भुकंपानंतरचं गाव ...!! आठवणीतला प्रसंग!!!
भूकंपाचा विषय काढताच साठे गुरुजींचा हुंदका अनावर झाला! डोळे पाण्याने भरून आले! अश्रूला वाट मोकळी करत कसेबसे ते बोलते झाले ......"३० सप्टेंबर ९३ च्या रात्रीच्या विषयावर बोलण्याची माझी हिम्मतच होत नाही.त्यावेळचा नुसता प्रसंग जरी डोळ्यापुढं उभा राहिला तरी अंगाचा थरकाप उडतो! माझ्या गावातली बरीच कुटुंबं उध्वस्त झाली , त्यांच्यासोबत माझ्या बहिणीचं कुटुंबही या भूकंपानं नजरेआड केलं. 30 सप्टेंबर च्या रात्रीच्या अंधारात आणखी किती जीव मातीआड गेले याची कल्पनाच न केलेली बरी.एरवी शाळेत एखाद्या मुलाच्या हाता पायाला दुखापत झाली तरी शिक्षकाचा जीव खालीवर होतो इथं तर एक तुकडीच भूकंपात मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती.तब्बल ४२ विद्यार्थ्यांची नावे हजेरी पटावरुन कमी केंल्याचे गुरुजी सांगत होते! काय अवस्था झाली असेल त्या शिक्षकाची आणि शाळेची !!! गुरुजी बोलत होते. आम्ही नि:शब्द झालो होतो.पुढचे काही प्रश्न विचारण्याचं धाडसच आमच्यात उरलं नव्हतं.
खूप दिवसांपासून महेशराव आम्हाला किल्लारी भागात त्यांच्या मित्रांकडं घेऊन जाणार होते. आज योग आला होता. खोचक प्रश्न विचारून समोरच्याची बोलती बंद करणारे
योगेश कुमार, एकाच शब्दाचे अनेक अर्थ काढून हजरजबाबीपणानं उत्तर देणारे
विनोद वीर डॉक्टर विनय, जे का रंजले गांजले त्यांशी म्हणे जो आपुले हा विचार घेऊन पशू- पक्षी, प्राणी, झाडं-झुडपं, यांच्या मध्येच आपलं जीवन आनंदात जगणारे तानाजी इंगळे सर,
सर्वांना सोबत घेऊन स्वतःभोवती शुद्ध विचारांच्या मित्र मंडळींचं कडं निर्माण करणारा
दादा कैलास ......यांच्यासोबत महेश रावांच्या गाडीतून जाताना हसत- हसत, गप्पा मारत प्रवास करत आम्ही माकणी गावापर्यंत कसे पोहोचलो कळलंच नव्हतं.
सर्वत्र एकसारख्या दिसणाऱ्या घरांमध्ये साठे गुरुजींनाही दोन खोल्यांचं घर मिळालं होतं . नंतर त्यांनी स्व:ता दोन खोल्यांचं बांधकाम केलं होतं . त्यांच्या सोबत गप्पा मारता मारता मागील दोन तासातला प्रवास कुठल्या कुठे गेला होता.
तेव्हा दुपारचे २ :०० वाजलेहोते.
महेशरावांचे शाळकरी दोस्त वकील मधुकर व्यंकटराव साठे, प्रशांत साठे यांना सोबत घेऊन आम्ही तेरणा धरणाच्या पायथ्याला असणाऱ्या 'माकणी' गावाकडे निघालो. काटेरी चिलारी आणि मातीचे ढिगारे यात अदृश्य झालेलं गाव आम्ही भर उन्हात शोधत होतो.
नाही म्हणायला गावच्या वेशीनं तेवढं गावपण जपलं होतं. कंबरंएवढं दत्ताचं, मंदिर, हेमाडपंथी राक्षस मंदिर, उंच गढीवरची अर्धवट भिंत या खुणा स्पष्ट दिसत होत्या. हेमाडपंथी राक्षस मंदिरात धन लोभापायी खोलवर खणलेलं दिसत होतं. त्याच्याच खाणाखुणा इतरत्र पडलेल्या दिसत होत्या
महेश पवार यांचं हेच जन्मगाव. इथंच पहिली ते दहावीपर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं. वडिलांच्या नोकरीमुळं इथं राहण्याचा त्यांना योग आला होता. त्या भूकंपाच्या रात्री स्वतः भावासह मातीच्या ढिगार्यातून बाहेर आलेले महेशराव जेव्हा त्या जागेवर गेले तेव्हा थोडा वेळ गप्पच झाले... त्या वेळच्या साऱ्या घटना त्यांच्या डोळ्यापुढं उभ्या राहिल्या असाव्यात. "इथंच दत्ताच्या मंदिरापासून शंभर फुटावर माझं घर होतं" एवढेंच ते बोलले.जवळच त्यांची दोन मजली शाळा होती. आम्ही त्यांच्या वर्गखोल्यात डोकाऊन पाहिलं...... तोच सातवीचा वर्ग जसच्या तसंच फळं, पंचवीस वर्षापूर्वीचे तेच सुविचार.....आतून खोल्या मात्र दारूच्या बाटल्या, गुटख्याच्या पुड्या, पत्त्यांची पानं, नी कचर्यानं भरून गेलेली.....आजकालच्या मौजमजेत जगणाऱ्या दारू आणि पत्त्यांच्या खेळात भरमसाठ पैसे उडवणाऱ्या मुलांना काय कळणार !!! त्यावेळच्या जीवनाची किंमत..
ज्यांचे जीव गेले, ज्यांच्यामुळं
घर दारं मिळाली ,पैसा मिळाला, मदत मिळाली ,त्यांची पिढी आजही त्याच मदतीवर घरादारावर, मिळालेल्या पैशावर आनंदात जगते आहे.ज्यांनी या वेदनेच्या कळा सोसल्या त्यांना मात्र आजही भूकंपाची धास्ती आहे.
जवळ जवळ अशीच परिस्थिती या भागातल्या सर्वांचीच.
किल्लारी आणि सभोवतालच्या 52 गावात हीच अवस्था. सास्तूर आणि किल्लारी या ठिकाणचे स्मृतीस्तंभ त्यावेळच्या भीषणतेची जाणीव करून देतात.
भरपूर शेती असणारे शेतकरी. पारंपारिक शेती करून गावातच राहणारी कुटुंबं, अजूनही हुंडा पद्धतीमुळं मुलींच्या लग्नासाठी एकर-दोन एकर जमीन विकणारे आई-वडील..... 70 /80 फुटापर्यंत पक्का खडक न लागणाऱ्या जमिनी.. दूध दूभते, कुकुट पालन या सारख्या व्यवसायाला फाटा देऊन ऐषारामात राजकारणावर तासंतास गप्पा मारत बसणारी तरुण पिढी आज इथं सुद्धा दिसते आहे....
......नवनाथ शिंदे,अरण.
No comments:
Post a Comment