विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Saturday, 17 August 2024

40.जाईल तिथं उल्लेखनीय कामगिरी करणारे शरद रुपनवर गुरुजी

 शिक्षण आणि शाळेविषयीची असणारी आस्था, पालक आणि समाज यांना शाळेकडं खेचून आणण्याचा शब्दातला गोडवा, विद्यार्थ्यांसाठी सतत नवं काहीतरी करण्याची चाललेली धडपड, शाळा हेच आपलं घर समजणाऱ्या शिक्षकाला शाळेची वेळ सुद्धा अपुरी पडते.ज्या शाळेत बदली होते ती शाळा प्रत्येक अभियानात जिल्ह्यात पहिली असते असं छाती ठोकपणे सांगणारे माळशिरस तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या कारूंडे शाळेतील शिक्षक शरद रुपनवर गुरुजी.

        डोंगरदर्‍यातलं गाव ,सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात ,शिखर शिंगणापूरच्या पायथ्याशी वसलेल्या गावातली ही शाळा अगदी भकास होती. मा. दिलीप स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतून माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान संपूर्ण जिल्हाभर सुरू झालं. गावानं आणि शाळेनं अभियानात उतरायचं ठरवलं आणि जिल्ह्यामध्ये शाळा पहिली आली. गावाचा शाळेकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. स्वतंत्र मुख्याध्यापक कार्यालय, बहुउद्देशीय सभागृह, निसर्ग वर्ग ,रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, परसबाग ,चाइल्ड फ्रेंडली सेक्शन, प्रशस्त व्यासपीठ , सुसज्ज वर्ग खोल्या, विद्यार्थी गुणवत्ता शैक्षणिक साहित्यानं परिपूर्ण वर्ग खोल्या ,ग्रामस्थांच्या सहकार्यानं आतापर्यंत 13 लाख 67 हजार रुपये आणि चालू वर्षी शाळेसाठी जवळजवळ एक कोटी रुपयाची साडेतीन एकर जमीन गावानं शाळेला दिली. अशाप्रकारे संपूर्ण गाव शाळामय झालं वैशिष्ट्य म्हणजे चालू वर्षी शाळेत नववी चा वर्ग सुरु झाला. आणि पुढं नैसर्गिक पद्धतीनं दहावी ,अकरावी आणि बारावी असा शैक्षणिक विकास आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं भव्य दिव्य शैक्षणिक संकुल उभारण्याचा मानस आहे.असं ते सांगतात.

       या अगोदर गुरुजींनी परभणी जिल्ह्यातील चिलगरवाडी येथे खूप मोठं काम केलं. पहिल्याच प्रयत्नात चौथी शिष्यवृत्तीसाठी सहा विद्यार्थ्यांची निवड झाली.गावातील तरुणांना सोबत घेऊन शाळेच्या परिसरातील एक एकर झाडी जंगल तोडून त्याच ठिकाणी त्याच पैशातून सुमारे 200 झाडांचं वृक्षारोपण करून संगोपन केलं. तिथं ही माझी शाळा ,सुंदर शाळा या अभियानात चिलगरवाडी या शाळेनं गंगाखेड तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.

         आता गुरुजींची बदली शेरेवाडी माळशिरस तालुक्यात झाली 17 पटाची शाळा 42 पटा पर्यंत पोहोचली. या छोट्याशा वस्तीत दोन लाख 53 हजार वर्गणी करून शाळेचा संपूर्ण कायापालट केला.शंकरराव मोहिते पाटील गुणवत्ता विकास अभियान जिल्ह्यात सुरू झालं. या अभियानामध्ये शेरेवाडी शाळेनं जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. तीन विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षेत पात्र झाले. एक विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत पात्र झाला. अनेक विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत चमकले. माळशिरस पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार गुरुजींना मिळाला.

     पुढं

 गुरुजी बदली होऊन गुरसाळे शाळेत आले . पहिल्याच वर्षी सातवी चा वर्ग 22 पैकी 17 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत बसून 100% विद्यार्थी पास झाले. जुन्या खोल्या पाडून त्या ठिकाणी नवीन सुसज्ज इमारत, वृक्ष संवर्धक कठडे ,स्वतंत्र मुख्याध्यापक कार्यालय ,स्वतंत्र ई लर्निंग कक्ष व सलग तीन वर्ष अतिशय देखणा सांस्कृतीक कार्यक्रम करून 14 लाख रुपये लोकसहभागातून जमा केले. अनेक विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत जिल्ह्यात पहिले आले. दरम्यान जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार गुरुजींना देण्यात आला... माळशिरस तालुक्यातील पहिली आय एस ओ मानांकन प्राप्त शाळा म्हणून गुरसाळे शाळेची ओळख संपूर्ण जिल्हाभर झाली .पुढं गुरसाळे शाळा सुद्धा 'माझी समृद्ध शाळा' या अभियानामध्ये जिल्ह्यात पहिलीच आली.

No comments:

Post a Comment