विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Wednesday, 10 March 2021

एका जिद्दी आईची आणि यशस्वी उद्योजकाची यशोगाथा

 एका जिद्दी आईची आणि यशस्वी उद्योजकाची यशोगाथा.....

    ज्योती नारायण केदार अचानक झालेलं  पतीचे निधन! अंगणवाडीचा तुटपुंजा पगार! छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये दोन मुली आणि एक मुलगा यांच्यासोबत कुटुंबाची आलेली एकदम जबाबदारी! जमीन असून अडचण नसुन खोळंबा अशी परिस्थिती. घरात करती सवरती एकटीच बाई. मुलींची लग्न जवळ आलेली. मुलाचं शिक्षण. अंगणवाडीची नोकरी सोडावी लागली. अरण हे स्वतःचं गावही सोडलं.मोडनिंब मध्ये येऊन एक छोटसं पत्र्याचं शेड उभारलं  आणि  जिथं राज्यातील वेगवेगळ्या व्यापारासाठी लोक इथं येतात. परिसरातल्या अनेक गावांमधील छोटे-मोठे व्यावसायिक इथं येऊन आपलं नशीब आजमावतात अशा मोडनिंब सारख्या गावात एक छोटासा व्यवसाय सुरू केला.

पाच किलो शेंगदाणे, त्यासाठी लागणारा गुळ, एक मिक्सर आणि इतर काही साहित्य विकत घेतलं. शेंगदाण्याचे लाडू बनवणे आणि ते आपल्या सभोवताली विकणे हा व्यवसाय सुरू केला. पाच वर्षांपूर्वीची ही गोष्ट.  शेंगदाण्याच्या लाडूला हाताची चव आली. तोपर्यंत मुलगा अक्षय केदार कपड्याच्या दुकानात कामाला होता. तोही आईला मदत करू लागला. वयाच्या मानानं लवकरच त्याला तरुणाईचा उन्माद काय असतो,मैत्री कुठपर्यंत करायची, समाजातले चांगलं-वाईट प्रसंग  समजले. दुकानात काम केल्यामुळ  गिर्‍हाईकां सोबत कसं बोलावं? मैत्री कशी वाढवावी? हे लवकरच त्याला समजलं. गोड बोलून बऱ्यापैकी अडचणी, समस्या, आपले प्रश्न सुटतात हे त्याला माहीत झालं. आणि दुसऱ्याच्या दुकानात काम करण्यापेक्षा म्हणजेच नोकर होण्यापेक्षा मालक  झालेलं काय वाईट! हा विचार मनात आला. मोकार फिरनं बंद झालं. दिल दोस्ती दुनियादारी चे रूपांतर व्यवसायामध्ये झालं. आईच्या हाताखाली मदत झाली. मग हळू हळू साईप्रसाद फुड्स या नावानं पत्र्याच्या शेड वर बोर्ड झळकला. लाडूची चव सबंध परिसर आणि जिल्ह्याच्या बाहेर संपूर्ण राज्यभर पसरली. अक्षय चे साईप्रसाद शेंगदाणा लाडू हा एक ब्रँड तयार झाला. मागणी वाढली. खप वाढू लागला. एक - दोन महिला कामाला ठेवल्या. मालवाहतुकीसाठी स्वतःची गाडी घेतली. व्याप वाढत गेला. मग त्याच्यासोबत बर्फी, शेंगदाणा चटणी, आणि यासारखे अनेक फूड प्रोडक्स तयार होऊ लागले. आज परिसरातील  वीस ते पंचवीस महिला  त्यांच्याकडं काम करतात. पंचवीस-तीस कुटुंबाची जबाबदारी आता अक्षय वर आहे. महिन्याला तीस-चाळीस लाखाचा टर्न ओव्हर होतो आहे. ज्या ठिकाणी लाडू तयार केले जातात तिथली स्वच्छता टापटीपपणा खरंच येऊन पाहण्यासारखा आहे.

            स्वतःच्या एका रिटेलर दुकानाचा शुभारंभ नुकताच पार पडला आहे.  मोडनिंब मध्ये एक मोठी जागा  घेतली आहे. त्या ठिकाणी साईप्रसाद फूड्स या नावानं एक मोठी कंपनी उभारण्याचा त्याचा मानस आहे. तरुणाईसाठी हा खूप मोठा संदेश तो देतो. बोलता-बोलता हसत हसत एक खंत मात्र त्यांन बोलून दाखवली. अजूनही समाज मुली च्या लग्नाचा विचार करताना मुलाचं कर्तृत्व, त्याचं व्यक्तिमत्व , चारित्र्य, या सर्व गोष्टींचा विचार करण्यापेक्षा मुलाला नोकरी आणि शेती किती आहे? याचाच अगोदर विचार करतात. त्याची धडपड आणि परिस्थितीशी दिलेली झुंज ते पाहत नाहीत.

       आपल्या सर्वांचे मित्र माधव देशपांडे सर यांचं परवा बोलता-बोलता एक वाक्य खूप आवडलं ....."आव्हानं आपली क्षमता अजमावण्यासाठी येतात. संकट आपली परीक्षा घेतात". हे वाक्य खूप आवडलं आणि समोर अक्षय दिसला... म्हणून थोडं लिहावसं वाटलं एवढच....एक विद्यार्थी म्हणून आम्हाला नेहमीच त्याचा अभिमान वाटतो.

.                

                                नवनाथ शिंदे

                             जिल्हा समन्वयक

                        सर फाउंडेशन सोलापूर

     


No comments:

Post a Comment