विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Saturday, 27 April 2024

28.गुणवत्तेचा ध्यास घेतलेले ध्येयवेढे शिक्षक नागनाथ घाटोळे

 ग्रामीण भागात वाडीवस्तीवरील बालकांना शाळेची गोडी लागावी आणि कोणतंही मुल शाळाबाह्य राहू नये यासाठी तत्कालीन सरकारनं वस्ती तिथं शाळा ही संकल्पना अंमलात आणली . आणि राज्यातील वस्त्या वस्त्यांवर अनेक सुशिक्षित तरुण यासाठी स्वयंसेवक म्हणून पुढं सरसावले. करकंब ता. पंढरपूर येथील लोकरेवस्तीवरील नागनाथ घाटुळे या ध्येयवेढ्या तरुणांनं ही अशीच एका झाडाखाली २००५ साली एक वस्तीशाळा सुरू केली. आसपासच्या वस्त्यांवरून मुलं जमवली.बघता बघता शाळेचा पट वाढला. झाडाखालून छपरामध्ये आणि छपरातून इमारतीत शाळेचा चढता आलेख सुरू झाला. आता एका प्रशस्त इमारतीत शाळेचं रूपांतर झालं. गुरुजींच्या आणि पालकांच्या मदतीनं इथं एक देखणी इमारत उभी राहिली. शाळा लांब म्हणून शाळा सोडणाऱ्या मुला मुलींना गुरुजी शाळेत आणलं . गावातून ही काही मुलं या शाळेत शिकायला येऊ लागली.पुढं वस्ती शाळेचं रूपांतर नियमित शाळेत झालं. 

          गुरुजींनी विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांना शाळेविषयी गोडी लागावी यासाठी शब्दाच्या बागेत ,शब्दाची फुले ,शब्दाचा डोंगर चढती मुले, दिनांक तो पाढा, जाणून घेऊ गणिताची भाषा ,अंक भाषा, बोटांची भाषा, कृतींची भाषा ,वस्तूची भाषा ,चित्र भाषा, ध्वनीची भाषा, शब्द तयार करू, वाचू आणि लिहू, बेरजेचा डोंगर यासारखे वाचन पूरक उपक्रम राबविले. शिवाय मातकाम, हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी , विद्यार्थी बचत बँक, उपस्थिती ध्वज, डान्सिंग कृतीयुक्त पाढे ,डॉ.अब्दुल कलाम वाचन कट्टा ,ज्ञानरचनावाद शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण, बागबगीचा यासारख्या उपक्रमामुळं विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आणि गुणवत्तेत वाढ झाली.

        विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते सोबतच गुरुजींना लेखनाची ही आवड आहे. आज पर्यंत विविध विषयांवर जीवन शिक्षण, शिक्षण यात्री , जीवन गौरव,धडपड टिचर्स, यासारख्या विविध मासिकांसाठी त्यांनी लेखन केले आहे. सहकारी शिक्षक विनोद सावंत आणि घाटुळे गुरुजी यांचे बहुवर्ग अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांचे गटकार्य हे उपक्रम पाहण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त चौकलींगम साहेब, तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे साहेब अशा अनेक मान्यवरांनी शाळा भेटी दिल्या असून त्यांचे उपक्रम पाहून शाळेचं आणि शिक्षकांचही कौतुक केलं .

     महाराष्ट्रातील वाचन चळवळ या मुखपृष्ठावर लोकरे वस्ती शाळेचे विद्यार्थी चमकले. कबुलबुल स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्या मधील शेकोटी उपक्रमांमध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक व संचलन स्पर्धेत द्वितीय क्रमांक त्यांच्या विद्यार्थ्यांनी मिळवला.

   सर फाउंडेशन महाराष्ट्र यांच्यामार्फत घेत असलेल्या नवोपक्रम स्पर्धेत सलग तीन वर्ष त्यांना यश मिळाले आहे. तालुका आदर्श पुरस्कार, स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार, व राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार, शिक्षक रत्न पुरस्कार, साई समर्थ फाउंडेशन कोल्हापूर यासारख्या विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment