विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Wednesday, 7 February 2024

16.विद्यार्थ्यांमध्ये सतत काहीतरी नवं शोधणाऱ्या शिक्षिका गिरीजा नाईकनवरे

 विद्यार्थ्यांमध्ये सतत काहीतरी नवं शोधणाऱ्या शिक्षिका गिरीजा नाईकनवरे.


                    विद्यार्थ्यांसाठी सतत धडपडत राहणं. नवीन आव्हानं स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणं.शालेय, सहशालेय उपक्रमातून आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, आणि प्रत्येक समस्येवर उपाय असतोच हे लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या अंगी बिंबवनं हे खरंतर शिक्षकाचं आणि शिक्षणाचं काम असतं. असेच नवनवीन प्रयोग आणि नवनवीन उपक्रमातून सतत विद्यार्थ्यांसमवेत कार्यमग्न असणाऱ्या माळशिरस तालुक्यातील बोंडले जि.प.शाळेतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या लाडक्या गिरीजा नाईकनवरे मँडम त्यांच्या विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे आज त्या तालुक्यातच नव्हे तर राज्यभर परिचित झाल्या आहेत.

          शाळा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणं आवश्यक असतं,ही बाब लक्षात आल्यानंतर मैत्री अक्षरांशी, मी ही काढणार सुंदर हस्ताक्षर, शाळेची परसबाग, कला कार्यानुभव कक्ष, माझा वर्ग स्वच्छ व सुंदर वर्ग,माझी शाळा सुंदर शाळा,मी कसा दिसतो ?, शिक्षणासाठी दत्तक मुले, चला तयारी करुया वक्तृत्वाची...,हे बंध रेशमी मैत्रीचे, माझे विद्यार्थी - माझा अभिमान,जोडू नाते माणुसकीचे, स्पर्धा परीक्षांची तयारी, पर्यावरणाचं रक्षण- आमची जबाबदारी यांसारखे उपक्रम त्यांनी राबवायला सुरुवात केली.पालकांशी सुसंवाद साधत त्यांनाही शाळेच्या विकासात सहभागी करुन घेतलं.शिष्यवृत्ती परीक्षेतही त्यांच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यांसारख्या उपक्रमांमुळे शाळेचा पट वाढण्यासाठी मदत झाली.

        आधुनिक तंत्रज्ञानाचं ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांच्या सहकार्यानं यशवंत नगर येथील शाळेत असताना १५ संगणक ग्रामपंचायतीकडून उपलब्ध करुन घेत सुसज्ज अशा संगणक कक्षाची निर्मिती केली.लाखो रुपयांचा शैक्षणिक उठाव करत शाळेतील प्रत्येक वर्ग स्मार्ट क्लासरुम करण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतलं.

            विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा तसेच विद्यार्थी गुणवत्ता शोध स्पर्धांतर्गत वक्तृत्व, कथाकथन,निबंध, वैयक्तिक तसेच समूहगीतगायन,समूह नृत्य व क्रीडा स्पर्धांमध्ये तालुका व जिल्हास्तरावर अनेक विद्यार्थांनी यश मिळवलं.

       कोरोना काळात "शाळा बंद पण शिक्षण चालू " हा उपक्रम गिरीजा मँडमसह सुमारे १५० शिक्षकांनी सलग २०० दिवस चालवला. इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना आँनलाईन प्रत्यक्ष अध्यापन केलं.प्रत्येक वर्गाचे आँनलाईन स्नेहसंमेलन, संडे फन डे,मैत्री अक्षरांशी,चला रांगोळी काढूया...,विविध सण व उत्सव आँनलाईन साजरे केले.. 

           बोंडले जि.प.शाळेत स्वतः ५०,००० रुपये खर्चून ग्रामपंचायतीने तात्पुरत्या स्वरूपात दिलेल्या वर्गखोलीची रंगरंगोटी करुन शैक्षणिक वातावरणनिर्मिती केली.शाळेतील सर्व शिक्षक बांधव व ग्रामस्थांच्या सहकार्यानं आमदार निधीतून शाळेत स्मार्ट क्लासरुम तयार झाला. 

         कोणत्याही कार्यक्रमाचं स्वागत त्यांनी रेखाटलेल्या अप्रतिम अशा रांगोळीनचं होतं.. ही कला स्वतःपुरती मर्यादित न ठेवता त्यांनी अनेक शिक्षक बंधू - भगिनींनाही या कलेचं प्रशिक्षण दिलं.या कलेतील त्यांचं प्रभुत्व पाहून "रांगोळी सम्राज्ञी" ही उपाधीच माळशिरसकरांनी त्यांना बहाल केली .सूत्रसंचालनाची जबाबदारीही त्या लीलया पेलतात. .विविध प्रशिक्षणासाठी सुलभक म्हणून त्यांनी काम केलं आहे.कलासमेठीत अध्ययन- अध्यापन या पायलट प्रोजेक्टवर देखील त्यांनी काम केलं आहे.तालुक्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत सुंदर हस्ताक्षर व रांगोळी कार्यशाळा घेतल्या आहेत.मुलींना मासिक पाळीसंदर्भानं मार्गदर्शन केलं आहे. शिवरत्न फाऊंडेशन व डॉटर माँम्स फाउंडेशन सोबत "बेटी बचाओ, बेटी पढा़ओ " यासाठी सामाजिक कार्य केलं आहे. महिला सक्षमीकरणासाठी मोफत रांगोळी, मेहंदी,शिवणकाम कार्यशाळा घेतल्या आहेत.सायकल बँकेसाठी योगदान दिले आहे. Virtual Classroom या उपक्रमात इयत्ता पहिली व दुसरी - मराठी व गणित विषयासाठी त्या राज्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत.

माळशिरस तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार, जिल्हा परिषद, सोलापूरचा आदर्श शिक्षक पुरस्कार,राज्यस्तरीय आचार्य दोंदे आदर्श शिक्षक पुरस्कार, त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment