विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Wednesday, 10 March 2021

भुकंपानंतरचं गाव ...!! आठवणीतला प्रसंग!

           

 भुकंपानंतरचं गाव ...!! आठवणीतला प्रसंग!!!


          भूकंपाचा विषय काढताच साठे गुरुजींचा हुंदका अनावर झाला! डोळे पाण्याने भरून आले! अश्रूला वाट मोकळी करत कसेबसे ते बोलते झाले ......"३० सप्टेंबर ९३ च्या  रात्रीच्या विषयावर बोलण्याची माझी हिम्मतच होत नाही.त्यावेळचा नुसता प्रसंग जरी डोळ्यापुढं उभा राहिला  तरी अंगाचा थरकाप उडतो! माझ्या गावातली बरीच कुटुंबं उध्वस्त  झाली , त्यांच्यासोबत माझ्या बहिणीचं कुटुंबही या भूकंपानं नजरेआड केलं. 30 सप्टेंबर च्या रात्रीच्या अंधारात आणखी किती जीव मातीआड गेले याची कल्पनाच न केलेली बरी.एरवी शाळेत एखाद्या मुलाच्या हाता पायाला दुखापत झाली तरी शिक्षकाचा जीव खालीवर होतो इथं तर एक तुकडीच भूकंपात मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती.तब्बल    ४२ विद्यार्थ्यांची नावे हजेरी पटावरुन कमी केंल्याचे  गुरुजी सांगत होते! काय अवस्था झाली असेल त्या शिक्षकाची आणि शाळेची !!! गुरुजी बोलत होते. आम्ही नि:शब्द झालो होतो.पुढचे काही प्रश्न विचारण्याचं धाडसच आमच्यात उरलं नव्हतं.

             खूप दिवसांपासून महेशराव आम्हाला किल्लारी भागात  त्यांच्या मित्रांकडं घेऊन जाणार होते. आज योग आला होता. खोचक प्रश्न विचारून  समोरच्याची बोलती बंद करणारे 

योगेश कुमार, एकाच शब्दाचे अनेक अर्थ काढून हजरजबाबीपणानं उत्तर देणारे

 विनोद वीर डॉक्टर विनय, जे का रंजले गांजले त्यांशी म्हणे जो आपुले हा विचार घेऊन पशू- पक्षी, प्राणी, झाडं-झुडपं, यांच्या मध्येच आपलं जीवन आनंदात जगणारे तानाजी इंगळे सर,

सर्वांना सोबत घेऊन स्वतःभोवती शुद्ध विचारांच्या मित्र मंडळींचं  कडं निर्माण करणारा

दादा कैलास ......यांच्यासोबत महेश रावांच्या गाडीतून जाताना हसत- हसत, गप्पा मारत  प्रवास करत आम्ही माकणी  गावापर्यंत कसे पोहोचलो  कळलंच नव्हतं.

          सर्वत्र एकसारख्या दिसणाऱ्या घरांमध्ये  साठे गुरुजींनाही  दोन खोल्यांचं घर मिळालं होतं . नंतर त्यांनी स्व:ता दोन खोल्यांचं बांधकाम केलं होतं . त्यांच्या सोबत गप्पा मारता मारता   मागील दोन तासातला प्रवास कुठल्या कुठे गेला होता.

            तेव्हा दुपारचे २ :०० वाजलेहोते.

महेशरावांचे शाळकरी दोस्त वकील मधुकर व्यंकटराव साठे, प्रशांत साठे यांना सोबत घेऊन आम्ही तेरणा धरणाच्या पायथ्याला असणाऱ्या 'माकणी' गावाकडे निघालो. काटेरी चिलारी आणि मातीचे ढिगारे यात अदृश्य झालेलं गाव आम्ही भर उन्हात शोधत  होतो.

               नाही म्हणायला गावच्या वेशीनं तेवढं गावपण जपलं होतं. कंबरंएवढं दत्ताचं, मंदिर, हेमाडपंथी राक्षस मंदिर, उंच गढीवरची अर्धवट भिंत या खुणा स्पष्ट दिसत होत्या. हेमाडपंथी राक्षस मंदिरात धन लोभापायी खोलवर  खणलेलं दिसत होतं. त्याच्याच खाणाखुणा इतरत्र पडलेल्या दिसत होत्या

                      महेश पवार यांचं हेच  जन्मगाव. इथंच पहिली ते दहावीपर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं. वडिलांच्या नोकरीमुळं इथं राहण्याचा त्यांना योग आला होता. त्या भूकंपाच्या रात्री स्वतः भावासह मातीच्या ढिगार्‍यातून बाहेर आलेले महेशराव जेव्हा त्या जागेवर गेले तेव्हा थोडा वेळ गप्पच झाले... त्या वेळच्या साऱ्या घटना त्यांच्या डोळ्यापुढं उभ्या राहिल्या  असाव्यात. "इथंच दत्ताच्या मंदिरापासून शंभर फुटावर माझं घर होतं" एवढेंच ते बोलले.जवळच  त्यांची दोन मजली शाळा होती. आम्ही त्यांच्या वर्गखोल्यात डोकाऊन पाहिलं......  तोच सातवीचा वर्ग जसच्या तसंच फळं, पंचवीस वर्षापूर्वीचे तेच सुविचार.....आतून खोल्या मात्र दारूच्या बाटल्या, गुटख्याच्या पुड्या, पत्त्यांची पानं, नी कचर्‍यानं भरून गेलेली.....आजकालच्या मौजमजेत जगणाऱ्या दारू आणि पत्त्यांच्या खेळात भरमसाठ पैसे उडवणाऱ्या मुलांना काय कळणार !!! त्यावेळच्या जीवनाची किंमत.. 

           ज्यांचे जीव गेले, ज्यांच्यामुळं

  घर दारं मिळाली ,पैसा मिळाला, मदत मिळाली ,त्यांची पिढी आजही त्याच मदतीवर घरादारावर, मिळालेल्या पैशावर  आनंदात जगते आहे.ज्यांनी या वेदनेच्या कळा सोसल्या त्यांना मात्र आजही भूकंपाची धास्ती आहे.

जवळ जवळ अशीच परिस्थिती या भागातल्या सर्वांचीच.

         किल्लारी आणि सभोवतालच्या 52 गावात हीच अवस्था. सास्तूर आणि किल्लारी या ठिकाणचे स्मृतीस्तंभ त्यावेळच्या भीषणतेची जाणीव करून देतात.

          भरपूर शेती असणारे शेतकरी. पारंपारिक शेती करून गावातच राहणारी कुटुंबं, अजूनही हुंडा पद्धतीमुळं मुलींच्या लग्नासाठी एकर-दोन एकर जमीन विकणारे आई-वडील..... 70 /80 फुटापर्यंत पक्का खडक न लागणाऱ्या जमिनी.. दूध दूभते,  कुकुट पालन या सारख्या व्यवसायाला फाटा देऊन ऐषारामात राजकारणावर तासंतास गप्पा मारत बसणारी तरुण पिढी आज इथं सुद्धा दिसते आहे....


          ......नवनाथ शिंदे,अरण.

ई लर्निंग आणि प्रिसिजन

              



        प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या

कार्यक्रमाला राज्यामध्ये 2015 पासून सुरुवात झाली. या शासन निर्णयास शिक्षणाची  सनद असं म्हटलं जातं. या शासन निर्णयांतर्गत महाराष्ट्र राज्यातील शाळा आय.एस.ओ.करणं, माहिती तंत्रज्ञान साधनांसह शाळा डिजिटल करणं , शाळांच्या भौतिक सुविधा वाढवून शाळेचा विकास करणं आणि प्रत्येक मुल शिकतं  ही संकल्पना घेऊन महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शाळेतील प्रत्येक मुल प्रगत करण्यासाठी शिक्षक, प्रशासन, पालक, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था आणि  वेगवेगळ्या औद्योगिक कंपन्या पुढे आल्या. त्यांच्या सी. एस. आर. फंडाच्या माध्यमातून शाळा विकास निधी उभा करण्याचं काम  आपल्या सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात  खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालं. 

           संपूर्ण जगात नावाजलेल्या आणि जवळ जवळ ऐंशी टक्के चार चाकी गाड्यांना कॅमशाफ्ट पुरविणाऱ्या प्रिसिजन कंपनीने प्रिसिजन फाउंडेशनच्या माध्यमातून आपला सर्व सी एस आर फंड शिक्षण प्रक्रियेकडे वळविला. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कोणत्या ई-लर्निंग साहित्याची गरज आहे. ते कोणत्या शाळेत, कोणत्या उपक्रमशील शिक्षकांना सामावून घेऊन  त्यांच्यासोबत काम करावं, याचा अभ्यास सुरू झाला.राज्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर फाउंडेशन या संस्थेने प्रिसिजन फाउंडेशनला  या कामी मोलाची मदत केली. शिक्षणातील नव विचार प्रवाह, जागतिक स्तरावरील डिजिटल 

शिक्षणाचं महत्त्व ओळखून  प्रिसिजन उद्योग समूहाचे उद्योगपती डॉ. यतीन शहा , प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सुहासिनी शहा मॅडम ,  संपर्क प्रमुख  माधवजी देशपांडे,  त्यांची सर्व टीम,यांनी सर फाऊंडेशनचे सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे प्राध्यापक बेत सर यांना सोबत घेऊन जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ई लर्निंग शिक्षण देण्यासाठीचा एक आराखडा तयार केला. दीडशे शाळांची निवड केली. प्रत्येक शाळेमध्ये स्मार्ट बोर्ड, लॅपटॉप, प्रत्येक इयत्तेचा अभ्यासक्रम, विज गेल्यानंतर शिक्षण बंद पडू नये म्हणून सोलर सिस्टिमची सोय केली. 

जिल्ह्यातील व  इतर जिल्ह्यांमध्येही डिजिटल शिक्षणाची साधने पुरविली गेली.

     आज सोलापूर जिल्ह्यातील शाळांमध्ये डिजिटल अंतर्गत ई-लर्निंग शिक्षण प्रभावीपणे चालू आहे. ज्या शाळांना  डिजिटल साहित्य मोफत दिलेले आहे या शाळेतील सर्व शिक्षकांना याचे  प्रशिक्षण देऊन त्यांना सजग केल्यामुळे आणि त्याचा वेळोवेळी आढावा घेतल्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही सोलापूर जिल्ह्यासह व इतर जिल्ह्यातील काही शाळांमध्ये ई-लर्निंग अध्ययन- अध्यापनाचे काम काही अंशी का होईना पण सुरू  आहे.

      ई लर्निंग शिक्षणाचा आयडॉल म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो अशा संगणक तज्ञ संदीप गुंड यांच्या मार्फत  शिक्षकांना ई-लर्निंग अध्यापन

 पद्धतीचं प्रशिक्षण देण्याचं महत्त्वाचं काम या संस्थेमार्फत करण्यात आलं. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, सर्व पालक वर्ग, विद्यार्थ्यांपर्यंत 

ई लर्निंग शिक्षणाचं  महत्व पटत गेलं. शेवटी ई लर्निंग शिक्षण हे अंतिम साध्य नसून  शिक्षणातील न समजणार्‍या क्लिष्ट संकल्पना, विद्यार्थ्यांच्या स्पष्ट होण्यासाठी अध्यापन आनंददायी आणि नाविन्यपूर्ण होण्यासाठी हे एक प्रभावी साधन आहे. त्यामुळे शिक्षकांनी या ई लर्निंग अध्यापन पद्धतीचं मनापासून स्वागत केलं.

             यावर्षी मात्र कोरोना या साथीच्या रोगामुळे शिक्षण व्यवस्थेसह संपूर्ण जगावर संकट कोसळलं शाळा बंद झाल्या आणि डिजिटल शिक्षण सुरू झालं. काहीच न होण्यापेक्षा विद्यार्थी ,शिक्षक, पालक या शिक्षण प्रक्रिया सोबत राहायला हवेत. यासाठी ऑनलाइन अध्यापन वर्ग सुरू झाले. आजच्या या ऑनलाईन शिक्षणासाठीचं श्रेय  काही अंशी या प्रिसिजन फाऊंडेशन आणि सर फाउंडेशन सोलापूर यांना द्यायलाच हवं. 


       

दैनिक लोकमत एक्सलंट टीचर पुरस्कार



             


        विद्यार्थ्यांची प्रगती, त्यांनी मिळविलेले यश, आत्मविश्वासानं प्रत्येक क्षेत्रात त्यांनी टाकलेलं  पाऊल हाच विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचा आरसा असतो. अशा यशस्वी मुलांमध्येच शिक्षकांचं प्रतिबिंब दिसत असतं. रात्रंदिवस विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी झटणारे कित्येक शिक्षक या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत म्हणूनच  शिक्षणाचा हा रथ अविरत चालतो आहे. शैक्षणिक क्षेत्रात नवनाथ  शिंदे या अशाच एका अष्टपैलू प्राथमिक शिक्षकाचं योगदान खरंच कौतुकास्पद आहे. 

           इयत्ता दहावी मध्ये केंद्रात प्रथम येऊन सुद्धा शिक्षण क्षेत्राची आवड म्हणून   त्यांनी डी.एड. ला प्रवेश घेण्याचं ठरवलं. डी.एड.ची पदवी घेऊन शिक्षण क्षेत्राची वाट स्वीकारली. सोलापूरातल्या नूतन प्रशाले मधून शिक्षण सेवेची सुरुवात झाली. मग लमाणतांडा, एक शिक्षकी शाळा, मुलींची शाळा अशा विविध ठिकाणचा अनुभव घेतला. राज्यातील काही नामांकित शाळांपैकी अरण जिल्हा परिषदेची शाळा एक मॉडेल शाळा उभारणीमध्ये त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. सलग 15 वर्ष याठिकाणी विविध उपक्रम कार्यान्वित करून त्यांनी शाळेचे आणि गावाचे नाव संपूर्ण राज्यात पोहोचवले.

   अरणची बरडावरची शाळा! गावापासून लांब, उजाड आणि ओसाड ठिकाणची. शिक्षण विभाग, आमदार फंड, लोकसहभाग यांच्या माध्यमातून त्यांनी शाळेतील सर्व शिक्षकांच्या मदतीने येथे पहिली संगणक लॅब सुरू केली. संगणक शिक्षक  नेमून, स्वतः संगणक शिक्षण घेऊन संगणक शिक्षण सुरू केलं. शाळेत विविध प्रकारची वृक्षलागवड करून स्मशानभूमीतल्या शाळेचं रुपांतर निसर्ग शाळेत केलं. शालेय वस्तू भांडार, परीसर साधन केंद्र, इंग्लिश लॅब, सेमी इंग्लिश शिक्षणाची व्यवस्था सुरु केली. पालक, ग्रामस्थ आणि शाळा यांच्यामध्ये सुसंवाद घडवून, त्यांन शाळेकडं खेचून आणण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली.

      शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, यासाठी  विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन केलं. अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले. इयत्ता सातवीतील एकाच वेळी 15 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड. हा त्यांच्या शैक्षणिक कार्यातला संस्मरणीय क्षण .हुशार, चतुर, सामान्य, असामान्य विद्यार्थ्यांमुळे सुचत गेलेले अनेक नवनवीन उपक्रम या शाळेत त्यांनी सुरू केले. 300 विद्यार्थीसंख्या असणारी शाळा 680 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. आसपासच्या खेड्यातून  विद्यार्थी शाळेत येऊ लागले. तत्कालीन शिक्षणाधिकारी सुमन  शिंदे यांच्या धडपड मंच  मधून त्यांना खूप काही शिकता, करता आलं. असं ते आवर्जून सांगतात.


    शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी माढा तालुका प्रज्ञाशोध परीक्षा सुरू केली. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेंद्र सिंह यांनी या याबद्दल त्यांचं कौतुक केलं.

आजी-माजी विद्यार्थी कल्याणकारी विकास योजनेअंतर्गत विद्यार्थी कल्याण निधी योजना या नावाने बँकेत तीन लाख, पन्नास हजार रुपये लोकवर्गणी जमा करून कायम ठेव ठेवली. दरवर्षी मिळालेल्या व्याजातून स्वातंत्र्यदिनी  विद्यार्थी पारितोषिक योजना सुरू केली. शिक्षणाची वारी पुणे आणि नागपूर येथील शैक्षणिक स्टॉलमधून हा लोकसहभागातून शाळा विकास उपक्रम संपूर्ण राज्यभर पोहोचवला.

   त्यांचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात चमकत आहेत . आय.आय.टी मध्ये शिकत असलेला रोहित गायकवाड, एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेत असलेला श्रीनिवास गोरे, संकेत वसेकर, बी ए एम एस च्या स्नेहा केदार ,प्राजक्ता केदार,रुग्णांना सेवा देत असलेले डॉ.धनंजय कुलकर्णी, डॉ. स्नेहल कांबळे डॉ.सोनाली भोसले हे विद्यार्थी, आर. टी. ओ. ऋषिकेश कोरडे ,  मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे आपापल्या ठिकाणी चोख सेवा बजावत आहेत. अनेक विद्यार्थी उद्योजक इंजिनियर, कृषी डिग्री, प्रगतशील शेतकरी, व्यवसायिक म्हणून आपल्या नावाचा आणि गावाचा दबदबा कायम ठेवत आहेत.

            शिंदे यांचा सोलापूर जिल्हा परिषदेनं दोन वेळा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन  गौरव केला आहे.

इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थी दाखल झालेबद्दल अधिवेशनामध्ये नागपूर येथे  शिक्षण सचिव मा. धीरजकुमार यांच्या हस्ते त्यांना  गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. याच बरोबर सोलापूर मीड टाऊन रोटरी क्लब चा गुणवंत शिक्षक पुरस्कार, मुंबई येथील लोकसेवा अकादमीचा प्राइड ऑफ नेशन पुरस्कार, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील शिक्षक रत्न पुरस्कार, माढा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार, सर फाउंडेशन सोलापूर यांचा प्रयोगशील शिक्षक पुरस्कार, कविवर्य कुसुमाग्रज राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार,  श्रावण बाळ पुरस्कार, यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

    आज पर्यंत  अनेक दैनिकासाठी प्रसंग लेखन, पत्रलेखन, काव्यलेखन, व्यक्ती चरित्र याविषयी लेखन केलं आहे.

            पंचवीस वर्षाच्या सेवा काळात त्यांनी स्वतः एम. ए. बी. एड पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असून अजून विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा अभ्यास करण्याची त्यांची इच्छा आहे. आजच्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक ज्ञानाचा झालेला विस्फोट, माहिती स्त्रोताचा महासागर ,मोबाईल, इंटरनेट, टीव्ही, वर्तमानपत्रातून मिळालेली अद्ययावत माहिती यामुळे आजची मुलं अतिशय स्मार्ट बनलेली आहेत. आपल्यापेक्षा त्यांना खूप ज्ञान आहे असं समजून शिक्षकांनी स्वतः परिपूर्ण व्हायला हवं असं त्यांना वाटतं. 

     स्पर्धेच्या युगात केवळ नोकरीचा मार्ग न शोधता विद्यार्थ्यांनी स्वतःच्या उत्पन्नाचा मार्ग शोधायला  हवा. यासाठी संधीच्या नवीन वाटा ..माहिती केंद्र, स्पर्धा परीक्षा केंद्राची निर्मिती माजी विद्यार्थी व मित्र मंडळाच्या वतीने सुरू करण्याचा त्यांचा संकल्प आहे.

जिल्हा समन्वयक सर फाउंडेशन सोलापूर, बोलवाडी प्रकल्प शेटफळ, आणि प्रिसिजन फाउंडेशन ई-लर्निंग प्रोग्रॅम सोलापूर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सतत नवनवीन योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम चालू कसे ठेवता येतील यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एका जिद्दी आईची आणि यशस्वी उद्योजकाची यशोगाथा

 एका जिद्दी आईची आणि यशस्वी उद्योजकाची यशोगाथा.....

    ज्योती नारायण केदार अचानक झालेलं  पतीचे निधन! अंगणवाडीचा तुटपुंजा पगार! छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये दोन मुली आणि एक मुलगा यांच्यासोबत कुटुंबाची आलेली एकदम जबाबदारी! जमीन असून अडचण नसुन खोळंबा अशी परिस्थिती. घरात करती सवरती एकटीच बाई. मुलींची लग्न जवळ आलेली. मुलाचं शिक्षण. अंगणवाडीची नोकरी सोडावी लागली. अरण हे स्वतःचं गावही सोडलं.मोडनिंब मध्ये येऊन एक छोटसं पत्र्याचं शेड उभारलं  आणि  जिथं राज्यातील वेगवेगळ्या व्यापारासाठी लोक इथं येतात. परिसरातल्या अनेक गावांमधील छोटे-मोठे व्यावसायिक इथं येऊन आपलं नशीब आजमावतात अशा मोडनिंब सारख्या गावात एक छोटासा व्यवसाय सुरू केला.

पाच किलो शेंगदाणे, त्यासाठी लागणारा गुळ, एक मिक्सर आणि इतर काही साहित्य विकत घेतलं. शेंगदाण्याचे लाडू बनवणे आणि ते आपल्या सभोवताली विकणे हा व्यवसाय सुरू केला. पाच वर्षांपूर्वीची ही गोष्ट.  शेंगदाण्याच्या लाडूला हाताची चव आली. तोपर्यंत मुलगा अक्षय केदार कपड्याच्या दुकानात कामाला होता. तोही आईला मदत करू लागला. वयाच्या मानानं लवकरच त्याला तरुणाईचा उन्माद काय असतो,मैत्री कुठपर्यंत करायची, समाजातले चांगलं-वाईट प्रसंग  समजले. दुकानात काम केल्यामुळ  गिर्‍हाईकां सोबत कसं बोलावं? मैत्री कशी वाढवावी? हे लवकरच त्याला समजलं. गोड बोलून बऱ्यापैकी अडचणी, समस्या, आपले प्रश्न सुटतात हे त्याला माहीत झालं. आणि दुसऱ्याच्या दुकानात काम करण्यापेक्षा म्हणजेच नोकर होण्यापेक्षा मालक  झालेलं काय वाईट! हा विचार मनात आला. मोकार फिरनं बंद झालं. दिल दोस्ती दुनियादारी चे रूपांतर व्यवसायामध्ये झालं. आईच्या हाताखाली मदत झाली. मग हळू हळू साईप्रसाद फुड्स या नावानं पत्र्याच्या शेड वर बोर्ड झळकला. लाडूची चव सबंध परिसर आणि जिल्ह्याच्या बाहेर संपूर्ण राज्यभर पसरली. अक्षय चे साईप्रसाद शेंगदाणा लाडू हा एक ब्रँड तयार झाला. मागणी वाढली. खप वाढू लागला. एक - दोन महिला कामाला ठेवल्या. मालवाहतुकीसाठी स्वतःची गाडी घेतली. व्याप वाढत गेला. मग त्याच्यासोबत बर्फी, शेंगदाणा चटणी, आणि यासारखे अनेक फूड प्रोडक्स तयार होऊ लागले. आज परिसरातील  वीस ते पंचवीस महिला  त्यांच्याकडं काम करतात. पंचवीस-तीस कुटुंबाची जबाबदारी आता अक्षय वर आहे. महिन्याला तीस-चाळीस लाखाचा टर्न ओव्हर होतो आहे. ज्या ठिकाणी लाडू तयार केले जातात तिथली स्वच्छता टापटीपपणा खरंच येऊन पाहण्यासारखा आहे.

            स्वतःच्या एका रिटेलर दुकानाचा शुभारंभ नुकताच पार पडला आहे.  मोडनिंब मध्ये एक मोठी जागा  घेतली आहे. त्या ठिकाणी साईप्रसाद फूड्स या नावानं एक मोठी कंपनी उभारण्याचा त्याचा मानस आहे. तरुणाईसाठी हा खूप मोठा संदेश तो देतो. बोलता-बोलता हसत हसत एक खंत मात्र त्यांन बोलून दाखवली. अजूनही समाज मुली च्या लग्नाचा विचार करताना मुलाचं कर्तृत्व, त्याचं व्यक्तिमत्व , चारित्र्य, या सर्व गोष्टींचा विचार करण्यापेक्षा मुलाला नोकरी आणि शेती किती आहे? याचाच अगोदर विचार करतात. त्याची धडपड आणि परिस्थितीशी दिलेली झुंज ते पाहत नाहीत.

       आपल्या सर्वांचे मित्र माधव देशपांडे सर यांचं परवा बोलता-बोलता एक वाक्य खूप आवडलं ....."आव्हानं आपली क्षमता अजमावण्यासाठी येतात. संकट आपली परीक्षा घेतात". हे वाक्य खूप आवडलं आणि समोर अक्षय दिसला... म्हणून थोडं लिहावसं वाटलं एवढच....एक विद्यार्थी म्हणून आम्हाला नेहमीच त्याचा अभिमान वाटतो.

.                

                                नवनाथ शिंदे

                             जिल्हा समन्वयक

                        सर फाउंडेशन सोलापूर

     


आठवण...

           

पंचवीस वर्षांपूर्वीची एक आठवण....


       इथं कांबळे कुठे राहतात हो? "इथं कांबळे कोण नाहीत.... असं समोरून उत्तर यायचं. तर कधी, का रे? काय काम होतं कांबळेकडे? असा प्रश्न यायचा...  मग मात्र बरं वाटायचं. कारण आम्हाला बोलता यायचं काहीतरी..... मग आमचं ठरलेलं उत्तर.... त्यांच्याकडे रूम होती भाड्याने द्यायची.... कोणीतरी म्हणेल आमच्याकडे रूम आहे. एवढ ऐकण्यासाठी  एवढा सारा खटाटोप चाललेला. मग कुणीतरी म्हणेल आमच्याकडे आहे... बघा रूम पसंत पडते का! मनातल्या मनात म्हणायचो," आता इथं पसंत पडण्याचा प्रश्न उरतोच कुठे?"

 विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर घेऊन फिरणारे आम्ही!एखाद्या गल्लीत शिरून सरळ रूम भाड्याने मिळेल का हे विचारण्याचे धाडस त्यावेळी नव्हतं. कोणीतरी काय म्हणेल! ही मनाला वाटणारी भीती कायमच सोबतीला होती! शंका येण्यासारखी आमची स्थिती होतीच जुन्या सायकलच्या कॅरेजला बांधलेली सुटकेस... काखेत मारलेली शबनम पिशवी.... आणि सार्‍या 

पसाऱ्यासह खोली बघत फिरणारे माझ्यासह दोघेजण मित्र.... एवढं सगळं करण्याचं कारणही तसंच होतं...

           पहिली खोली गडबडीनं सोडली होती... जुळे सोलापूर ची पाण्याची टाकी... त्याला लागलेल्या गळतीमुळे वाहत असलेला सततचा पाण्याचा झरा जवळच... बांधकाम करण्यासाठी एका मित्राच्या मित्राने कच्ची बांधलेली खोली... त्यामध्ये आमचं दोन महिने झालं बस्तान बसलेले. सकाळी उठायचं.. समोरून वाहणाऱ्या झर्‍यातलं बादलीभर पाणी घ्यायचं जवळच्या विजेच्या खांबावरून आकडा टाकून घेतलेल्या लाईटवर लाकडाच्या फळीच्या दोन्ही टोकाला दोन खेळ मारून त्याला बांधलेली हिटर ची तार आणि मग तयार केलेलं हे कृत्रिम हिटर सरळ बादलीत सोडायचा. गरमा गरम पाण्यानं आंघोळ करायची. सकाळी नेहरूनगर  माशाळ वस्ती येथील नामांकित शाळेत शिकवायला जायचं आणि रात्री  शिवछत्रपती रात्रशाळेत शिकायला यायचं.... असा आमचा दिनक्रम ठरलेला...

       काल अचानक हिटर चालू केला आणि पोल पासून हिटलरच्या कॉइल पर्यंत मोठी केबल जळून खाक झाली. आता काय करायचं? कोणाला सांगायचं? मालक माहित नाही? दुसऱ्याच्या भरवशावर  बिन भाड्याच्या खोलीत राहिलेलो आम्ही! काय करायचं सुचत नव्हतं! मग त्यावेळी सुचलेलं हे शहाणपण सरळ सामान घेऊनच नवी खोली शोधायची !असं ठरलेलं!! मग नवीन गल्लीत प्रवेश कसा करायचा? आणि सरळ खोली भाड्याने मिळेल का  असं कसं  विचारायचं ! म्हणून इथं कांबळे कुठे राहतात का? हे सुचलेलं....

    या सुचलेल्या साध्या प्रश्नाचं उत्तर अखेर आम्हाला मिळालं .सभोवताली सारं गवत, अडगळीची खोली ,आत मध्ये कुबट कुबट वास प्रत्येकी पन्नास रुपये प्रमाणे भाडं  ठरलं . सामान ठेवलं चावी घेतली. परंतु संध्याकाळपर्यंत तिथं राहण्याची मानसिकता तयार होईना. पुन्हा दुसऱ्या खोलीच्या शोधात बाहेर पडलो. नेहरूनगर, माशाळ वस्ती ,अशोक नगर परिसरात फिरलो आणि मनासारखी एक खोली मिळाली काही दिवस ठीक चालले परंतु पुन्हा मित्राच्या स्लीपर चप्पलचा पायर्‍या चढताना होणारा टपटप आवाज आणि रात्री दहा नंतर आमच्या  स्टोव्हचा होणारा फररर आवाज मालकाला असह्य झाला आणि लवकरच तिथूनही आम्हाला गाशा गुंडाळावा लागला..... हे सारं पडद्यामागं  चाललेलं

 हसरं दुःख पण मजेत.....

     पण प्रत्यक्षात मात्र इन शर्ट टाय घालून स्वच्छ गणवेशात सकाळी शाळेत येणारे आम्ही सर्व शिक्षक.... वर्गाच्या दरवाज्यापर्यंत मुलांना सोडवायला येणारे त्यांचे आई-वडील महिन्याला साडेतीनशे रुपयात सकाळी सात ते दुपारी दीड वाजेपर्यंत काम करणारे आम्ही  मस्त, मजेत, आनंदात होतोच कसे ?कोणास ठाऊक! पण कधीकधी हा प्रश्न आवर्जून पडतो!!!!! आणि मागच्या या साऱ्या प्रसंगाचं हसू येतं!!!!!


             नवनाथ....

अरण ची दादागिरी ते जिगरबाज अरण कर...

          

अरण ची दादागिरी ते जिगरबाज अरण कर....


          प्रत्येक गावाचं एक खास असं वैशिष्ट्य असतं आणि त्या वैशिष्ट्या नुसारच गावानं आपलं वेगळेपण जपलेलं असतं.

आमच्या लहानपणापासून गावातील प्रत्येकाच्या मनामध्ये ठासून भरलेलं वाक्य म्हणजे 'मी अरण चा आहे'. प्रत्येकाच्या नसानसामध्ये एक वेगळा अभिमान, गर्व, आणि सततचा ओसंडून वाहणारा उत्साह संचारलेला असायचा. का? कुणास ठाऊक? पण सार्‍या पंचक्रोशीत अरण हे नाव वेगवेगळ्या गोष्टींसाठी गाजलेलं असायचं.

मग ते भांडण असो, दमदाटी , मारामाऱ्या असो छोट्याशा भांडणासाठी सुद्धा संपूर्ण गाव एक व्हायचं. भांडणाला काही कारण असावच असंही नव्हतं. अगदी शुल्लक कारणासाठी सुद्धा लोक हमरीतुमरीवर यायची.शाळा ,बाजार, यात्रा ,जत्रा ही भांडणाची खास मैदानं असायची. कधीकधी तर भांडण सुरु कोणी केलं? आणि शेवट कोणी केला? भांडण का सुरू झालं होतं? हे दोघांनाही कळत नसायचं.. माणसांकडं सगळं होतं, परंतु विचार नव्हता. भांडणं व्हायची मग एकमेकांचा राग पिकांवर निघायचा, रानातली उभी पिकं उपटून टाकली जायची. रस्त्यावर पडलेल्या ट्रका रिकाम्या व्हायच्या. मनोरंजनाची साधनं नव्हती. शिक्षणाचा पत्ता नव्हता. कुटुंबं अज्ञानात आणि अंध:कारात वावरायची. अंधश्रद्धा तर होतीच पण घरात चार-पाच मुलं पाहिजेत अशी भावना प्रत्येक कुटुंबाची असायची कारण बांधावर उभा राहिलं तर आपल्याकडं पाहायची कुणाची टाप नसावी याच विचारांनं सर्वजण पेटलेली. त्यामुळे नुसती लोकसंख्या वाढली. बाकी काही नाही. असं हे सारं  इथलं वातावरण.

             1972 चा दुष्काळ. त्याकाळी विहिरींना पाणी भरपूर होतं. पण तरीही दुष्काळ होता  असं लोकं सांगतात कारण पैसा मिळणार्या पिकांची माहितीच नव्हती.अशा परिस्थितीत हरिभाऊ शिंदे ,(नाना) आणि त्यांचे सर्व सहकारी यांना वाटलं की गावात सातवीपर्यंत शाळा  आहे.  प्राथमिक शिक्षण झालं की मुलं मुली शाळा सोडतात. पुढचं शिक्षण होत नाही. यासाठी  गावात माध्यमिक शिक्षणाची सोय असावी म्हणून संत सावतामाळी विद्यालय या नावानं हायस्कूल सुरू झालं. मुलांचं शिक्षण पूर्ण होऊ लागलं. मुलीसुद्धा मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेऊ लागल्या. विठ्ठलराव शिंदे मालक यांनी ग्रामपंचायतीमध्ये वाचनालय सुरू केलं. मच्छिंद्र घाडगे सर यांनी शेती आणि पशुपालन आधुनिक पद्धतीनं कसं करावं  हे स्वतः करून लोकांना दाखवून दिलं. अरणच्या क्षितिजावर एक नवा आशेचा किरण दिसू लागला. मनातला आत्मविश्वास आणि शरीरातली रग, भांडणातली ताकद आणि मेंदूतला विचार यांनी आपली दिशा बदलली. आणि सर्व ताकदीनिशी सर्वांनी शिक्षण प्रवाहात स्वतःला झोकून दिलं.

         शिक्षण आणि शिक्षकांच्या अथक परिश्रमातून चांगले विद्यार्थी घडू लागले. अगोदरच ही संतांची भूमी असल्यानं भरकटलेले विचार सावतोबांच्या मंदिरा सोबतच शाळेच्या प्रांगणात एकत्र जमा व्हायला वेळ लागला नाही. दहावीची एक एक बॅच बाहेर पडू लागली. प्रयत्न करेल त्याला नोकरी मिळू लागली मग पोलीस भरती, सैन्य भरती, शिक्षक भरती अशा विविध ठिकाणी मुलं-मुली आपली सेवा चोख बजावू लागले. पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी विविध कंपन्यांमध्ये काही मुलांनी आपलं नशीब अजमावलं अन् हळूहळू तिथंच स्थिर झाली. वाचन संस्कृती विकसित होत गेली. मग संत सावतामाळी विद्यालय वाचनालय, आणि ग्रामपंचायत वाचनालय यातूनच पुढं प्राचार्य हरिदास रणदिवे सर यांनी पुढाकार घेऊन गावात हरिभाऊ शिंदे (नाना) सार्वजनिक वाचनालय सुरू केलं. विविध  तरुण मंडळे, सांस्कृतिक मंडळे यांच्या माध्यमातून गावाचा सांस्कृतिक विकास झाला. अशा प्रकारच्या अनेक ठिकाणी ज्ञानाची भांडारं खुली झाली .थांबलेल्या आणि सडलेल्या मेंदूला नवा विचार मिळू लागला.

अंगणवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय वेगानं आपली प्रगती करू लागले.  शिष्यवृत्ती परीक्षा , क्रीडा क्षेत्र , सांस्कृतिक क्षेत्र , व्यक्तिमत्व विकास स्पर्धा यामधूनच गावात एक मोठी सांस्कृतिक चळवळ उभी राहिली  विविध अंगांनी  अष्टपैलू विद्यार्थी घडू लागले. स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी चमकू लागले.प्रत्येक ठिकाणी अरण चं नाव आदरानं घेतलं जाऊ लागलं

           राजकारण ,समाजकारण, शिक्षण, नोकरी ,शेती, पशुपालन आणि उद्योगधंदे यामध्ये प्रत्येकांनी मिळेल तिथं स्वतःला झोकून दिलं आणि स्वतःला सिद्ध करून दाखवलं. योग्य नियोजन ,जबाबदारी  पेलण्याची तयारी ,धाडशी प्रवृत्ती  यामुळं प्रत्येक क्षेत्रात  अरण करांचा दबदबा कायम राहीला. जे करायचं ते शंभर टक्के जीव ओतून आणि अचूक करायचं हे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतून इथली मुलं शिकली. शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग झाले. कमी पाण्यावर, कमी क्षेत्रात, कमी भांडवलावर, प्रचंड उत्पादन काढून येथील शेतकऱ्यांनी पुणे-मुंबईसारख्या बाजारपेठांमध्ये आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवला.

प्रचंड उत्साह, बोलण्यातला गोडवा, मैत्रीपूर्ण व्यवहार, जाईल तिथं आपलं नाव लक्षात राहील ही भावना मनात ठेवून या तरुण पोरांनी छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आणि त्यामध्ये प्रचंड यश मिळवलं.

नोकरदारांनी ज्या ठिकाणी ते सेवा करतात अशा ठिकाणी स्वतःचा नावलौकिक वाढवला. जबाबदारी उचलली. मोठे उद्योग धंदे करणाऱ्यांनी आपलं संपूर्ण लक्ष  धंद्यावर केंद्रित केलं. अतोनात कष्ट, व्यवसायावरचं  प्रचंड प्रेम, जिद्द चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर धंदे झपाट्याने वाढवले. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पशुधन वाढवलं अरण च श्रीक्षेत्र अरण हे नवं नाव रूढ झालं. आजपर्यंत तिरस्कारानं पाहणारे डोळे, फटकून वागणारी माणसं प्रत्येक 

अरणकराशी जवळीक निर्माण करण्याची संधी शोधू लागले. अरण हे एक मोठं विद्यापीठ झालं ,इथं प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला मिळू लागलं ,मैत्री करावी तर 

अरणकरांशीच  ही भावना संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली .'जुने जाऊ द्या मरणालागुनी जाळूनी किंवा पुरुनी टाका'

असं प्रत्येकाला वाटू लागलं आणि नव्या जोमानं ,नव्या उमेदिंन, नव्या जिद्दीनं येथील तरूण पेटून उठला.मागच्या सार्‍या गोष्टी तो विसरला. एक नवी दिशा नवी आशा घेऊन जन्मलेल्या पिढीला शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायला तो विसरला नाही. भांडण संपली, जाती-जातीतली तेढ संपली. राजकारणातला द्वेष, ईर्षा काळाच्या ओघात  नष्ट झाली. प्रत्येकानं स्वतः च एक निश्चित असं ध्येय ठरवलेलं दिसतं. हे ध्येय गाठण्यासाठी इथला प्रत्येक तरुण जिगरबाज अरण कर या नावानं झपाटलेला दिसतो आहे.  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हरिभाऊ शिंदे नाना यांनी सुरू केलेलं संत सावतामाळी विद्यालय, तरुण पोरांनी सुरू केलेली सांस्कृतिक मंडळं यांना या बदललेल्या अरण चं सारं श्रेय दिलं तर कुणाला वावगं वाटू नये. माझ्या हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त थोडसं सिंहावलोकन आणि वर्तमान आणि भविष्यातील 

जिगरबाज अरण करां  विषयी वाटणारा सततचा आत्मविश्वास...कायम राहील हीच अपेक्षा...

               नवनाथ शिंदे, माजी विद्यार्थी   

       संत सावता माळी विद्यालय अरण