणून सर्व मैदानं जूनमध्येच तयार केली जातात. मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत . त्यामुळेचं क्रीडा स्पर्धेत शाळा तीन क्रीडा प्रकारात तालुक्यात उपविजेती ठरली. व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेचे सुद्धा शाळा पहिल्या तीन क्रमांकामध्ये आली . गुरुजींनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली, नवोदय विद्यालयासाठी एक विद्यार्थी शाळेतून पात्र झाला. स्थानिक कारागिरांच्या मदतीनं इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याचा गुरुजींनी प्रयत्न केला.शिक्षकांनी स्वखर्चातून शाळेची रंगरंगोटी केली. मुख्याध्यापक आणि सहकारी शिक्षक यांच्या मधला सुसंवाद हेच शाळेच्या प्रगतीतलं पहिलं पाऊल असतं.म्हणूनच तर सकाळी नऊ पासून सुरू झालेली शाळा संध्याकाळी सात वाजेपर्यंत भरलेली असते .

     अतिशय शांत ,संयमी ,उच्च विद्या विभूषित अभ्यासू , कामसू ,शिक्षक वर्ग शाळेस लाभलेला आहे. जसा मुख्याध्यापक तशी शाळा असं नेहमी म्हटलं जातं हे या शाळेला तंतोतंत लागू पडतं.गावातील लहानांपासून वृद्धांपर्यंत शाळेविषयी भरभरून बोलतात. आणि हीच खरी पावती शाळेसाठी ऊर्जा देणारी ठरते असं येथील शिक्षकांना वाटतं.अप्रगत विद्यार्थ्यां ना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पूरक उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी गुरुजींनी केली आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक कामाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे त्यामध्ये

जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, 

मराठा सेवा संघ बार्शी यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार , यांचा समावेश आहे.

35.रझिया इस्माईल जमादार.....

 शिक्षणाचा नवीन विचार प्रवाह ,डॉक्टर, इंजिनीयर, आयटी याच क्षेत्राची विद्यार्थ्यांची असलेली पहिली पसंती, यामुळं आपली मुलं बालवाडी अंगणवाडी पासूनच इंग्रजी शाळेत शिकलीच पाहिजेत असा असलेला पालकांचा अट्टाहास यामुळं गावोगावी जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळांकडं  सर्वांचाच बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतानाच जिल्ह्यातील असंख्य उपक्रमशील आणि विद्यार्थ्यांसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या शिक्षकांमुळं   या शाळा आजही खाजगी आणि इंग्रजी शाळांसोबत स्पर्धेत टिकून आहेत.

      अक्कलकोट तालुक्यातील     न.प.प्रा.मराठी मुलींची शाळा नंबर१ येथील

रझिया इस्माईल जमादार या नगरपालिकेच्या शाळांमध्ये त्यांच्या नवनवीन  उपक्रमांमुळं सर्वांना परिचित आहेत. वाचन ,लेखन ,चित्रकला ,गाणी ऐकणं, कविता लेखन, वेगवेगळे सर्जनशील शैक्षणिक उपक्रम, शैक्षणिक साहित्य निर्मिती अशा अनेक गोष्टींचा त्यांना छंद आहे.

दै.संचार,दै.सकाळ,दै.तरूणभारत,दै.दिव्यमराठी,दै.अक्कलकोट समर्थ इ.वर्तमानपत्रां मधून कविता,वाचकांचा पत्रव्यवहार,साद -प्रतिसाद, चारोळ्या,उखाणे, चित्र काव्य लेखन,सखीसाठी लेखन,दै.सकाळ 'सप्तरंग' पुरवणीमध्ये लेखन केले आहे . त्यांचे 'प्राणी आपले मित्र ' हे बालकाव्य प्रसिद्ध आहे.

 वाचन विकासासाठी विविध कृतींची,उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी त्यांनी केली.सकाळ एन आय ई व एमटेक इंजिनिअर्स आयोजित  "शालेय  शिक्षकांनी असा साधला संवाद " या राज्यस्तरीय लेखन स्पर्धेत त्यांनी प्रथम पारितोषिक मिळवलं.

 छात्र प्रबोधन,ज्ञानप्रबोधिनी पुणे यांच्या प्रबोधन दूत योजनेत त्यांचा  सहभाग आहे. विविध स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी वाचनालयासाठी पुस्तके मिळवली आहेत.

स्वच्छ भारत सुंदर भारत अभियानांतर्गत  वक्तृत्व,निबंध ,प्रकटवाचन ,चित्रकला,गीत गायन सामूहिक तथा वैयक्तिक ,नृत्य, पथनाट्य, नाट्यीकरण यासारख्या विविध उपक्रमात भाग घेऊन विद्यार्थ्यांना यश मिळवून दिले. नगरपरिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या प्रत्येक स्पर्धेमधे विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळालीआहेत. वर्तमानपत्रांतून विद्यार्थ्यांना चित्रकलेतून मूल्यसंवर्धन या उपक्रमांतर्गत स्वत: चित्रे काढण्यास प्रेरित केले.आजतागायत त्यांच्या विद्यार्थ्यांची दोनशे चित्रे आणि विद्यार्थी लिखित विनोद विविध वर्तमानपत्रांमध्ये छापून आले आहेत. वाचन कोपरा,वर्गग्रंथालय ,शाळाग्रंथालय ,श्री.शहाजी वाचनालय येथे दररोज एक तास वाचनासाठी,अभिवाचन स्पर्धा, प्रकटवाचन स्पर्धा ऑनलाईन बडबडगीत स्पर्धा, यामध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. 

 नागपूर आकाशवाणी वर शाळाबाहेरची शाळा  कार्यक्रमांतर्गत  १ते१० संख्यांची ताबडतोब बेरीज यासाठी त्यांचा विद्यार्थी योगेश बन्ने याची आकाशवाणी वर १५ मिनिटांची  यशस्वी मुलाखत झाली. विद्यार्थी सर्वच क्षेत्रात पारंगत व्हायला हवा हा त्यांचा अट्टाहास असतो. लेखक कृषीभूषण विश्वासराव कचरे,चित्रकार,लेखक,शिक्षक मयूर दंतकाळे सर यांच्याशी  विद्यार्थ्यांची पत्रमैत्री, रेडिओ पुणेरी आवाज,मुली रंगल्या काव्यात ,काव्य तुमचे तरंग आमचे यामध्ये त्यांच्या विद्यार्थिनींचे स्वलिखित कवितांचे सादरीकरण RJ माधवी पवार यांनी केले आहे.बालकुमार दिवाळी अंक, कोल्हापूर यामध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कविता व चित्रे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या स्वतःच्या आणि विद्यार्थ्यांच्या कविता आणि विविध लेखन कौशल्य पाहून तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व मुंबई महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्याहस्ते सन्मानपत्र,सन्मानचिन्ह व शालेय साहित्य देऊन त्यांना सन्मानित केले आहे.

अशा या गुणी, साहित्यावर प्रेम करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना करायला लावणाऱ्या शिक्षिकांचा  आजपर्यंत विविध पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. त्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी गुणवंत शिक्षक पुरस्कार,सर फाऊंडेशन,स्टेट इन्नोवेटीव प्राईज, राज्यस्तरीय प्रयोगशील शिक्षक पुरस्कार सन ,पंचायत समिती अक्कलकोट, आदर्श शिक्षक पुरस्कार.लायन्स क्लब अक्कलकोट आदर्श शिक्षक पुरस्कार सन ,

न.प.शिक्षण मंडळ अक्कलकोट, आदर्श शिक्षक पुरस्कार ,सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार ,विश्वभान प्रतिष्ठान मुंबई ऑनलाईन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार ,९ वा राष्ट्रीय अक्कलकोट भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार यांचा समावेश आहे.

34.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी झटणाऱ्या सुप्रिया ताकभाते

 मूल जेव्हा शाळेतून शिकून बाहेर पडतं त्यावेळी त्याचा सर्वांगीण विकास झालेला असला पाहिजे. कौशल्यदिष्टीत अभ्यासक्रमाचं हेच तर खरं वैशिष्ट्य आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत सुप्रिया ताकभाते या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माढा मुले नं.१ येथे  दहा वर्षे तर  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विठ्ठलवाडी येथे पाच वर्षांपासून सेवा करत आहेत . नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी त्या सातत्यानं झटत आहे.  वक्तृत्व, कथाकथन, नृत्य, चित्रकला, बुद्धिबळ, एकपात्री नाटक, क्रीडा, पोस्टर इत्यादी स्पर्धेत त्यांच्या विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा स्तरापर्यंत क्रमांक पटकाविले आहेत.

            कोरोना काळात राबविलेले सामान्य ज्ञानावर आधारित 'प्रश्नांचा गुरुवार' आणि सहज, सोपे प्रयोग असणारा 'रविवारचा प्रयोग' हे उपक्रम पूर्ण महाराष्ट्र राज्यासोबत गोवा राज्यातही जाऊन पोहोचले होते.    कोरोना काळात  ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचा  ऑनलाइन अभ्यास घेत शैक्षणिक प्रवाहात त्यांना ठेवण्याचं मोठं काम श्रीमती ताकभाते मॅडम केलं होतं.

     क्षितिज फाउंडेशनच्या मदतीनं त्या मुलांच्या आरोग्य सुधारण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून पोषण आहार सप्ताह शाळेत राबवितात. हात धुवादिनानिमित्त राबवलेल्या उपक्रमाची दखल UNICEF या संस्थेनं घेतली आहे. युनिसेफने जागतिक जल दिना निमित्त  शाळेतील त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या उपक्रमांचे  व्हिडिओही मागवून घेतले.

       किशोरवयीन मुलींना मासिक पाळी विषयी मार्गदर्शक,या वयात आई आणि मुलींचं नातं , दृढ करण्यासाठी विविध स्पर्धा, चर्चासत्र, उद्बोधन वर्ग त्या आयोजित करतात.

      विठ्ठलवाडी हे गाव स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. यासाठी प्राथमिक शाळेपासूनच विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लावली जाते.  'माझा वाढदिवस पुस्तकांसोबत' या उपक्रमाअंतर्गत शाळेसाठी पंचवीस हजाराची पुस्तके   वाचनालयासाठी संग्रहित केली आहेत. तसेच इतर सामाजिक संस्थांकडून कडून पंचवीस हजाराची पुस्तके प्राप्त करून घेतली आहेत. त्यांचे विद्यार्थी सकाळचा एनआयइ हा अंक नियमित वाचतात.

     पर्यावरण हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. परंपरा जपूया, पर्यावरण राखूया! माझे पुस्तकाचे वाण, प्लास्टिक मुक्ती इत्यादी अनेक उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी त्या राबवतात.

      सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकण्यासाठी स्पर्धा परीक्षा जोरदार तयारी करून घेतात. त्यामुळेच शिष्यवृत्ती आणि इतर स्पर्धा परीक्षेत त्यांचे विद्यार्थी गुणवत्ता यादीतही दरवर्षी चमकतात. कलागुणांना वाव देण्यासाठी बालसभा, नवरात्रीच्या नवदुर्गा, रांगोळी ,निबंध लेखन अशा स्पर्धा आवर्जून घेतात. इंग्रजी वाचन, लेखन, संभाषण यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमही त्या शाळेमध्ये राबवतात.

    शैक्षणिक आणि इतर विषयावरील त्यांचे लेखन जीवन शिक्षण, जीवन गौरव, सकाळ वर्तमानपत्रात प्रकाशित झाले आहे. सर फाउंडेशन आयोजित नवोपक्रम स्पर्धेतही त्यांच्या उपक्रमाची निवड झाली आहे. 

   मतदान जनजागृती, घर घर तिरंगा, लेट्स चेंज, केंद्र स्तरीय शिक्षण परिषदेला विविध विषयावर मार्गदर्शन, तंबाखूमुक्त शाळा, जागर योजनांचा उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग. सेल्फी विथ सक्सेस, गोष्टीचा शनिवार, आनंददायी शनिवार, विद्यार्थी बचत बँक, आरोग्याकडून अभ्यासाकडे, सामान्य ज्ञान प्रश्न आणि परीक्षा, ई लर्निंग , लर्न विथ फन, गप्पांचा तास यासारखे अनेक उपक्रम त्या शाळेत राबवितात. त्यामुळेच त्यांना उपक्रमशील शिक्षिका हा बहुमान मिळत आहे.

पुरस्कार 

जिल्हा परिषद सोलापूर मार्फत शिष्यवृत्ती विभागातून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका  पुरस्कार, सर फाउंडेशन मार्फत जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कार, रोटरी क्लब कडून नेशन बिल्डर अवार्ड, क्षितिज फाउंडेशन कडून एस्पायरिंग वुमेन अवार्ड, अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलना मार्फत सावित्रीबाई फुले पुरस्कार, कृतिशील शिक्षिका पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.