विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Wednesday, 7 February 2024

17.बाल स्नेही शिक्षणाचे पुरस्कर्ते शिवाजी वडते गुरुजी

 बाल स्नेही शिक्षणाचे पुरस्कर्ते शिवाजी वडते गुरुजी


      शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणासाठी पूरक वातावरण निर्माण करत बालस्नेही शिक्षणासाठी धडपडणारे शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिका नगर (बाळे) तालुका उत्तर सोलापूर येथील शिवाजी राम वडते हे सर्वत्र परिचित आहेत. त्यांनी विद्यार्थी विकासासाठी राबविलेल्या प्रत्येक उपक्रमात बालकेंद्री शिक्षणाचा पुरस्कार केला आहे. त्यामुळे विद्यार्थी प्रिय शिक्षक अशी त्यांची पालक , विद्यार्थी व शिक्षकांमध्ये ओळख आहे. 

        हद्दवाढ भागातील जिल्हा परिषद शाळा व त्यांच्या समोरील आव्हानं, यांना सक्षमपणे तोंड देत या शाळेला नावलौकिक मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. 

विशेष म्हणजे आपल्या वर्गातील विद्यार्थी व पालकासोबतच इतर वर्गातील विद्यार्थी व पालक यांच्याशीही त्यांचा सुसंवाद आहे. शाळेत आयोजित होणारा प्रत्येक उपक्रम विद्यार्थी केंद्रित असावा, इतर शाळांपेक्षा वेगळ्या गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांना मिळाव्या असा त्यांचा प्रयत्न असतो. उत्तर सोलापूर तालुक्यातील एक तंत्रस्नेही शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यासोबतच वर्गस्तरावर विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, डिजिटल क्लासरूम, माझे विद्यार्थी माझा अभिमान, व्यक्तिमत्व विकास स्पर्धा, प्रश्नमंजुषा, एका संख्येपासून अनेक गणिते क्रिया, तंत्रस्नेही विद्यार्थी, असे विविध उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांना हटके विचार करून त्यांना शिकण्यासाठी आनंदी वातावरण निर्माण हे त्यांचे ध्येय आहे. त्यामुळे शाळेतील प्रत्येक कोपरा बाल स्नेही बनवला आहे. 

       शाळेतील साहित्य, परिसर, बाग, रंगरंगोटी या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांचे आकर्षण बनले आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची अडचण येऊ नये म्हणून ते उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. स्वतःचे हस्ताक्षर अतिशय सुंदर असल्याने आपल्या विद्यार्थ्यांचेही हस्ताक्षर सुंदर असावे, यासाठी ते उपक्रम घेत आहेत. वर्गाबरोबरच शाळा स्तरावर विविध उपक्रम राबवीत असताना, शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना सोबत घेऊन नियोजन व त्यांची अंमलबजावणीत मोठा सहभाग हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. सहकार्यासोबत शाळेचा कायापालट करण्यासाठी त्यांनी विविध प्रयत्न केले ,त्यामुळे शाळेत अमुलाग्र बदल होऊन शाळा स्वच्छ सुंदर शाळा म्हणून नावारूपाला आली. 

     शाळेतील विद्यार्थ्यांचा पट वाढण्यासाठी परिसरातील अनेक मोठ्या शाळांशी स्पर्धा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व उत्तम प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांचा आग्रह असतो .त्यातूनच सर्व सोयींनी युक्त अशी स्वच्छ सुंदर शाळा म्हणून अंबिकानगर जिल्हा परिषद शाळेची ओळख निर्माण झाली आहे. 

     स्वच्छ सुंदर व हरित शाळा, उपक्रमशील शाळा याबरोबरच प्रिसिजन फाउंडेशनच्या मदतीने शाळेत बैठक अँट स्कूल, पासवर्ड वाचन अभियान, प्रिसिजन ई लर्निंग प्रोजेक्ट, गीलो ऑन गो असे उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत, बैठक अँट स्कूल या उपक्रमातून विद्यार्थ्यांना अभिजात भारतीय संगीत व नृत्यकला त्यांची ओळख करून दिली जाते. पासवर्ड वाचन अभियानातून विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड व स्पर्धात्मक वातावरण तयार होते. प्रिसिजन ई लर्निंग प्रोजेक्टच्या माध्यमातून अत्याधुनिक ई लर्निंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गिल्लो उपक्रमातून नाट्य अभिनयाची पायाभरणी केली जाते. विविध क्रीडा स्पर्धा, व्यक्तिमत्व विकास स्पर्धा याचेही आयोजन ते करतात. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी इनोवेशन क्लब ची स्थापना केली असून शाळा स्तरावर विविध नाविन्यपूर्ण पद्धतीने विचार करण्याची सवय त्यांनी विद्यार्थ्यांना लावली आहे. त्यामुळे विविध समस्येवर उत्तर शोधण्यासाठी वेगळ्या पद्धतीने विचार करणारे विद्यार्थी निर्माण झाले आहेत. बाल सभा व सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सभाधीट पणा निर्माण होतो. 

    

विद्यार्थी हिताचे कार्य करत असताना त्यांना अनेक पुरस्काराने विविध संस्थेने सन्मानीत केला आहे. आजादी बचाव संस्थेने आदर्श शिक्षक पुरस्कार, सर फाउंडेशनच्या राष्ट्रीय स्तरावरील इनोव्हेटिव्ह टीचर अवार्ड तसेच गुजरातच्या संस्थेच्या वतीने डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम विंग्स ऑफ फायर नॅशनल एज्युकेशन व सोशल इनोवेशन अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आपल्याला आनंदाचे क्षण आपल्याला विद्यार्थ्यांमुळेच मिळतात असे नेहमी त्यांना वाटतं . त्यांचे कार्य सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी आहे.

No comments:

Post a Comment