विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Wednesday, 17 January 2024

15.शाळेच्या भौतिक सुविधामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे गोरख राऊत गुरुजी

 शाळेच्या भौतिक सुविधामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे गोरख राऊत गुरुजी


       बरडा वरची शाळा म्हणून ओळखली जाणारी माळरानावरची जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अरण. शाळेचा शताब्दी महोत्सव सध्या सुरू आहे. एकही झाड ज्या ठिकाणी रुजत नव्हतं, टिकत नव्हतं, फुलत नव्हतं अशा ठिकाणी आज ही शाळा निसर्ग शाळा म्हणून ओळखली जाते. ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी तर ही शाळा पाहून रवींद्रनाथांच्या शांती वनातील शाळा  असा उल्लेख केला होता.

याच शाळेत 2001 पासून तन-मन-धनाने झोकून देऊन काम करणारे गोरख राऊत गुरुजी यांचं या शाळेचं रूप पालटवण्यात खूप मोठा वाटा आहे. 

       दरवर्षी 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिना दिवशी अरण आणि तुळशी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पट्टी, पेन्सल, पाटी, पॅड, पेन, कंपासपेटी अशा स्वरूपात जवळ जवळ पंधरा हजार रुपया पर्यंतचे शैक्षणिक साहित्याचे वाटप गोरख राऊत गुरुजी आणि त्यांचे सहकारी मित्र पोपट पाटील सर हे करतात. त्यांचे हे कार्य गेले पंधरा वर्षे सतत अविरतपणे सुरू आहे.

स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. इयत्ता पाचवी  नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेचे जादा तास दररोज ते घेतात. यामध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी यशही मोठ्या प्रमाणात मिळालेलं  आहे. आतापर्यंत नवोदयसाठी 3  आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 31 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास स्पर्धा, गुणवत्ते साठी विविध उपक्रम, स्वखर्चाने आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त वाटप केल्या जाणाऱ्या साहित्याच्या वाटपासोबतच  लोकसहभागातून,  शैक्षणिक उठावातून, आजी-माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेतील भौतिक सुविधांमध्ये कशाप्रकारे वाढ होईल यावर सतत काम करून एखाद्या खाजगी नामांकित संस्थेसारखी शाळा उभी केली आहे. शाळेतील सर्व शिक्षकांना सोबत घेऊन त्यांच्या प्रयत्नातून अरण शाळेत कोरोना काळात एक मोठे सभागृह उभे राहिले आहे. सध्या चालू  असलेल्या  शाळा शताब्दी महोत्सवानिमित्त शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने किलबिल बालोद्यान  शाळेत उभे केले आहे .

शाळेचे माजी विद्यार्थी पोपट पाटील यांच्या सहकार्यातून  केलेला आर्थिक मदतीतून पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे नूतनीकरण करण्यात आले. शाळेसमोरील मैदानावर पेपर ब्लॉक टाकून  घेतले. मुलांच्या मदतीने रंगरंगोटी करून  शाळेच्या भिंती बोलक्या करण्यात आल्या. या सर्व कार्यात गोरख राऊत सर गुरुजी अग्रेसर असतात. त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार ,तालुक्याचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका शांता वाघमोडे मॅडम यांच्या प्रोत्साहामुळे गोरख राऊत गुरुजी आणि त्यांचे शिक्षक सहकारी यांच्या मदतीने अरण शाळेची इमारत आज डौलात उभी आहे.

Wednesday, 10 January 2024

14.सृजनशील शिक्षक : राजकिरण चव्हाण

 सृजनशील शिक्षक : राजकिरण चव्हाण


   शिक्षणात नाविन्य राखायचं असेल तर सतत नवनवीन प्रयोग करावेच लागतात. विद्यार्थ्यांना भविष्यवेधी शिक्षणाची जोड द्यावी लागते. यासाठी स्वतःपासूनच पुढाकार घेणं आवश्यक आहे. या विचारानं गेली सतरा वर्षे सातत्यानं धडपडणारे सोलापूरच्या श्री समर्थ विद्यामंदिरचे शिक्षक राजकिरण चव्हाण हे नाव 'सृजनशील शिक्षक' म्हणून सर्वपरिचित आहेत.

    २१ व्या शतकातील सक्षम विद्यार्थी घडण्यासाठी विविध शैक्षणिक प्रयोगांबरोबरच त्यांना नवनवीन आव्हानं द्यायला हवीत. यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करतात. डिजिटल कन्स्ट्रक्टिव्हिजम, आविष्कार, सर्वंकष लैंगिकता शिक्षण, बाप्पा-अध्यात्म आणि अभ्यासही!, आम्ही किती भयंकर?, चुप्पी तोडो, वारली पेंटिंग, डॉ. विजय भटकर कॉम्प्युटर लिटरसी प्रोग्राम, कॅलिग्राफी, बैठक ॲट स्कूल, फलकलेखन स्पर्धा, लाठीकाठी, छंदवर्ग व क्षेत्रभेट यासारखे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असे नाविन्यपूर्ण उपक्रम ते राबवत असतात.

     उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांच्या 'आयकॉनिक क्लब' उपक्रमाला शरद पवारांच्या हस्ते एक लाख रुपयाची इन्स्पायर फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील उद्याचं नेतृत्व शालेयस्तरापासूनच विकसित करण्यासाठी या क्लबच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. यामुळे आज शाळेतील विद्यार्थी इन्स्पायर अवॉर्ड, इसरो ऑनलाईन कोर्स, इग्नायटेड माईंड, टॅलेंट हंट अशा विविध स्पर्धांमध्ये यशस्वी होताना दिसत आहेत.

   राजकिरण चव्हाण ‘शिक्षणात तंत्रज्ञान’ या विषयावर विशेष काम करत आहेत. आजवर सोळा हजारपेक्षा जास्त शिक्षकांना ऑनलाईन-ऑफलाईन प्रशिक्षणांद्वारे तसेच यूट्यूब चॅनल व ब्लॉगच्या माध्यमातून शिक्षणात तंत्रज्ञान प्रभावीपणे वापरासंदर्भात मार्गदर्शन केले आहे. दैनिक सकाळमध्ये ‘शिक्षणात तंत्रज्ञान’ या सदरासाठी विपुल लेखन त्यांनी केले आहे. दीक्षा ॲप, ई-बालभारती व्हर्च्युअल क्लास, आठवी स्कॉलरशिपसाठी ई-कंटेंट निर्मिती, शाळेतील शिक्षकांची तंत्रज्ञान वापरासंदर्भातील भीती कमी करण्यासाठी ‘फरगेट द टेक्नोफोबिया’ या अभिनय कार्यशाळेचे आयोजन, सोलापूर मनपा शिक्षण मंडळाच्या ‘ज्ञान की बात’ उपक्रमाचे टीम प्रमुख म्हणून काम याशिवाय शाळेत विविध कंपन्याच्या सीएसआर फंडांच्या माध्यमातून शाळेला 'डिजिटल स्मार्ट सोलर स्कूल' करण्यात महत्त्वाचे योगदान त्यांनी दिले आहे.

    सर्व कार्याची दखल घेत त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आय.आय.एम. अहमदाबादचा टीचर इनोव्हेशन अवॉर्ड, एसएसआयडी पुणे इनोव्हेटिव्ह टीचर एक्सलन्स अवॉर्ड, सारथी उपक्रमशील शिक्षक, मनपा उपक्रमशील शिक्षक, लोकमंगल शिक्षकरत्न, लायन्स व रोटरी क्लबच्या पुरस्कारांचा प्रामुख्यानं समावेश करता येईल.

       एससीईआरटीच्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा ड्राफ्ट तयार करण्यासाठीही काम केले आहे. याशिवाय सर फाऊंडेशनचे आयटी विभागप्रमुख म्हणून काम पाहतात. सर फाउंडेशन मार्फत चालवला जाणारा अविष्कार प्रोजेक्ट त्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवला असून समस्या शोधणं आणि त्यावर उपाययोजना करणं, विद्यार्थ्यांमधली संशोधक वृत्ती जागृत करणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी अविष्कार कार्यशाळा त्यांनी घेतल्या. कृतिशील विद्यार्थी शोधले. त्यांच्यामध्ये नवोपक्रमाची आवड निर्माण केली. यासाठी श्री चव्हाण यांचं कार्य कौतुकास्पद आहे.


कोरोना काळातही शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण

कोरोनात काळात शिक्षकांना तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी ‘ट्रेनिंग फ्रॉम होम’ या ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन, शिक्षकांना वारंवार पडणाऱ्या प्रश्नांना एकत्रित करून एफ.ए.क्यू. कॅम्पेन ही ४० व्हिडिओंची मालिका तयार केली. द बेटर इंडिया ने याची ‘कोरोना हिरोज’ म्हणून दखल घेतली होती.

13. होय! कर्णबधिर बालके बोलू शकतात! असे सांगणारे योगेशकुमार भांगे गुरुजी

 होय! कर्णबधिर बालके बोलू शकतात! असे सांगणारे योगेशकुमार भांगे गुरुजी


         ऐकू आणि बोलता न येणाऱ्या बालकांच्या पालकांचा आधारस्तंभ. समस्त पालकांमधील सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व. सतत सहानुभूतीच्या ओझ्याखाली वाकलेल्या, न्यूनगंडतेणं पछाडलेल्या, दैवापुढंही हात टेकलेल्या आणि काही मुलांना तर बिनधास्त वाऱ्यावर सोडून दिलेल्या पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचं काम करणारे कानाने बहिरा मुका परी नाही हे आपल्या प्रसूंनच्या माध्यमातून समाजाला दाखवत कर्णबधिर बालकांसाठी रात्रंदिवस झटणारे योगेशकुमार भांगे गुरुजी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडेकर वस्ती तुळशी ता. माढा येथे सध्या ते कार्यरत आहेत.

       मोहोळ तालुक्यातील शेटफळ हे त्यांचं मुळगाव. पहिल्यापासूनच स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वांची घडण यासाठी भांगे हे प्रयत्नशील असतात. सतरा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक करणं, सेमी इंग्रजीचा पायलट प्रोजेक्ट अस्तित्वात आणणं, आदर्श पालक सभा आणि बावी शाळेतील 14 लाखांचा शैक्षणिक उठाव, विद्यार्थ्यांचं जनरल रजिस्टर एक्सेल शीट मध्ये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी साहेबांकडून झालेलं खास कौतुक हे त्यांच्या शैक्षणिक कार्यातील अविस्मरणीय क्षण.

           विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी काम करता करता त्यांना सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. आपला मुलगा जन्मतः कर्णबधिर असल्याचं तपासात निष्पन्न झालं आणि तो बोललाच पाहिजे यासाठी वाटेल ते करण्याची तयारी ठेवत पत्नी जयप्रदा यांना सोबत घेऊन स्पीच थेरपी प्रोजेक्ट सुरू केला. आलेलं संकट हे संकट न मानता संधी मानून समाजातील अशा असंख्य मुक्या मुलांना बोलतं करण्याचं शिवधनुष्य भांगे दाम्पत्यांनी उचललं. हे कार्य खरोखरच बोलत्या माणसांनाही नि:शब्द करतं. प्रसूनसारखीच समाजातील अनेक कर्णबधिर बालकं त्यांना भेटत गेली. जवळपास 160 मुला-मुलींना स्पीच थेरपीचे धडे मिळाले. कर्णबधिर पालकांच्या डोळ्यापुढचं प्रश्नचिन्ह निघून गेलं. आणि त्यांना योग्य ठिकाण सापडलं .बोलवाडी! शेटफळ. पत्नीला सोबत घेऊन सहकारी मित्रांच्या सहाय्यानं व्हॉइस ऑफ व्हॉइसलेस अभियान सुरू झालं. प्रिसिजन कॅमशाफ्ट सोलापूर, बालाजी अमाईन्स, लोकसत्ता , यासारख्या असंख्य देणगीदारांच्या सहकार्यातून शेटफळ मध्ये बोलवाडी प्रोजेक्ट उभा राहिला.कधीच न बोलता येणारी मुलं बोलू लागली.

      राज्याच्या 2018 च्या अर्थसंकल्पात प्रत्येक कर्णबधिर बालकांसाठी एक लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.योगेश भांगे आणि जयप्रदा भांगे यांनी लिहिलेल्या 'होय कर्णबधिर बालके बोलू शकतात!' या पुस्तकाचं नाव या योजनेला देण्यात आलं.

        मुकेपणा निर्मूलनासाठी घरातली ताट वाटी तुमच्या बाळाचा मुकेपणा वाचवू शकते. हा मोलाचा संदेश देणारी ताट वाटी चाचणी आधी महाराष्ट्राला आणि नंतर संपूर्ण भारताला माहिती झाली. याच चाचणीतून जिल्ह्यातील चार हजार पाचशे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दोन लाख सत्याऐंशी हजार बालकांची ताटवाटी चाचणी घेतली. त्यातून 89 कर्णबधिर बालके आढळली. संस्थेने या बालकांवर सलग तीन वर्षे उपचार केले आज ही सर्व बालके बोलायला शिकली आहेत आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत आहेत. ... या ताट वाटी चाचणीलाच पुढे राज्यस्तरावर विविध प्रकारचे यश मिळत गेले.आणि याच मोहिमेमुळं कर्णबधीरत्वाबाबत जागृती होण्यास मदत झाली.

         मसूरी येथे देशातील आयएएस अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामध्ये ताट वाटी चाचणी या विषयावर सादरीकरण करण्याची संधी योगेश भांगे यांना मिळाली. याचाच एक भाग म्हणून अंगणवाडी ताईंना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचे एक मॉडेल तयार करण्याचे काम पुण्यामध्ये सुरू असून त्यांच्या अभ्यासक्रमात ताट वाटी चाचणीचा समावेश करण्यासाठीच्या कार्यशाळेत त्यांचा सहभाग आहे.

           शैक्षणिक कार्यासाठी त्यांना वैयक्तिक तालुका, जिल्हा अथवा राज्य कोणत्याही प्रकारचा पुरस्कार मिळाला नाही. परंतु त्यांच्या चाललेल्या या समाजसेवी कार्यासाठी आजपर्यंत त्यांना सोलापूरचा पद्माकर देव स्मृति पुरस्कार, प्रिसीजनचा सुभाष रावजी शहा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, सर फाउंडेशन महाराष्ट्र यांचा पुरस्कार, छाया प्रकाश फाऊंडेशनचा ऊर्जा पुरस्कार , राष्ट्र सेवा दलाचा राज्यस्तरीय सामाजिक शिक्षक पुरस्कार, स्नेहालय - अहमद नगरचा सामाजिक कर्तृत्त्व पुरस्कार अशा अनेक समाजसेवी संस्थांनी गौरविले आहे.बहिरेपणा आणि मुकेपणा माहितीसाठी संस्थेचे संकेतस्थळ www.bolwadi.org