सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात अगदी कडक निर्णय घेणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही आपला निर्णय बदलून गुरुजींची बदली थांबवायला भाग पाडणारे कौठाळी गावचे श्रद्धास्थान म्हणजे राजेंद्र माने गुरुजी !
1997 मध्ये माने गुरुजींना कौठाळी गावात नेमणूक मिळाली. राजकारणाच्या बाबतीत गाव बरच गाजलेलं. रेशन दुकानाची केस हाय कोर्टात तर गोबरगॅस टाकीचा विषय विधानसभेत गाजविणारं गाव ! पण मराठी शाळेच्या बाबतीत राजकारण गेटच्या बाहेर सोडून एकदिलानं सहकार्य करणारे ग्रामस्थ अशी आगळी वेगळी ओळख असणाऱ्या गावात रविंद्र देशमुख व राजेंद्र भाईकट्टी यांनी या गावात शैक्षणिक वातावरण निर्माण केलं होतं .
त्या काळात चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत , सैनिक स्कुल व नवोदय प्रवेश परीक्षा या स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी चमकले होते.माने गुरुजींना काम करण्याची चांगली संधी मिळाली. त्या काळात शिष्यवृत्ती परीक्षा फक्त तालुकास्तरावर एकाच केंद्रावर व्हायची.अगदी पारदर्शक ! एखादा विद्यार्थी जरी गुणवत्ता यादीत चमकला तरी ग्रामस्थ त्या शिक्षकाचं खूप कौतुक करायचे .पदवीधर शिक्षक माणिक घोडके गुरुजी यांनी माने गुरुजींना खूप प्रोत्साहन दिलं. आणि कौठाळी शाळेचा एक नवा शिष्यवृत्ती पॅटर्न उदयास आला.
सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल 17 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले.राज्य गुणवत्ता यादीत मुले झळकली.
केवळ स्पर्धा परीक्षाच नव्हे तर शैक्षणिक ताक धीना धीन , विचारा तुम्ही सांगतो आम्ही , शैक्षणिक सहली , विविध गुणदर्शन कार्यक्रम , बालनाट्य , क्रीडास्पर्धा या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गुरुजी अगदी तन मन धनानं झटत होते.गुरुजींनी शाळेची सहल मुंबईला नेली, स्वतः हार्मोनिअम शिकून विद्यार्थ्यांचा संगीत वादक संच तयार केला, सांस्कृतिक कार्यक्रमात दरवर्षी विनोदी बातम्या सादर करून लोकांना खळखळून हसविले . हे सारे करत असताना कधी निम्मी पगार तर कधी आख्खी पगार गुरुजींनी विद्यार्थ्यांसाठी खर्च करून टाकली. त्या काळात गुरुजी व विद्यार्थी शाळेतच राहत. मुले फक्त अंघोळीला घरी जायचे. पहाटे साडे पाच ते रात्री अकरा पर्यंत शाळा व तास चालायचे.
दिवाळीला फक्त तीन दिवस सुट्टी ! बाकी वर्षभर शाळा सुरु ! त्या दहा- बारा वर्षात गुरुजींनी एकही रजा घेतली नाही. अशा शैक्षणिक वातावरणामुळं कौठाळी शाळेनं सलग दहा वर्षे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार पटकविला.
माने गुरुजींनी गावाला जितकं दिलं त्यापेक्षा जास्त गावानं गुरुजींना दिलं.त्या काळात हॉटेल,फोन,वाहतूक यांची सुविधा नव्हती. परंतु अचानक आठ दहा शिक्षक मुक्कामी राहिले तरी एकदाही शिक्षकांना उपाशी झोपावं लागत नसायचं. दररोज संध्याकाळी एक दोन पालक शाळेत चक्कर टाकायचे व आवर्जून जेवण पाठवायचे.बऱ्याच पालकांची आर्थिक ओढाताण असली तरी स्टेज कट्टा , फरशीकरण , सर्व वर्गात डेस्क, वॉल कंपाउंड , स्पीकर सेट, वादन संच अशा सर्व सुविधा लोकांनी उपलब्ध करून दिल्या.
अचानक माने गुरुजींची प्रशासकीय बदली झाली. गावातील लोकांनी निर्णय घेतला.बदली होऊ द्यायची नाही. लोकांनी मुलांना शाळेत पाठवीणंच बंद केलं. 300 पटाची शाळा ओस पडली. सर्व अधिकारी भेट देऊन विनंती करू लागले.शेवटी मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी स्पेशल केस म्हणून गुरुजींची बदली रद्द केली !
उत्तर सोलापूर तालुक्यातील एक चारित्र्यसंपन्न आजातशत्रू आदर्श शिक्षक म्हणून माने गुरुजींची ओळख आहे.
गुळवंची येथे काही दिवस काम करण्याची संधी गुरुजींना मिळाली. त्यानंतर आता सध्या बीबीदारफळ येथे शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ते काम पाहतात. मॉडेल स्कुल म्हणून शासनानं या शाळेची निवड केले आहे.त्यादृष्टीनं तालुक्यासाठी एक संपन्न शाळेची निर्मिती करण्याची संधी माने गुरुजीला मिळाली आहे. ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजीतसिंह डिसले यांची सहा महिन्यांची इंटर्नशीप माने गुरुजींच्या हाताखालीच कौठाळी येथे झाली होती. डिसले सरांना न्यूज चॅनलवाल्यांनी विचारल्यानंतर त्यांनी त्यांचे आदर्श म्हणून माने गुरुजींचच नाव घेतलं होतं. शाळेसाठी संपूर्ण समर्पण करणाऱ्या अशा काही आदर्श गुरुजींमुळेचं जिल्हा परिषदेच्या शाळा आज भयानक स्पर्धेतही टिकून आहेत.
No comments:
Post a Comment