विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Wednesday, 3 July 2024

36.बार्शी चे पांडुरंग कांबळे

 शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गावामध्ये जिल्हा परिषदेच्या दोन उच्च प्राथमिक शाळा आणि एक हायस्कूल असून हे गाव बार्शीच्या जवळच असल्यानं खाजगी शाळांचं सुद्धा इथल्या काही पालकांना आकर्षण आहे. एवढ्या सगळ्या शैक्षणिक पसाऱ्यामध्ये जिल्हा परिषद शाळेचं अस्तित्व, पटसंख्या आणि शाळेचं नावलौकिक वाढवण्यात मुख्याध्यापक पांडुरंग कांबळे गुरुजी यांचं काम कौतुकास्पद आहे.

        गुरुजी शाळेत येण्याअगोदर शाळेची फार दुरावस्था झाली होती .सर्वप्रथम शाळेला पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था त्यांनी करून घेतली. 

सर्व स्वच्छतागृहे अद्यावत करून घेतली .

 ग्रामपंचायत , शाळा व्यवस्थापन समिती, आणि सर्व वर्गाच्या पालक सभा घेऊन तीन वर्षाचा कृती आराखडा गुरुजींनी तयार केला. सर्व पालकांनी शब्द दिला "तन-मन-धनानं आम्ही शाळेत तुमच्या सोबत आहोत".शाळेचं रूपडं बदलण्यासाठी दुसरं काय लागतं! सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक कामाला लागले. परसबाग स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला . पुढे मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धा आली . शाळेतील शिक्षक हरिश्चंद्र थोरात , गोरोबा यावलकर , सुनिता उकिरडे, वंदना कुलकर्णी , स्मिता तेलकर , आशा व्हनकळस, राजकन्या वलसे यांनी

कांबळे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली एक नियोजन तयार केलं. कामाला सुरुवात झाली आणि बघता बघता भकास दिसणारी शाळा अतिशय सुंदर, स्वच्छ, आनंददायी दिसू लागली आणि या स्पर्धेत सुद्धा जिल्ह्यात पाच लाख रुपयाचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं .इंग्रजी सारख्या विषयात विद्यार्थी मागं राहू नयेत म्हणून स्वतः गुरुजींनी इंग्लिश डे सारखा उपक्रम चालू केला ,तो अतिशय फलदायी ठरला. दर शनिवारी इंग्लिश डे हा उपक्रम शाळेत घेतला जातो.

  विद्यार्थ्यांना खेळांची गोडी लागावी म्हणून सर्व मैदानं जूनमध्येच तयार केली जातात. मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत . त्यामुळेचं क्रीडा स्पर्धेत शाळा तीन क्रीडा प्रकारात तालुक्यात उपविजेती ठरली. व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेचे सुद्धा शाळा पहिल्या तीन क्रमांकामध्ये आली . गुरुजींनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली, नवोदय विद्यालयासाठी एक विद्यार्थी शाळेतून पात्र झाला. स्थानिक कारागिरांच्या मदतीनं इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याचा गुरुजींनी प्रयत्न केला.शिक्षकांनी स्वखर्चातून शाळेची रंगरंगोटी केली. मुख्याध्यापक आणि सहकारी शिक्षक यांच्या मधला सुसंवाद हेच शाळेच्या प्रगतीतलं पहिलं पाऊल असतं.म्हणूनच तर सकाळी नऊ पासून सुरू झालेली शाळा संध्याकाळी सात वाजेपर्यंत भरलेली असते .

     अतिशय शांत ,संयमी ,उच्च विद्या विभूषित अभ्यासू , कामसू ,शिक्षक वर्ग शाळेस लाभलेला आहे. जसा मुख्याध्यापक तशी शाळा असं नेहमी म्हटलं जातं हे या शाळेला तंतोतंत लागू पडतं.गावातील लहानांपासून वृद्धांपर्यंत शाळेविषयी भरभरून बोलतात. आणि हीच खरी पावती शाळेसाठी ऊर्जा देणारी ठरते असं येथील शिक्षकांना वाटतं.अप्रगत विद्यार्थ्यां ना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पूरक उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी गुरुजींनी केली आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक कामाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे त्यामध्ये

जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, 

मराठा सेवा संघ बार्शी यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार , यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment